Kolhapur Rain | कोल्हापुरात पावसाचा हाहा:कार, आधीच महापूर, त्यात राधानगरीचे दरवाजे उघडले

| Updated on: Aug 06, 2019 | 10:26 AM

कोल्हापूर आणि सांगलीत पावसाचा हाहा:कार पाहायला मिळत आहे. कोल्हापूर शहरात पंचगंगा नदीचे पाणी घुसलं आहे. इतकंच नाही तर नदीचं पाणी पुणे-बंगळुरु महामार्गावर आल्याने, दोन्ही बाजूची वाहतूक रखडली.

Kolhapur Rain | कोल्हापुरात पावसाचा हाहा:कार, आधीच महापूर, त्यात राधानगरीचे दरवाजे उघडले
Follow us on

Kolhapur Rain कोल्हापूर : मुंबईसह उपनगरात पावसाने विश्रांती घेतली असली तरीही पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी, औरंगाबाद, सांगली यासह इतर ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. कोल्हापूर आणि सांगलीत पावसाचा हाहा:कार पाहायला मिळत आहे. कोल्हापूर शहरात पंचगंगा नदीचे (Panchaganga River) पाणी घुसलं आहे. इतकंच नाही तर नदीचं पाणी पुणे-बंगळुरु महामार्गावर आल्याने, दोन्ही बाजूची वाहतूक रखडली. पुण्यावरुन बंगळुरुकडे जाणारी वाहने किणी टोल नाक्याजवळ तर बंगळुरुकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक कोगनोळी टोल नाक्याजवळ रोखण्यात आली.

कोल्हापूर (Kolhapur) शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. धरण क्षेत्रात धुवाँधार पाऊस होत आहे. राधानगरी धरणाचे सर्व दरवाजे आधीच उघडले आहेत, त्यात आपत्कालिन दरवाजा उघडल्याने, आधीच महापूर आलेल्या पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत पुन्हा वाढ झाली आहे. त्याचा परिणाम नागरी वस्त्यांवर झालाच आहे, शिवाय राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 पुणे-बंगळुरु महामार्गालाही फटका बसला. सकाळपासून इथली वाहतूक ठप्प आहे.

सततच्या पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत असून सध्या पंचगंगा नदीची (panchganga river) पाणीपातळी 50 फूट 9 इंचावर गेली आहे. तसेच 107 बंधारे पाण्याखाली गेले असून जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.

कोल्हापुरातील 10 हजार लोकांचे स्थालांतर करण्यात आले. पाण्याची आवाक जास्त असल्याने राधानगरी धरणाचा आपत्कालीन दरवाजा उघडण्यात येत आहे. कोल्हापुरात एनडीआरएफच्या दोन तुकड्या दाखल करण्यात आल्या आहेत. यामुळे 2005 पेक्षाही भयानक परिस्थिती कोल्हापुरात निर्माण झाली आहे.

“आपल्या घरी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवा, पंपिंग स्टेशन बुडाले असल्याने पाणी जपून वापरा अशी विनंती सोशल मीडियाच्या माध्यमातून  केली जात आहेत. तसेच कोल्हापुरातील तीन पेट्रोल पंपावर पेट्रोल संपले असल्याने गाडीत आवश्यक पेट्रोल भरुन ठेवा. त्याशिवाय घरात भाजीपाला, दूध यासारख्या आवश्यक वस्तू घरात आणून ठेवा, असेही आवाहन नागरिकांना केले जात आहे.

दरम्यान किणी येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या तीन शेतमजूरांची सुखरुप सुटका वडगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदिप काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने स्वःता पोहत जाऊन केली. रामचंद्र सुतार, चिंगूबाई सुतार व मुलगा सिद्धार्थ अशी सुटका करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.

पुणे-बंगळुरु महामार्ग अद्याप बंद

त्याशिवाय नद्यांचे पाणी राष्ट्रीय महामार्गावर आल्याने पुणे-बंगळुरु महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे बंगळूरच्या दिशेने जाणारी वाहने ही किणी टोल नाका या ठिकाणी थांबली आहेत. तर पुण्याकडे जाणारी वाहने कोगनोळी टोल नाक्यावर थांबवली आहे.

दरम्यान पुणे धरण परिसरात पाऊस कमी झाला असल्याने खडकवासाला धरणातून 45 हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्याशिवाय पानशेत, वरसगाव या दोन्ही धरणातून ही विसर्ग सुरु आहे. त्यामुळे पुण्यातील भिडे, टिळक पूल यांसह इतर 6 पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहे. त्यामुळे पुण्यातील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

सांगलीत कृष्णा नदीला महापूर

तर दुसरीकडे सांगलीत सततच्या पावसामुळे कृष्णा नदीला महापूर आला आहे. आज सकाळी 6 वाजेपर्यंत कृष्णा नदीची पाणीपातळी 49 फुटांपर्यंत पोहोचली आहे. तसेच यामुळे वारणा आणि कृष्णा नदीला पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान या भीषण पूरपरिस्थितीमुळे मदतीसाठी NDRF ची टीम दाखल होणार आहे.

मुंबई-गोवा महामार्ग ठप्प 

रत्नागिरी जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे चिपळूणला पुराच्या पाण्याचा धोका  निर्माण झाला आहे. तसेच मुसळधार पावसामुळे शहरात पुराचे पाणी शिरण्यास सुरुवात झाली असून जुना बस स्टँड, चिंचनाका, खेर्डी , भाजी मार्केट या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. तसेच पावसाचा जोर अद्याप कायम असल्याने अनेक भागातील बस सेवा कोलमडली. त्याशिवाय पावसामुळे मुंबई – गोवा महामार्ग ठप्प झाला असून चिपळूण ,कराड मार्ग ही बंद करण्यात आले आहेत

औरंगाबादलाही पुराचा विळखा

सततच्या पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. त्यामुळे औरंगाबादेतील कायगाव टोका परिसरातील मंदिरांना पाण्याचा विळखा बसला आहे. तर औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर गंगापूर तालुक्यातील घरांमध्ये आणि शेतांमध्ये पाणी घुसले आहे. त्यामुळे नगर आणि औरंगाबाद जिल्ह्यातील काही गावांचा संपर्क तुटला असून जवळपास 17 गावांना पुराचा फटका बसला आहे. दरम्यान शासनाच्या वतीने मदतकार्य सुरु केले आहे.