630 किमीचा प्रवास, 70 बसवर 140 चालक, कोटाहून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आणण्यासाठी धुळ्याहून एसटी रवाना

| Updated on: Apr 29, 2020 | 4:25 PM

महाराष्ट्रातील सुमारे दीड हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना माघारी आणण्यासाठी धुळे आगाराच्या 70 बसेस कोटाकडे रवाना झाल्या (Dhule ST Bus departs to bring Maharashtra Students stuck in Kota Rajasthan)

630 किमीचा प्रवास, 70 बसवर 140 चालक, कोटाहून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आणण्यासाठी धुळ्याहून एसटी रवाना
Follow us on

धुळे : लॉकडाऊनमुळे राजस्थानातील कोटा शहरात अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी 70 बसेस धुळ्याहून रवाना झाल्या आहेत. परिवहन मंत्री अनिल परब यांनी यासंदर्भात माहिती दिली. (Dhule ST Bus departs to bring Maharashtra Students stuck in Kota Rajasthan)

महाराष्ट्रातील सुमारे दीड हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना माघारी आणण्यासाठी धुळे आगाराच्या 70 बसेस कोटाकडे रवाना झाल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब यांनी केंद्र सरकार आणि राजस्थान सरकारशी यासंदर्भात चर्चा केली होती.

धुळे ते कोटा हे 630 किलोमीटरचे अंतर असल्याने प्रत्येक बसवर दोन चालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या चालकांना संरक्षणासाठी परिवहन महामंडळाने मास्क, सॅनिटायझर यासारखे आवश्यक साहित्य दिले आहे. सर्व सत्तर बसेस महामंडळाने सॅनिटाईझ करुन घेतल्या आहेत.

कोटामध्ये अडकलेले बीड जिल्ह्यातील 60 विद्यार्थी काल दुपारी दोन वाजता शहरात दाखल झाले. एका खासगी ट्रॅव्हल्सने त्यांना राजस्थानातून बीड शहरात आणण्यात आलं. राज्यातील तब्बल अठराशे विद्यार्थी राजस्थानमधील कोटा येथे अडकून पडले आहेत. या विद्यार्थ्यांना आपापल्या घरी परत आणण्यासाठी राज्य सरकारने पावलं उचलली आहेत.

लॉकडाऊनमुळे 1780 विद्यार्थी राजस्थानच्या कोटामध्ये अडकले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार एसटी महामंडळाच्या 92 बसेस विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी आज (29 एप्रिल 2020) धुळ्याहून सुटतील, अशी माहिती काल रात्री परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली होती.

हेही वाचा : कोटामध्ये अडकलेले 60 विद्यार्थी बीडमध्ये परतले, कुटुंबियांना मोठा दिलासा

दुसरीकडे, स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी दिल्लीत गेलेले अनेक विद्यार्थी लॉकडाऊनमुळे राजधानीतच अडकले आहेत. जवळपास साडेआठशेहून अधिक विद्यार्थ्यांची महाराष्ट्रात परतण्यासाठी धडपड सुरु आहे.

कोटामधील विद्यार्थ्यांप्रमाणे आम्हालाही घरी न्यावं, ही मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून हे विद्यार्थी दिल्लीत गेले आहेत. मात्र ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे साडेआठशेहून अधिक विद्यार्थी तिथेच अडकून पडले आहेत.

या विद्यार्थ्यांनी अनेक राजकीय नेत्यांशी संपर्क साधला, परंतु अजूनही घरी येण्याची व्यवस्था झाली नसल्याने विद्यार्थी हवालदिल झाले आहेत. दिल्लीतील ओल्ड राजेंद्रनगर, शालिमार पॅलेस, कोरोल बाग, मुखर्जीनगर, हैदरपूर या भागात हे विद्यार्थी राहत आहेत. काही विद्यार्थी राहत असलेल्या भागात कोरोना रुग्ण आढळले असल्याने विद्यार्थ्यांची आणि परिणामी राज्यात असलेल्या त्यांच्या कुटुंबीयांचीही धाकधूक वाढली आहे. कोटामधील विद्यार्थ्यांची सुटका होत असल्याचं पाहून त्यांनीही राज्य सरकारकडे साकडं घातलं आहे. (Dhule ST Bus departs to bring Maharashtra Students stuck in Kota Rajasthan)