राहुल गांधी सीरिअस राजकारणी नाहीत, ते पिकनिकला जातात, राजदला ठाऊक नव्हतं? : देवेंद्र फडणवीस

| Updated on: Nov 16, 2020 | 8:18 PM

"बिहार सरकारचा आणखी विस्तार होईल. अनेक जण शपथ घेतील. तरुण पिढीला संधी द्यायची ही भाजपची कार्यपद्धत आहे", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले (Devendra Fadnavis slams Rahul Gandhi).

राहुल गांधी सीरिअस राजकारणी नाहीत, ते पिकनिकला जातात, राजदला ठाऊक नव्हतं? : देवेंद्र फडणवीस
Follow us on

पाटणा : “काँग्रेस नेते राहुल गांधी हे पिकनिकला नेहमी जातात. याबाबत राजदला माहिती नव्हतं का? खरंतर राहुल गांधी सिरिअस राजकारणी नाहीतच, ते राजदलाही माहीत आहे. पण आता अपयशाचं खापर राहुल गांधींवर फोडलं जात आहे”, असा टोला बिहारचे भाजप प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी लगावला (Devendra Fadnavis slams Rahul Gandhi).

जेडीयू नेते नितीश कुमार यांनी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह एनडीएच्या 14 नेत्यांचा शपथविधीचा कार्यक्रम आज पाटण्यात संपन्न झाला. या कार्यक्रमाला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या शपथविधी कार्यक्रमानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ‘एएनआय’ला प्रतिक्रिया दिली.

“बिहार सरकारचा आणखी विस्तार होईल. अनेक जण शपथ घेतील. तरुण पिढीला संधी द्यायची ही भाजपची कार्यपद्धत आहे”, असं ते म्हणाले (Devendra Fadnavis slams Rahul Gandhi).

बिहारमध्ये राजद आणि काँग्रेस हे महागठबंधनचे महत्त्वाचे पक्ष होते. यापैकी राजद 75 जागांवर विजय मिळवून बिहारमधील सर्वात मोठा पक्ष ठरला. पण काँग्रेस 70 पैकी फक्त 19 जागांवर विजयी झाले. तर इतर मित्रपक्षांना 16 जागा मिळाल्या. त्यामुळे महागठबंधनची घोडदौड फक्त 110 जागांवर थांबली. तर भाजपप्रणित एनडीएला 125 जागांवर विजय मिळाला. त्यामुळे बिहारमध्ये आज एनडीएचे सरकार स्थापन झाले.

बिहारमध्ये काँग्रेसने आणखी मेहनत केली असती तर कदाचित आज चित्र वेगळं असतं, असं राजदच्या काही नेत्यांचं मत आहे. राजदचे नेते ज्येष्ठ नेते शिवानंद तिवारी यांनी तर बिहारमध्ये महागठबंधनची सत्ता स्थापन न होण्यामागे काँग्रेसच कारणीभूत असल्याचं म्हटलं आहे.

“काँग्रेस पक्ष महागठबंधनसाठी बाधा बनला आहे. काँग्रेसच्या 70 उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. पण काँग्रेसने 70 प्रचारसभादेखील घेतल्या नाहीत. काँग्रेस नेते राहुल गांधी बिहारमध्ये फक्त तीन दिवसांसाठी आले. प्रियांका गांधी यांना बिहार एवढा परिचित नाही, त्यामुळे त्यादेखील आल्या नाहीत”, अशी टीका शिवानंद तिवारी यांनी केली

“बिहारमध्ये निवडणुकीचं वातावरण तापलं होतं, पण काँग्रेस नेते राहुल गांधी शिमल्यात त्यांची बहीण आणि काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्या घरी पिकनीला गेले होते. पक्ष असा चालतो का? काँग्रेस पक्ष जशाप्रकारे चालवला जात आहे त्याचा भाजपला फायदा होत आहे”, असा घणाघात शिवानंद तिवारी यांनी केला होता.