EXCLUSIVE: पुढील 3 आठवड्यात ‘हे’ संपेल असं नाही, पुढची तयारी ठेवावी लागेल : छगन भुजबळ

| Updated on: Mar 25, 2020 | 11:58 PM

पुढील 3 आठवड्यांमध्ये हे सर्व संपेल असंही नाही. पुढची तयारी ठेवावी लागेल, असं मत अन्न, नागरी पुरवठा मंत्री आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं आहे (Chhagan Bhujbal on supply of essential things).

EXCLUSIVE: पुढील 3 आठवड्यात हे संपेल असं नाही, पुढची तयारी ठेवावी लागेल : छगन भुजबळ
Follow us on

मुंबई : कोरोना संसर्गाच्या नियंत्रणासाठी देशभरात लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, पुढील 3 आठवड्यांमध्ये हे सर्व संपेल असंही नाही. पुढची तयारी ठेवावी लागेल, असं मत अन्न, नागरी पुरवठा मंत्री आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं आहे (Chhagan Bhujbal on supply of essential things). ते टीव्ही 9 मराठीच्या विशेष मुलाखतीत बोलत होते. यावेळी त्यांनी नागरिकांच्या मनातील अनेक प्रश्नांना दिलखुलास उत्तरं दिली. तसेच कोरोना निर्मुलनासाठी राज्य सरकारच्या प्रयत्नांची माहिती दिली.

छगन भुजबळ म्हणाले, “कोरोना संसर्गासाठी देशभरात लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, पुढील 3 आठवड्यांमध्ये हे सर्व संपेल असंही नाही. पुढची तयारी ठेवावी लागेल. नागरिक आणून आणून किती वस्तूंचा घरात साठा करणार आहेत? असं मला नागरिकांना विचारायचं आहे. माझं त्यांना सांगणं आहे की अन्नधान्य, औषधं, दुध-भाजीपाल्याचा साठा करण्याची गरज नाही. तुमच्या या वस्तू तुमच्या जवळच्या वितरण केंद्रावर पोहचवण्याची पूर्ण खबरदारी आम्ही घेणार आहोत.”


महाराष्ट्रात अन्नधान्याचा अजिबात तुटवडा नाही. 6 ते 8 महिने पुरेल इतकं अन्नधान्य आपल्या कोठारांमध्ये पडून आहेत, असंही छगन भूजबळ यांनी नमूद केलं. त्यांनी सध्या होत असलेल्या गोंधळाच्या स्थितीवरही भाष्य केलं. ते म्हणाले, “मंगळवारी (24 मार्च) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घोषणेनंतर पुढील काळात काही मिळणार नाही म्हणून बाहेर पडले, त्यामुळे झुंबड उडाली आणि दुकानांसमोर रांग्याच्या रांगा लागल्या. सर्व दुकानं रिकामी केली. आज गेल्यावर अनेकांना दुकानं रिकामी दिसली. मात्र, वितरण आणि पुरवठा 24 तास सुरु नसतो. त्याची एक व्यवस्था असते, त्यानुसारच गाड्या येतात आणि माल देतात.”

या काळात पुरवठा व्यवस्थाही काहीशी विस्कळीत झाली आहे. गुढीपाडवा असल्याने पुरवठा कर्मचाऱ्यांना सुट्टी आहे. जसे तुम्ही आम्ही घाबरतो तसे वितरण आणि पुरवठा करणारे व्यापारी आणि कामगारही घाबरतात. त्यांचीही कुटुंबं आहेत. त्यामुळे आपल्याला या अडचणीतून मार्ग काढायचा आहे. माझी आपल्याला विनंती हीच आहे की तुम्हाला सर्व 100 वस्तू आधीसारख्या मिळतील असं होऊ शकणार नाही. आपल्याला कोरोनासोबत लढायचं आहे तर काही गोष्टी सहन कराव्या लागतील. अत्यावश्यक वस्तू मिळण्यासाठी सरकार कटीबद्ध राहिल, असंही भूजबळ यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

महाराष्ट्रातील पहिले दोन रुग्ण ‘कोरोना’मुक्त, अजित पवारांकडून उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे आभार

Parle G कंपनीचा मदतीचा हात, पुढच्या 3 आठवड्यात 3 कोटी बिस्किट पुडे वाटणार

Corona | महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या 122 वर, मुंबईत 5 तर ठाण्यात 1 नवे रुग्ण

संबंधित व्हिडीओ:


Chhagan Bhujbal on supply of essential things