जम्मू काश्मीर : कूपवाडा जिल्ह्यातील हंदवाडा येथे भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु असून, यात आतापर्यंत 5 जवान शहीद झाले आहेत. शहिदांमध्ये सीआरपीएफच्या जवानांसह जम्मू-काश्मीरच्या पोलिसांचाही समावेश आहे. हंदवाडा भागात दहशतवादी आणि भारतीय जवानांमध्ये अजूनही चकमक सुरु आहे.
दहशतवादी हंदवाडा येथील रहिवाशी भागातील घरांमध्ये लपल्याची माहिती भारतीय जवानांना मिळाली होती. त्यानंतर जवानांनी परिसराला घेराव घातला आणि सर्च ऑपरेशन सुरु केलं. दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरु केला. त्यानंतर जवानांनीही चोख प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. मात्र, या चकमकीत भारताचे पाच जवान शहीद झाले.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघ होत आहे. शिवाय, दहशतवाद्यांनीही धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे भारत-पाकिस्तान सीमेवर सध्या एकंदरीतच तणावाचं वातावरण आहे.
पुलवामा हल्ला
14 फेब्रुवारी 2019 रोजी पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला केला. जैशच्या दहशतवाद्याने घडवलेल्या आयईडी स्फोटात 40 जवान शहीद झाले. त्यानंतर भारताने या हल्ल्याचा बदला म्हणून पाकिस्तानच्या हद्दीत घुसून जैशच्या दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केले. एक हजार किलोचा बॉम्ब भारताने जैशच्या तळांवर टाकला.
एकंदरीतच गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान सीमेवर काहीसं तणावाचं वातावरण आहे. त्यात दहशतवाद्यांकडून सातत्याने होणारा गोळीबार या तणावात अधिक भर घालत आहे.