लासलगावच्या कांदा उत्पादकांसाठी रेल्वेचा मोठा निर्णय, रेल्वेच्या ‘पार्सल व्हॅन’द्वारे कांद्याची बांगलादेशला निर्यात

| Updated on: Jul 22, 2020 | 10:49 PM

बांगलादेशातून मोठ्या प्रमाणात कांद्याची मागणी वाढल्याने लासलगाव रेल्वे स्थानकातून 480 मेट्रिक टन कांदा बांगलादेशात निर्यातीसाठी रवाना होत आहे (Export of onions to Bangladesh by railway parcel van).

लासलगावच्या कांदा उत्पादकांसाठी रेल्वेचा मोठा निर्णय, रेल्वेच्या पार्सल व्हॅनद्वारे कांद्याची बांगलादेशला निर्यात
Follow us on

नाशिक : आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ मानल्या जाणाऱ्या लासलगाव येथून पार्सल व्हॅनच्या माध्यमातून प्रथमच बांगलादेशसाठी कांदा रवाना केला जात असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे (Export of onions to Bangladesh by railway parcel van). बांगलादेशातून मोठ्या प्रमाणात कांद्याची मागणी वाढल्याने लासलगाव रेल्वे स्थानकातून 480 मेट्रिक टन कांदा बांगलादेशात निर्यातीसाठी रवाना होत आहे.

लासलगाव येथून पार्सल व्हॅनच्या माध्यमातून प्रथमच कांदा निर्यात होत आहे. या उच्च क्षमता असलेल्या पार्सल व्हॅनमध्ये पावसाचे पाणी जाऊ शकत नाही. त्यामुळे कांदा टिकून राहण्यास मदत होणार आहे. यापूर्वी प्रवासी रेल्वे गाड्यांना पार्सल बोगी जोडून भाजीपाला, फळे आणि इतर मालाची वाहतूक होत असे. मात्र, आता प्रथमच लासलगाव रेल्वे स्थानकाहून पार्सल व्हॅनच्या माध्यमातून कांदा बांगलादेशसाठी रवाना करण्यात येत आहे (Export of onions to Bangladesh by railway parcel van).

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

लासलगाव येथून 20 पार्सल व्हॅनच्या माध्यमातून 480 मेट्रिक टन कांदा बांगलादेशच्या दर्शना येथे पाठवला जात आहे. यासाठी लासलगाव रेल्वे स्थानकावर कांदा लोडिंगचे काम सुरु आहे. आगामी काळात अशीच निर्यात सुरु राहिली तर कोसळणाऱ्या कांद्याच्या दरात सुधारणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रेल्वे मंत्रालयाने शेतमाल देशात आणि देशाबाहेर पाठविण्यासाठी पार्सल व्हॅन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे देशातील जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरु राहण्यास मोठी मदत होणार आहे. रेल्वे प्रशासन प्रवासी सेवा रद्द असल्याने नव्या उपाययोजना करुन उत्पन्न वाढविण्याचे प्रयत्न करताना दिसत आहे.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

भारतासह जगभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातल्याने देशासह जागतिक बाजारपेठेत कांद्याची मागणी घटली. कांद्याचे बाजारभाव एक हजार रुपयांच्याआत आल्याने कांदा उत्पादक आर्थिक संकटात सापडला आहे. दरम्यान, केंद्र सरकारच्या ग्राहक संरक्षण मंत्रालयाने ग्राहकांच्या हितासाठी नाफेडमार्फत 50 हजार मेट्रिक टन कांद्याची खरेदी सुरु केली आहे. मात्र, तरीही कांद्याच्या बाजारभावात कुठलीही मोठी वाढ झाली नाही.