मुलीने पळून जाऊन लग्न केल्याचा राग, आई-वडील, भावाची विहिरीत उडी मारुन आत्महत्या

| Updated on: Feb 10, 2020 | 7:13 PM

मुलीने पळून जाऊन लग्न केल्याने संपूर्ण कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार गडचिरोलीत (Gadchiroli family suicide) घडला.

मुलीने पळून जाऊन लग्न केल्याचा राग, आई-वडील, भावाची विहिरीत उडी मारुन आत्महत्या
Follow us on

गडचिरोली : मुलीने पळून जाऊन लग्न केल्याने संपूर्ण कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार गडचिरोलीत (Gadchiroli family suicide) घडला. एकाच कुटुंबातील तिघांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. मुलीने पळून जाऊन लग्न केल्याने, आई, वडील आणि भावाने आत्महत्या केली. गडचिरोली शहरातील विवेकानंदनगर इथं ही थरारक घटना घडली.

रवींद्र नागोराव वरगंटीवार (50), वैशाली रवींद्र वरगंटीवार (43) आणि साईराम रवींद्र वरगंटीवार (19) अशी आत्महत्या केलेल्यांची नावं आहेत. वरगंटीवार यांच्या 24 वर्षीय मुलीने अन्य जातीतील मुलाशी लग्न केल्याच्या रागातून, आई, वडील आणि भावाने आत्महत्या केली.

रवींद्र वरगंटीवार यांच्या मुलीचे अन्य जातीतील मुलासोबत प्रेमसंबंध होते. मुलीने प्रेम विवाह करण्यासाठी वडिलांची परवानगी मागितली. मात्र, घरच्यांना ही बाब मान्य नसल्याने त्यांनी नकार दिला. पण, प्रेमविवाह करणार असल्याचे ठामपणे सांगून संबंधित मुलगी शनिवारी सांयकाळी पळून गेली. यानंतर तिने मार्कंडादेव मंदिरात विवाह केल्याचं घरच्यांना (Gadchiroli family suicide) समजलं.

या प्रकाराने वरगंटीवार कुटुंब अस्वस्थ होतं. अनेकांनी त्यांची समजूत काढली, मात्र त्यांचा राग कायम होता. यात रागाच्या तणावातून त्यांनी टोकाचं पाऊल उचललं.

दुपारी तीनच्या सुमारास तिघांनीही विवेकानंद नगर परिसरातील मोकळ्या जागेतील विहिरीत आत्महत्या केली. सोबत आणलेले साहित्य काठावर ठेऊन त्यांनी विहिरीत उड्या घेतल्या.

याबाबतचं वृत्त समजताच अनेकांनी घटनास्थळी गर्दी केली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तिघांचेही मृतदेह बाहेर  (Gadchiroli family suicide) काढले.