इंग्लंडचा दिग्गज क्रिकेटर भारतातील शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ मैदानात, सरकारला विचारला जाब

| Updated on: Nov 30, 2020 | 3:08 PM

केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाबचे शेतकरी आक्रमक होत दिल्लीत पोहोचले आहेत. केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घ्यावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

इंग्लंडचा दिग्गज क्रिकेटर भारतातील शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ मैदानात, सरकारला विचारला जाब
Follow us on

मुंबई : केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात (Agricultural law) पंजाबचे शेतकरी आक्रमक होत दिल्लीत पोहोचले आहेत. केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घ्यावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. पंजाबच्या आंदोलक शेतकऱ्यांचे (farmers protest) पाचव्या दिवशीदेखील दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरु आहे, तसेच गेल्या दोन महिन्यांपासून पंजाबमध्ये हे आंदोलन सुरु आहे.

शेतकऱ्यांच्या या लढ्याची झळ दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय माध्यमं आणि इतर देशांमधील अनेक मोठ्या व्यक्तींनी या आंदोलनाची दखल घेतली आहे. इंग्लंडचा एक माजी दिग्गज क्रिकेटपटू या आंदोलनात शेतकऱ्यांच्या बाजूने उभा ठाकला आहे. (Former England spinner Monty Panesar Supports farmers protest in India)

इंग्लंडचा माजी क्रिकेटर मॉन्टी पानेसर याने ट्विट करुन शेतऱ्यांचं समर्थन केलं आहे, तसेच त्याने शेतकऱ्यांच्या सुरक्षेबाबत सरकारला सवाल केला आहे. पानेसरने ट्विटमध्ये लिहिलं आहे की, “जर खरेदीदार किंवा व्यापारी शेतमाल खरेदी करताना म्हणाला की, आपलं कंत्राट पूर्ण होऊ शकत नाही. ज्याप्रमाणे सांगण्यात आले होते, तशी या शेतमालाची गुणवत्ता नाही. अशा परिस्थितीत शेतकरी काय करतील. शेतमालाची किंमत ठरवण्यासाठीचा कोणताही पर्याय त्यांच्याकडे नाही”.

पानेसरने अजून एक ट्विट केलं आहे, त्यात त्याने म्हटलं आहे की, “शेतकरी तिन्ही कृषी कायद्यांना विरोध करत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की, हे कायदे एमएसपी सिस्टिम संपवतील. या कायद्यांमुळे शेतकरी बड्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या दयेवर विसंबून राहील”.

हरभजन सिंहदेखील शेतकऱ्यांच्या समर्थनात

हरभजनने ट्विट केलं होतं की, शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की, सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घ्यावेत आणि नवे कायदे आणून शेतकऱ्यांना एमएसपीची खात्री द्यावी. परंतु सरकार शेतकऱ्यांची ही मागणी मान्य करत नाही. त्यामुळेच हजारोंच्या संख्येने शेतकरी दिल्लीच्या दिशेने निघाले आहेत. अजून एका ट्विटमध्ये हरभजनने लिहिलं आहे की, शेतकरी आमचा अन्नदाता आहे. आपण त्यांना थोडा वेळ द्यायला हवा, त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं लागेल.

भारतीय वंशाच्या मॉन्टी पानेसरने 2006 साली इंग्लंडकडून क्रिकेट कारकीर्दीला सुरुवात केली होती. 50 कसोटी, 26 एकदिवसीय आणि एका टी-20 सामन्यात त्याने इंग्लंडच्या संघाचे प्रतिनिधीत्व केलं आहे. त्यात त्याने अनुक्रमे 167, 24 आणि 2 बळी मिळवले आहेत.

दरम्यान, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी कृषी कायद्यांवरुन केंद्र सरकारवर टीका केली आहे. काँग्रेसने स्पीक अप इंडिया अभियानांतर्गत शेतकऱ्यांना पाठिांबा देण्यासाठी #Speakupforfarmers अभियान सुरु केले आहे. या अभियानांतर्गत प्रियांका गांधी यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे

प्रियांका गांधी यांनी ट्विटमधून केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, कायद्यांचे नाव कृषी कायदे ठेवण्यात आले आहे, पण फायदा अब्जाधीश मिंत्राचा होणार आहे.

संबंधित बातम्या: 

शेतकरी आंदोलकांकडून दिल्ली जाम करण्याचा इशारा; नड्डांच्या घरी रात्री उशिरा बैठक

आंदोलनाचं ठिकाण बदलण्याच्या अटी अमान्य, शेतकऱ्यांनी अमित शाह यांच्या चर्चेचं आमंत्रण फेटाळलं