इम्रान खान अपरिपक्व, पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतींचा पलटवार

| Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती असिफ अली झरदारी यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांवर निशाणा साधलाय. इम्रान खान यांना आंतरराष्ट्रीय संबंध जोपासता येत नाहीत. ते अजून अपरिपक्व आहेत, असा टोला लगावत पाकिस्तान जगात एकटा पडला असल्याचं झरदारी यांनी मान्य केलं. पाकिस्तानमध्ये दहशतवाद पोसला जातोय या भारताच्या आरोपाला उत्तर देण्यासाठी इम्रान खान यांनी जी पत्रकार परिषद घेतली, त्यावरुन झरदारी […]

इम्रान खान अपरिपक्व, पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतींचा पलटवार
Follow us on

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती असिफ अली झरदारी यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांवर निशाणा साधलाय. इम्रान खान यांना आंतरराष्ट्रीय संबंध जोपासता येत नाहीत. ते अजून अपरिपक्व आहेत, असा टोला लगावत पाकिस्तान जगात एकटा पडला असल्याचं झरदारी यांनी मान्य केलं. पाकिस्तानमध्ये दहशतवाद पोसला जातोय या भारताच्या आरोपाला उत्तर देण्यासाठी इम्रान खान यांनी जी पत्रकार परिषद घेतली, त्यावरुन झरदारी यांनी हा आरोप केला.

माझ्या कारकीर्दीत मुंबईतील ताज हॉटेलवर हल्ला झाला होता. पण त्यानंतर आम्ही हे प्रकरण सौहार्दाने हाताळलं. पण यावेळी पंतप्रधान खुपच अपरिपक्व आहे. काय करायचं हेही त्याला नेमकं माहित नाही. त्याचा सध्याचा बोलविता धनी वेगळाच आहे आणि इतरांनी सांगितलेलं तो बोलवून दाखवत आहे. त्यामुळेच परिस्थिती अत्यंत वाईट झाली आहे, असा घणाघात झरदारी यांनी केला.

26/11 हल्ल्याच्या वेळी झरदारी पाकिस्तानचे राष्ट्रपती होते. पाकिस्तानमधील लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेकडून हा हल्ला करण्यात आला होता. पाकिस्तानवर जगभरातून दबाव वाढल्यानंतर पाकिस्तानमधील या हल्ल्यात सहभागी असलेल्या प्रत्येकावर कारवाई करण्याचं आश्वासन झरदारी यांनी संयुक्त राष्ट्रामध्ये दिलं होतं.

भारताने पाकिस्तानविरोधात काही हालचाल केल्यास आम्ही कायम पाकिस्तानी आर्मीसोबत असू, असंही झरदारी म्हणाले. झरदारी यांनी इम्रान खानवर टीका करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही इम्रान खानवर त्यांनी अनेकदा टीका केली आहे. शिवाय झरदारी यांचे चिरंजीव बिलावल भुट्टो यांच्याकडूनही इम्रान खानचा समाचार घेणं सुरुच असतं.

पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा कोणताही सहभाग नसून भारताने काही कारवाई केल्यास त्याला आम्हीही चोख प्रत्युत्तर देऊ, अशी धमकी इम्रान खानने दिली होती. शिवाय भारताकडे पुरावेही मागितले होते. यानंतर इम्रान खानवर चौफेर टीका झाली. इम्रान खानच्या घटस्फोटीत पत्नीनेच पुरावे मागण्यापेक्षा कारवाई कर, असा सल्ला दिलाय. त्यानंतर पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतींनीच इम्रान खानच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने इम्रान खान एकाकी पडल्याचं चित्र आहे.

जम्मू काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यानंतर संपूर्ण जग पाकिस्तानविरोधात एक झाल्याचं चित्र आहे. तरीही आमचा काहीही सहभाग नसल्याचं सांगण्याचा आव पाकिस्तान आणत आहे. या हल्ल्याचा चोख बदला घेण्याचा इशारा भारताने दिलाय. त्यानंतर पाकिस्तानमध्ये आता अंतर्गत राजकारण सुरु झालंय.

व्हिडीओ पाहा