“मुंबईत वीज पुरवठ्याची जबाबदारी तुमची, चुका मान्य करा”, ऊर्जामंत्री नितीन राऊत अधिकाऱ्यांवर भडकले

| Updated on: Oct 26, 2020 | 3:37 PM

टाटा वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांवर नितीन राऊत चांगलेच भडकले (Energy Minister Nitin Raut angry on officers).

मुंबईत वीज पुरवठ्याची जबाबदारी तुमची, चुका मान्य करा, ऊर्जामंत्री नितीन राऊत अधिकाऱ्यांवर भडकले
Follow us on

मुंबई : “मुंबईत संसद असती आणि पंतप्रधान बोलत असताना वीज ठप्प झाली असती तर तुम्ही काय उत्तर दिले असते?”, असा सवाल करत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी टाटा पॉवर या वीज निर्मिती कंपनीच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले (Energy Minister Nitin Raut angry on officers).

मुंबईत 12 ऑक्टोबर रोजी वीज पुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. याच पार्श्वभूमीवर नितीन राऊत यांनी आज (26 ऑक्टोबर) राज्याला अखंडीत वीज पुरवठा करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ऐरोली येथील राज्य भार प्रेषक केंद्राला भेट दिली. या केंद्राचे कामकाज कसे चालते, याची पाहणी त्यांनी केली.

टाटा वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ऊर्जामंत्र्यांना मुंबई आयलँडिंग यंत्रणा नेमकी काय आहे आणि 12 ऑक्टोबरला नेमके काय घडले, याबद्दल माहिती दिली. यावेळी नितीन राऊत अधिकाऱ्यांवर चांगलेच भडकले (Energy Minister Nitin Raut angry on officers).

“मुंबईचे आयलँडिंग करणे आणि बाहेरुन मुंबईला होणारा वीज पुरवठा ठप्प झाल्यावर मुंबई शहराला अतिरिक्त वीज पुरवठा करणे ही जबाबदारी तुमच्यावर आहे. तुम्ही तुमच्या झालेल्या चुका का लपवत आहात? चुका झाल्या असतील तर त्या प्रामाणिकपणे कबूल करा. जर मुंबईत संसद असती आणि पंतप्रधान बोलत असताना वीज ठप्प झाली असती तर तुम्ही हेच उत्तर दिले असते का?”, असा सवाल नितीन राऊत यांनी केला.

नेमकं प्रकरण काय?

12 ऑक्टोबर रोजी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईच्या परिसरातील वीजपुरवठा एकाचवेळी खंडित झाल्यामुळे जनजीवन ठप्प झाले होते. रेल्वे वाहतूक, कार्यालयीन कामकाज, रुग्णालये, कोविड सेंटर आणि दैनंदिन व्यवहारांना वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे मोठा फटका बसला होता. देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत जवळपास तीन तास वीज नव्हती. त्यामुळे विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत तातडीची बैठक बोलावली होती. यानंतर तांत्रिक बिघाडाची चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले होते.

वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे मुंबईत खूपच गोंधळ पाहायला मिळाला होता. वीज नसल्याने अनेक भागांत मोबाईल आणि इंटरनेट सेवा ठप्प झाली होती. यामुळे घरुन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा फटका बसला. तर मुंबईची लाईफलाईन असणाऱ्या लोकल ट्रेनही वीज नसल्यामुळे ठप्प झाल्या होत्या. तर रुग्णालये आणि कोव्हिड सेंटर जनित्रावर चालवण्याची वेळ आली.

गेल्या दशकभरात मुंबईत इतक्या दीर्घकाळ वीजपुरवठा खंडित होण्याची ही चौथी वेळ आहे. आगामी काळात असे प्रकार घडणार नाहीत, यादृष्टीने आता सरकारी पातळीवर हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यासाठी काय काय सुधारणा करण्याची गरज आहे, याबाबतच्या पर्यायांवर आता नव्याने चर्चाही सुरु झाली आहे.

हेही वाचा : मुंबई-ठाण्यात वीजेचा ब्रेकडाऊन होणं ही शरमेची बाब; माजी ऊर्जामंत्र्यांचा सरकारवर हल्लाबोल