नरभक्षक वाघाला पकडण्यासाठी वन कर्मचाऱ्यांना चक्क पिंजऱ्यात बसण्याची ड्युटी

| Updated on: Oct 17, 2020 | 8:28 PM

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा परिसरातल्या नरभक्षक RT1 वाघासंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

नरभक्षक वाघाला पकडण्यासाठी वन कर्मचाऱ्यांना चक्क पिंजऱ्यात बसण्याची ड्युटी
Follow us on

चंद्रपूर : जिल्ह्यातील राजुरा परिसरातल्या नरभक्षक RT1 वाघासंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा वाघ जेरबंद करण्यासाठी दबाव वाढत असताना चक्क वन कर्मचाऱ्यांना पिंजऱ्यात बसण्याची ड्युटी लावल्या जात आहेत. एकीकडे वाघाने आठ नागरिकांचे बळी घेतले असताना वन कर्मचाऱ्यांना प्रत्येकी आठ तास पिंजऱ्यात बसण्याची ड्युटी लावण्यात आली आहे. (Forest Department employees put on duty to sit in a cage To catch Man eating tiger RT1 in Chandrapur)

वन कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी या प्रकाराचा विरोध केला आहे. तर दुसऱ्या बाजूला वरिष्ठ वनाधिकार्‍यांनी मात्र वन कर्मचारी स्वतंत्र व वेगळ्या ठिकाणी असलेल्या सुरक्षित पिंजऱ्यात बसणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा, विरूर वनपरिक्षेत्रात नरभक्षक RT1 वाघाने गेल्या वर्षभरापासून धुमाकूळ घातला आहे. आजवर या वाघाने आठ शेतकऱ्यांना ठार केले आहे तर दोघांना कायमचे अपंग केले आहे. वाघाला गोळ्या घाला अशी मागणी चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांच्यासह परिसरातील लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी केली आहे.

वनविभागाने या वाघाला पकडण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. 150 च्या आसपास कॅमेरे या परिसरात लावले असून वन कर्मचाऱ्यांचे पथक दिवसरात्र नरभक्षक वाघाचा शोध घेत आहेत. मात्र, अजूनही वाघाला जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले नाही.

एकूण 21 गावे या वनपरिक्षेत्रात येतात. गेले वर्षभर प्रयत्न करूनही हा नरभक्षक वाघ जेरबंद करण्यात वनविभाग अपयशी ठरला आहे. आता या वाघाला जवळून बेशुद्धीचे इंजेक्शन देण्यासाठी वन कर्मचाऱ्यांना पिंजऱ्यातच दुसऱ्या टोकाला बसवले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासाठी वन कर्मचाऱ्यांच्या तीन शिफ्टमध्ये ड्युटी लावण्यात आल्या असून यात शारीरिकदृष्ट्या अक्षम असलेले वन कर्मचारी व मजूर यांचीदेखील ड्युटी लावण्यात आली आहे.

कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी या कृतीचा निषेध केला आहे तर दुसरीकडे वन कर्मचाऱ्यांना वाघाच्या पिंजऱ्यात नव्हे तर स्वतंत्र व उंचीवरच्या पिंजऱ्यात बसविले जात असल्याचा खुलासा विभागीय वनाधिकारी अरविंद मुंडे यांनी केला आहे.

विभागीय वनाधिकारी अरविंद मुंडे म्हणाले की, “या भागातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी लावलेल्या कॅमेऱ्यांमधून दररोज वाघाच्या हालचाली टिपून घेतल्या जातात. त्यानुसार शेतकऱ्यांना सूचना दिल्या जातात. वाघाच्या हालचालींवर आमचे लक्ष आहे”.

या भागातील मुख्य व्यवसाय शेती आहे. सध्या खरीपाचा हंगाम सुरू आहे. या क्षेत्रात कापूस, धान, सोयाबीन या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. वाघाच्या दहशतीत शेतकरी घाबरलेल्या स्थितीत आहेत. जीव मुठीत घेऊन शेतकरी कामे करीत आहेत. वाघाला जेरबंद करणारी वनविभागाची पथके सुस्त आहेत. 11 महिन्यांतरदेखील नरभक्षक वाघ जेरबंद झालेला नाही. मोहिमेत वनविभागाला सपशेल अपयश आले आहे.

इथून पुढचे 2 महिने ग्रामस्थांचा शेत शिवारात मुक्काम असणार आहे. कापणीला आलेल्या पिकांची व्यवस्था व रब्बी हंगामासाठी शेत तयार करणे ही कामे हाती घेतली जाणार आहेत. याच काळात वाघाच्या दहशतीखाली असलेला राजुरा परिसरातील शेतकरी मात्र शेतापासून दूर राहणार असल्याचे सध्यातरी दिसत आहे. त्यामुळे वन विभागावर RT1 वाघाबाबत तातडीने निर्णय घेण्याचा दबाव वाढत आहे.

संबंधित बातम्या

‘झाडाला मिठी मारणारी वाघीण ते लांब नाकाचं माकड’, ‘या’ फोटोंनी केवळ पुरस्कारच नाही तर लोकांची मनंही जिंकली

Chandrapur Tiger Attack | राजुरात वाघाचा धुमाकूळ, 7 ग्रामस्थांचा बळी

Chandrapur | चंद्रपुरातील RT1 वाघिणीला गोळ्या घाला , खासदार बाळू धानोरकरांची वनमंत्र्यांकडे मागणी

(Forest Department employees put on duty to sit in a cage To catch Man eating tiger RT1 in Chandrapur)