हैदराबादमध्ये पावसाचं रौद्र रुप, 50 लोकांचा वाहून मृत्यू; हवामान खात्याकडून अलर्ट

| Updated on: Oct 18, 2020 | 8:42 AM

शहराच्या अनेक भागांमध्ये शनिवारी संध्याकाळी मुसळधार पावसाला सुरूवात झाली, ज्यामुळे रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली तर काही वेळातच रस्त्यांवर पाणी साचायला सुरुवात झाली.

हैदराबादमध्ये पावसाचं रौद्र रुप, 50 लोकांचा वाहून मृत्यू; हवामान खात्याकडून अलर्ट
Follow us on

हैदराबाद: सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हैदराबादमध्ये महापूर (Hyderabad flood) आल्यासारखी परिस्थिती झाली आहे. तब्बल 50 लोकांचा यामुळे मृत्यू झाला आहे तर हजारो नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. शहराच्या अनेक भागांमध्ये शनिवारी संध्याकाळी मुसळधार पावसाला (Heavy Rain) सुरूवात झाली, ज्यामुळे रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली तर काही वेळातच रस्त्यांवर पाणी साचायला सुरुवात झाली. शहरामध्ये तब्बल 150 मि.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद करण्यात आली आहे. मंगळवारी 190 मिमी पावसाची नोंद करण्यात आली होती. (Hyderabad flood incessant rains in big part of city 50 died in flood)

मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर 2 फूटांपेक्षा जास्त पाणी साचलं आहे. ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेचे दक्षता व आपत्ती व्यवस्थापनाचे संचालक विश्वजित कंपती यांनी एका ट्विटमध्ये म्हटलं आहे की, आपत्ती निवारण दल सतत पाणी काढण्याचं काम करत आहे. तर रविवारी शहराच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तर शहराच्या महत्त्वाच्या भागांत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.

राज्य सरकारने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे तब्बल 50 लोकांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 9,000 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. संपूर्ण पालिका व्यवस्था शहरांमधील पाणी काढण्यासाठी कामाला लागलं असून काही ठिकाणी लोक पाण्यात बुडाले असल्याची माहिती देण्यात आली आहे.

खरंतर, शहरांत पाणी शिरल्यामुळे अनेक लोक कार्यालयं आणि घरांमध्ये अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी सैन्य आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दलातील कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. हवामान खात्यातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून त्याची तिव्रता आणखी वाढली आहे. तेलंगाना राज्याव्यतिरिक्त पुराचा फटका आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या शेजारच्या राज्यांनाही बसला आहे.

तेलंगणाचे मंत्री के.टी. रामाराव यांनी शनिवारी सांगितलं की, पूरग्रस्तांच्या कुटूंबाची ओळख पटवण्यात येईल आणि त्यांच्या घरी रेशन किट देण्यात येईल. 2,800 किंमतीच्या या किटमध्ये एक महिन्याचं रेशन आणि तीन ब्लँकेटचा समावेश असणार आहे.

इतर बातम्या –

अडीच महिन्यांनंतर कोरोनासंदर्भात Good News, रुग्ण वाढण्याची साखळी मोडली

Corona Vaccine: रशियाचा मोठा दावा, कोरोनावर बनवली तिसरी लस

(Hyderabad flood incessant rains in big part of city 50 died in flood)