पुणे : उद्यापासून महाराष्ट्रात बारावीच्या परीक्षेला सुरुवात होत आहे. 21 फेब्रुवारी ते 20 मार्च 2019 पर्यंत बारावीची परीक्षा घेतली जाणार आहे. यामध्ये एकूण 14 लाख 91 हजार 306 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. तर 9771 कनिष्ठ महविद्यालयात ही परीक्षा होणार आहे. विशेष म्हणजे यावर्षी परीक्षेच्या काळात गैर प्रकार टाळण्यासाठी व्हिडीओ चित्रीकरण करण्याचा निर्णय शिक्षक विभागाने केला आहे. हा निर्णय 10 वीच्या बोर्ड परीक्षेसाठीही लागू आहे.
बारावीच्या परीक्षेसाठी झेडपी शिक्षण विभागाने नियोजन आखले आहे. यामध्ये 11 पर्यवेक्षक केंद्र असणार आहेत. शहरात 9 आणि जिल्ह्यात 2 केंद्र असतील. या केंद्रामार्फत प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकांचे वितरण होणार आहे. तसेच शहरांमध्ये 30 आणि ग्रामीण भागात 60 असे एकूण 96 परीक्षा केंद्रावर 53 हजार 156 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
प्रवेशपत्रावर मराठी आणि इंग्रजीतून सूचना असणार आहेत. तसेच दिव्यांग मुलांना काही पेपरला कॅलक्यूलेटर वापरण्यास परवानगी दिली आहे. या होणाऱ्या परीक्षेमध्ये सोपिया महाविद्यालयातील विद्यार्थिनी निशिका हसन गडी ही आयपॅडवर परीक्षा देणार आहे. उद्यापासून बारावीच्या परीक्षेला सुरवात होत आहे. यावर्षीपासून सर्वच विभागात ऑनलाईन हॉल तिकीट मिळणार आहेत. तसेच पीसीएमबी अर्थात भौतिकशास्त्र, रसा़यनशास्त्र, जीवशास्त्र, गणित या विषयांच्या प्रश्नपत्रिकांच्या आराखड्यात बदल करण्यात आला आहे.
परीक्षा पारदर्शी होण्यासाठी आणि गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथके, बैठे पथके यांचा केंद्रावर अंकुश असणार आहे. जर गैरप्रकार करताना कोणता विद्यार्थी आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. परीक्षा व्यवस्थित पार पडाव्यात यासाठी शिक्षण विभागाने आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत.