Dahihandi 2020 | यंदा दहीहंडी उत्सव रद्द, समन्वय समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय

| Updated on: Jun 25, 2020 | 3:35 PM

महाराष्ट्रातील प्रत्येक गोविंदापटूला, प्रत्येक दहीहंडी पथकाला कळकळीची विनंतीही आहे, वरील निर्णय हा या वर्षीसाठी ठाम आहे. यामध्ये कोणताही बदल होणार नाही" असे दहीहंडी समन्वय समितीने स्पष्ट केले.

Dahihandi 2020 | यंदा दहीहंडी उत्सव रद्द, समन्वय समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
फोटो - प्रातिनिधीक
Follow us on

मुंबई : आबालवृद्धांचा आवडता दहीहंडी उत्सव या वर्षी रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्याच्या दहीहंडी समन्वय समितीने घेतला आहे. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सुरक्षित वावराबाबतचा नियम पाळणे अशक्य असल्याने यंदाचा दहीहंडी उत्सव रद्द करण्यात येत असल्याचे ‘दहीहंडी समन्वय समिती’तर्फे जाहीर करण्यात आले. (Dahihandi Coordination Committee Decides to cancel Event this year)

“दहीहंडी मंडळांची आर्थिक बाजू, आयोजक, सामाजिक अंतर या समीकरणाचा विचार करता गोपाळकाला हा उत्सव होणार नाही आणि तो साजरा केला जाऊ नये, असे दहीहंडी समन्वय समितीचे प्रामाणिक मत तर आहेच, पण महाराष्ट्रातील प्रत्येक गोविंदापटूला, प्रत्येक दहीहंडी पथकाला कळकळीची विनंतीही आहे, वरील निर्णय हा या वर्षीसाठी ठाम आहे. यामध्ये कोणताही बदल होणार नाही” असे दहीहंडी समन्वय समितीने स्पष्ट केले.

दहीहंडी समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दहीहंडी उत्सव 2020 संदर्भात केलेले ठराव :

1) 2020 हे वर्ष वैश्विक आर्थिक, मानसिक आणि शारीरिक आरोग्य या दृष्टीने अवघड जात आहे. गेल्या दहा वर्षाचा इतिहास पाहिला, तर दहीहंडी दरवर्षी कुठल्या ना कुठल्या संकटात सापडते. मग ते संकट निसर्गनिर्मित असो की मानवनिर्मित, सामाजिक असो की राजकीय ते या सणाच्या पाचवीला पुजलेले आहेच. परंतु महाराष्ट्राच्या तरुणाईचा आणि आबालवृद्धांचा, मुली-महिलांचा आवडता, रांगडा सण नेहमीच त्या अडचणींवर मात करुन बाहेर पडलेला आहे. कोरोना संकटाने मात्र दहीहंडीला सामाजिक बांधिलकीच्या, वैयक्तिक स्वास्थाच्या, आर्थिक बाबींच्या यक्ष प्रश्नाच्या तोंडी दिले आहे. या वर्षीचा प्रत्येक सण तसा रद्दच झालेला आहे.

2) कोरोनामुळे प्रत्येकाची वैयक्तिक, राज्याची, पर्यायाने देशाची स्वास्थ्य सुरक्षा ही टांगणीला लागलेली आहे. मृत्यू आणि जगणं यामधली रेष फारच पुसट झाली आहे. सामाजिक अंतर (Social Distancing) हा एकमेव पर्याय आपणापुढे असताना दहीहंडी खेळ खेळणार कसे? सरकारने दिलेला आदेश प्रत्येकाच्या भल्याचाच आहे. कोणतीही लस आणि ठोस औषध उपाय नसताना आपण एकत्र येण्याची जबाबदारी घेणार कसे? असे प्रश्न आहेत.

हेही वाचा : Dahi Handi 2020 | प्रताप सरनाईक यांची प्रसिद्ध दहीहंडी रद्द, आयोजनाचा खर्च ‘कोरोना’ उपचारासाठी देणार

3) यावर्षी “श्रीकृष्ण जन्म” (अष्टमीची पूजा) हा अत्यंत साध्या पद्धतीने (सामाजिक अंतराचे भान ठेऊन) साजरा करायचा. आपणच आपल्यावर  बंधन घालून पोलीस बांधवांवर ताण थोडा कमी होईल याची काळजी घ्यायची. दहीहंडी मंडळांची आर्थिक बाजू, आयोजक, सामाजिक अंतर या समीकरणाचा विचार करता गोपाळकाला हा उत्सव होणार नाही आणि तो साजरा केला जाऊ नये, असे दहीहंडी समन्वय समितीचे प्रामाणिक मत तर आहेच, पण महाराष्ट्रातील प्रत्येक गोविंदापटूला, प्रत्येक दहीहंडी पथकाला कळकळीची विनंतीही आहे, वरील निर्णय हा या वर्षीसाठी ठाम आहे. यामध्ये कोणताही बदल होणार नाही,

“सर सलामत तो पगडी पचास” किंवा बचेंगे तो और भी लडेंगे/खेलेंगे या म्हणींचा आधार घेत हा सण/उत्सव पुढील वर्षी जोमाने आणि जल्लोषात साजरा करण्यासाठी सकलांना निरोगी आयुष्य लाभो, ही महामारी लवकरात लवकर दूर होवो ही दहीहंडी समन्वय समितीच्या वतीने श्रीकृष्ण परमात्म्याचरणी मनापासून प्रार्थना करण्याचेही बैठकीत ठरले.