पक्षात कुणालाही कोणतंही पद मिळतं, फाईव्ह स्टार कल्चरने निवडणुका जिंकता येत नाहीत; आझाद यांचे खडेबोल

| Updated on: Nov 22, 2020 | 7:04 PM

ज्येष्ठ काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांच्यापाठोपाठ आता आणखी एक ज्येष्ठ काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षाला खडेबोल सुनावले आहेत. (five star culture among leaders stopping Congress from winning elections: Ghulam Nabi Azad)

पक्षात कुणालाही कोणतंही पद मिळतं, फाईव्ह स्टार कल्चरने निवडणुका जिंकता येत नाहीत; आझाद यांचे खडेबोल
Follow us on

नवी दिल्ली: ज्येष्ठ काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांच्यापाठोपाठ आता आणखी एक ज्येष्ठ काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षाला खडेबोल सुनावले आहेत. पक्षात कुणालाही कोणतंही पद दिलं जातं. त्यामुळे पक्षाची कामगिरी अत्यंत वाईट झाली आहे. त्यासाठी आपण कामाची पद्धत बदलायला हवी, अशा शब्दांत गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसला खडेबोल सुनावले आहेत. (five star culture among leaders stopping Congress from winning elections: Ghulam Nabi Azad)

गुलाम नबी आझाद यांनी पक्षाच्या फाईव्ह स्टार कल्चरवरही हल्लाबोल केला. कोणतीही निवडणूक फाईव्ह स्टार कल्चरने लढवली जात नाही. आज नेत्यांना तिकीट मिळताच ते फाईव्ह स्टार हॉटेल बुक करतात. जोपर्यंत पक्षातील हे फाईव्ह स्टार क्लचर बदललं जात नाही. तोपर्यंत निवडणुका जिंकता येणार नाहीत, असं गुलाम नबी आझाद म्हणाले.

यावेळी आझाद यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांवरही हल्लाबोल केला. पदाधिकाऱ्यांना आपली जबाबदारी समजली पाहिजे. जोपर्यंत पक्षात पदाधिकारी नियुक्त केले जातील तोपर्यंत हे असंच चालणार. पक्षांतर्गत निवडणुका घेऊन पदाधिकारी निवडून आले तरच त्यांना त्यांची जबाबदारी समजेल. आता तर पक्षात कुणालाही कोणतंही पद दिलं जातं, असंही ते म्हणाले.

नेत्यांचा कार्यकर्त्यांशी संपर्क तुटला

जोपर्यंत आपल्या पदाधिकाऱ्याला आपल्या पदाबाबतचं प्रेम वाटत नाही, तोपर्यंत ते यशस्वी होणार नाहीत, असं सांगतानाच त्यांनी पक्षावर अनेक आरोपही केले आहेत. पक्षातील बड्या नेत्यांचा कार्यकर्त्यांशी संपर्कच राहिला नाही, असं सांगतानाच राष्ट्रीय पक्षाची विचार करण्याची पद्धतही राष्ट्रीयच असावी, असंही ते म्हणाले.

लोकसभेत आम्हाला विरोधी पक्षनेतेपदही मिळालेलं नाही. आज काँग्रेसची वाईट अवस्था झाली आहे. जोपर्यंत कामाच्या पद्धतीत बदल होत नाहीत. तोपर्यंत हे चित्रं बदलणार नाही, असं सांगतानाच सध्या पक्षात ब्लॉक अध्यक्षांपासून ते जिल्हाध्यक्षांपर्यंतीच शेकडो पदं रिक्त आहेत. पदं जर अशीच रिक्त राहणार असतील तर आपण निवडणुका कशा जिंकू?, असा सवालही त्यांनी केला आहे.

 

संबंधित बातम्या:

विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस कमजोर; कपिल सिब्बलांचा पुन्हा एकदा घरचा आहेर

मी गांधी कुटुंबाविरोधात नाही, केवळ काँग्रेस कार्यकर्त्यांचा आवाज पोहचवतो आहे : कपिल सिब्बल

पदवीधर निवडणुकांनंतर महाराष्ट्रातील सरकार बदलणार, प्रवीण दरेकरांचं मोठं विधान

(five star culture among leaders stopping Congress from winning elections: Ghulam Nabi Azad)