तुमच्या अहंकारामुळेच कार्यकर्त्यांची भाजपला सोडचिठ्ठी; खडसेंचा गिरीश महाजनांवर पलटवार

| Updated on: Oct 31, 2020 | 9:39 PM

भाजपमध्ये अनेकजण आले आणि गेले. तुम्ही पक्ष सोडल्याने पक्षात अनागोंदी माजणार नाही, या भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी केलेल्या विधानाचा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी समाचार घेतला आहे.

तुमच्या अहंकारामुळेच कार्यकर्त्यांची भाजपला सोडचिठ्ठी; खडसेंचा गिरीश महाजनांवर पलटवार
Follow us on

धुळे: भाजपमध्ये अनेकजण आले आणि गेले. तुम्ही पक्ष सोडल्याने पक्षात अनागोंदी माजणार नाही, या भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी केलेल्या विधानाचा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी समाचार घेतला आहे. ते ज्या पद्धतीची भाषा बोलत आहेत. हा निव्वळ अहंपणा आणि गर्विष्ठपणा आहे. या अहंकारामुळेच कार्यकर्ते भाजपला सोडचिठ्ठी देत असल्याचा टोला एकनाथ खडसे यांनी लगावला आहे. (eknath khadse taunt girish mahajan in ncp melava)

धुळ्यात शिरपूर येथे कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करताना एकनाथ खडसे यांनी जोरदार गिरीश महाजन यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. आमच्या पक्षातून कितीही जण बाहेर गेले तरी आमच्यावर त्याचा कुठलाही परिणाम होणार नाही. भाजप पक्ष यामुळे संपणार नाही. या अहंपणामुळेच कार्यकर्ते भाजपमधून बाहेर पडत असल्याचा टोला खडसे यांनी लगावला. ते जे बोलत आहेत. हा निव्वळ अहंपणा आणि गर्विष्ठपणा आहे. त्यांची ज्याप्रकारची भाषा आहे. त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते पक्ष सोडून जात आहे. पुढच्या कालखंडात तुम्हाला त्याचे परिणाम दिसतीलच, असं सांगतानाच माझ्या संपर्कात अनेक लहान मोठे कार्यकर्ते, नेते आहेत. पुढच्यावेळी जेव्हा मी धुळ्यात येईल, तेव्हा बऱ्याच जणांचा राष्ट्रवादीत प्रवेश होईल, असा दावा खडसे यांनी केला.

राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर खडसे यांनी पुन्हा एकदा कंबर कसली असून उत्तर महाराष्ट्रात पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे. आज त्यांनी धुळ्यात राष्ट्रवादीचा पहिलाच मेळावा घेतला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केलं. तसेच उत्तर महाराष्ट्र राष्ट्रवादीमय करण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहनही केलं.

महाजन काय म्हणाले होते?

आजवर भाजपमध्ये अनेकजण आले आणि गेले. त्यामुळे तुम्ही भाजप सोडल्याने पक्षात अनागोंदी माजणार नाही, असा टोला राज्याचे माजी मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना लगावला होता. आजही भाजपच्या ताब्यात राज्यातील 80 टक्के महापालिका आहेत. त्यामुळे आपण पक्ष सोडला म्हणजे अनागोंदी कारभार सुरु झाला, असे नव्हे. मुळात भाजप मोठा पक्ष आहे. भाजपमधून अनेक मुख्यमंत्री गेले आणि आलेसुद्धा, पण त्याने फरक पडला नाही. त्यामुळे भविष्यातही भाजप पक्ष हा वाढतच जाईल, असा दावा गिरीश महाजन यांनी केला होता.

फडणवीस सरकारच्या काळात गिरीश महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एकनाथ खडसे यांचे प्रतिस्पर्धी म्हणून उदयाला आले. देवेंद्र फडणवीस यांनी नियोजनपूर्वक रसद पुरवून गिरीश महाजन यांना जिल्ह्यात मोठे केले. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन अशी दोन शक्तीकेंद्रे उभी झाली होती. आता खडसे भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाल्याने हा संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. जळगावमध्ये शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात याचाच प्रत्यय आला. यावेळी महाजन यांनी खडसे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. (eknath khadse taunt girish mahajan in ncp melava)

 

संबंधित बातम्या:

‘भाजप मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेशाने सुरुवात’

भाजपमध्ये अनेकजण आले आणि गेले, आपण पक्ष सोडल्याने अनागोंदी माजणार नाही; महाजनांचा खडसेंना टोला

(eknath khadse taunt girish mahajan in ncp melava)