पुलवामा हल्ला : कुणी सुट्टी संपवून परतलं होतं, तर कुणाचं लग्न ठरलं होतं

| Updated on: Jul 05, 2019 | 4:26 PM

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पुलवामात झालेल्या भ्याड हल्ल्यात देशाचे 40 सुपुत्र शहीद झाले. यामध्ये महाराष्ट्रातील बुलडाण्यातील दोन जवानांचाही समावेश आहे. उत्तर प्रदेशातील कौशल कुमार रावत आणि प्रयागराजमधील महेश कुमार यांनाही या हल्ल्यात वीरमरण आलंय. तर घरातला एकुलता एक मुलगा असलेले रोपरचे कुलविंदर सिंह हेही शहीद झाले. या जवानांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. तीन दिवसांपूर्वीच […]

पुलवामा हल्ला : कुणी सुट्टी संपवून परतलं होतं, तर कुणाचं लग्न ठरलं होतं
Follow us on

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पुलवामात झालेल्या भ्याड हल्ल्यात देशाचे 40 सुपुत्र शहीद झाले. यामध्ये महाराष्ट्रातील बुलडाण्यातील दोन जवानांचाही समावेश आहे. उत्तर प्रदेशातील कौशल कुमार रावत आणि प्रयागराजमधील महेश कुमार यांनाही या हल्ल्यात वीरमरण आलंय. तर घरातला एकुलता एक मुलगा असलेले रोपरचे कुलविंदर सिंह हेही शहीद झाले. या जवानांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय.

तीन दिवसांपूर्वीच कर्तव्यावर रुजू

आग्रा येथील कौशल कुमार रावत हे तीन दिवसांपूर्वीच सुट्टी संपवून पुन्हा कर्तव्यावर रुजू झाले होते. कौशल कुमार शहीद झाल्याची बातमी येताच संपूर्ण गावाने रावत कुटुंबीयांकडे धाव घेतली. कौशल कुमार यांच्या वृद्ध आई-वडिलांची स्थिती अत्यंत खराब आहे. संपूर्ण गाव त्यांच्या दुःखात सहभागी झालंय.

कौशल यांच्या मोठ्या भावाने याबाबत माहिती दिली. कौशल कुमार हे 1991 साली भरती झाले होते. त्यांना दोन मुलं आणि एक मुलगी आहे. मुलीचं लग्न झालेलं आहे. तर पत्नी मुलांसोबत गुरुग्राममध्ये राहते. जानेवारी अखेर त्यांची बदली सिलीगुडी येथून जम्मू काश्मीरला झाली होती. बदलीनंतर ते 15 दिवसांच्या सुट्टीवर आले. 12 फेब्रुवारीलाच नव्या ठिकाणी कर्तव्यावर रुजू झाले होते.

कौशल कुमार यांची बुधवारी सायंकाळीच मोठ्या भावाशी बातचीत झाली होती. कर्तव्यावर रुजू झालो नसून अजून रस्त्यातच असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. आपण ठिक असून बर्फ पडत असल्यामुळे गाड्या थांबवल्याचं ते फोनवर म्हणाले. पुढच्या काही तासातच भाऊ शहीद झाल्याची बातमी कानावर आली.

“पाकिस्तानकडून बदला घ्या”

प्रयागराजमधील एक सुपुत्रही या हल्ल्यात शहीद झाला. प्रयागराजपासून 40 किमी अंतरावर असलेल्या एका गावातील सीआरपीएफ जवान महेश कुमार जम्मू काश्मीरमध्ये कर्तव्यावर होते. त्यांच्या पश्चात दोन मुलं आहेत. मुलगा शहीद झाल्याची बातमी येताच महेश यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. देशासाठी जीव देणाऱ्या या सुपुत्राचे कुटुंबीय आता न्याय मागत आहेत.

एकुलत्या एक मुलाचं नऊ महिन्यांनी लग्न होतं

हरियाणातील कुलविंदर सिंह हे देखील पुलवामा हल्ल्यात शहीद झाले. कुलविंदर सिंह हे त्यांच्या कुटुंबाचे एकुलते एक चिरंजीव होते. शिवाय घरातील ते एकमेव कमावते व्यक्ती होते. 11 नोव्हेंबर रोजी त्यांचं लग्न ठरलं होतं. लग्न ठरल्यापासून घरात आनंदाचं वातावरण होतं, पण नियतीला वेगळंच मान्य होतं. चार वर्षांपूर्वीच कुलविंदर सीआरपीएफमध्ये रुजू झाले होते.

घरात आजारी असेलली आई आहे, तर वडील ट्रक ड्रायव्हर आहेत. वाहन परवाना संपल्यामुळे ते सध्या घरातच बसून आहेत. सोबतच आजोबाही कुटुंबात आहेत. गावचा सुपुत्र देशासाठी शहीद झाल्याचा अभिमान असला तरी काही महिन्यांवर लग्न आलेलं असताना वृद्ध आई-वडिलांना मुलगा सोडून गेल्यामुळे गावातील प्रत्येकाला अश्रू अनावर झाले आहेत.

पाहा व्हिडीओ :