दिल्ली हिंसा : आणखी 6 जखमींचा मृत्यू, मृतांचा आकडा 37 वर

| Updated on: Feb 27, 2020 | 7:18 PM

दिल्लीमध्ये मागील तीन दिवस सुरु असलेल्या हिंसाचारात आतापर्यंत 37 नागरिकांचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले आहेत.

दिल्ली हिंसा : आणखी 6 जखमींचा मृत्यू, मृतांचा आकडा 37 वर
Follow us on

नवी दिल्ली : दिल्लीमध्ये मागील तीन दिवस सुरु असलेल्या हिंसाचारात आतापर्यंत 37 नागरिकांचा मृत्यू झाला आहे (Delhi Violence Death toll). आज (27 फेब्रवारी) सकाळी 6 जखमींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच हिंसाचारग्रस्त भागातून इतर 2 मृतदेह देखील मिळाले आहेत. दिल्लीच्या जीटीबी रुग्णालयात 30 जणांचा आणि एलएनजीपी रुग्णालयात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. या व्यतिरिक्त 200 जखमी लोक रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे.

दिल्लीतील हिंसाचारानंतर वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये 18 एफआयआर दाखल करण्यात आल्या. यानंतर 130 आरोपींना अटक करण्यात आली आहे. बुधवारी (26 फेब्रुवारी) कोणतीही मोठी हिंसेची घटना समोर आलेली नाही. मात्र मौजपूरसह काही ठिकाणी रात्रीच्यावेळी थोड्याफार हिंसाचाराचे प्रकार घडले. दिल्ली पोलीस आणि निमलष्करी दलाचे जवान संवेदनशील भागात सातत्याने गस्त घालत आहेत. हळूहळू दिल्लीतील हिंसाग्रस्त भागातील स्थिती रुळावर येताना दिसत आहे. मात्र, अद्यापही परिस्थिती तणावपूर्ण आहे.

दरम्यान, बुधवारी (26 फेब्रुवारी) दिल्ली उच्च न्यायालयामध्ये दिल्ली सरकारकडून अॅड. राहुल मेहरा यांनी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्यावर प्रश्न उपस्थित केले. तक्रारदार दिल्ली सरकार असल्याने दिल्ली पोलिसांकडून सॉलिसिटर जनरल तुषार मेहता बाजू मांडू शकत नाही, असा आक्षेप दिल्ली मेहरा यांनी घेतला होता. यानंतर दिल्ली पोलिसांच्यावतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्यासह अॅडिशनल सॉलिसिटर जनरल मनिंदर आचार्य आणि वरिष्ठ वकील रजत नायर देखील बाजू मांडणार आहेत. दिल्लीच्या उपराज्यपालांनी दिलेल्या आदेशानुसार हे नवे बदल झाले आहेत.

‘आप  नेत्याच्या घरावर पेट्रोल बॉम्ब आणि दगड’

दिल्ली हिंसाचार प्रकरणात आपचे नगरसेवक ताहिर हुसेन (Tahir Hussain) यांच्यावर हिंसा भडकावण्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. हिंसाचारात मृत्यू झालेल्या गुप्तचर विभागाच्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांनी देखील हुसेन यांच्यावर हत्येचा आरोप केला आहे. ताहिर हुसेन यांनी हे आरोप फेटाळले आहेत. हिंसाचारामुळे मी माझ्या घरी नव्हतो. त्याचकाळात दंगेखोरांनी माझ्या घराचा वापर केला. मला बदनाम करण्यासाठी भाजपकडून हे षडयंत्र रचलं जात आहे, असा आरोप हुसेन यांनी केला.

हिंसाचार प्रकरणातील न्यायमूर्तींच्या बदलीनंतर विरोधकांचा मोदी सरकारवर निशाणा

दिल्ली न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. मुरलीधर यांची ऐन हिंसाचार प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान बदली झाल्याने विरोधकांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. बुधवारी न्यायमूर्ती मुरलीधर यांनी दिल्ली हिंसाचार प्रकरणी दिल्ली पोलिसांवर ताशेरे ओढत तात्काळ एफआयआर दाखल करण्यास सांगितलं होतं. मात्र, त्यानंतर तात्काळ त्यांची दिल्लीहून पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयात बदली करण्यात आली.

विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजिअमने 2 आठवड्यांपूर्वीच (12 फेब्रुवारी) त्यांच्या बदलीची शिफारस केली होती. मात्र, केंद्र सरकारने त्याला मंजूरी दिली नव्हती. यानंतर दिल्लीतील हिंसाचार प्रकरणाची महत्त्वाची सुनावणी करत असतानाच त्यांच्या बदलीवर केंद्राने मोहर लावली. केंद्र सरकारच्या बदलीला मंजूरीच्या वेळेवर यानंतर अनेक गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

Delhi Violence Death toll