बारामतीत कोरोनाचा पहिला बळी, भिलवाडा पॅटर्न राबवण्यास सुरुवात, अजित पवारांच्या सूचना

| Updated on: Apr 09, 2020 | 5:29 PM

बारामती शहरातील समर्थनगर भागात कोरोना रुग्णाचा पहिला बळी गेला. त्यामुळं प्रशासनानं कठोर पावलं टाकत आजपासून शहरात 'नो मुव्हमेंट' लागू करण्यात (corona patient death baramati) आली आहे.

बारामतीत कोरोनाचा पहिला बळी, भिलवाडा पॅटर्न राबवण्यास सुरुवात, अजित पवारांच्या सूचना
Follow us on

बारामती : बारामती शहरातील समर्थनगर भागात कोरोना रुग्णाचा पहिला बळी गेला. त्यामुळं प्रशासनानं कठोर पावलं टाकत आजपासून शहरात ‘नो मुव्हमेंट’ लागू करण्यात (corona patient death baramati) आली आहे. त्यानुसार ज्या वाहनांना परवानगी असेल त्यांनाच रस्त्यावर धावता येणार आहे. दुसरीकडे नागरिकांनी घराबाहेर पडू नये यासाठी अत्यावश्यक साहित्य घरपोच देण्याची सुविधाही कार्यान्वित केली जाणार आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या सूचनेनुसार शहरात भिलवाडा पॅटर्नही राबवण्यात येणार आहे. त्याची प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात आल्याची माहिती प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे (corona patient death baramati) यांनी दिली.

“बारामतीमधील भाजी विक्रेत्या ज्येष्ठ नागरिकाला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्याच्या मुलासह सुनेला आणि नंतर दोन नातींना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले होते. काल (8 एप्रिल) रात्री या भाजी विक्रेत्या ज्येष्ठ नागरिकाचा उपचारादरम्यान, मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाने कठोर पावलं उचलत शहरात सर्वत्र नाकेबंदी करण्यात आली आहे”, असं प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी सांगितले.

भिलवाडा पॅटर्न म्हणजे काय?

“बारामतीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार भिलवाडा पॅटर्न राबवण्यात येत आहे. यामध्ये घरोघरी जाऊन सर्वच कुटुंबांची तपासणी, सर्वत्र नाकाबंदी, नागरिकांना घरपोच अत्यावश्यक सेवा अशा अनेक बाबी राबवण्यात येतात”, असं दादासाहेब कांबळे यांनी सांगितले.

“कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी घरातून बाहेर न पडता स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, अन्यथा प्रशासकीय कारवाईला सामोरे जावे लागेल”, असा इशाराही प्रांताधिकाऱ्यांनी दिला.

बारामतीत कोरोनाचा पहिला बळी गेल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र तरीही काही लोक लॉकडाऊनचे काटेकोर पालन करत नसल्याने प्रशासनाने आता ‘नो मुव्हमेंट’ लागू करत नाहक फिरणाऱ्यांना ब्रेक लावण्यासाठी पावलं उचलली आहेत. दुसरीकडे नागरिकांना अत्यावश्यक सेवा घरपोच देऊन रस्त्यावरील वर्दळ पूर्णपणे थांबवली जाणार आहे.

दरम्यान, राज्यसह देशात कोरोना विषाणूचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यात आतापर्यंत एक हजारापेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर देशात पाच हजारपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत.