India China Face Off | बिहार रेजिमेंटचे प्रमुख चिनी सैनिकांच्या तंबूत, सूर्यास्तावेळी धक्काबुक्की, आणि… 15 जूनच्या मध्यरात्री नेमकं काय काय झालं?

| Updated on: Jun 21, 2020 | 4:23 PM

गलवान खोऱ्यात 15 जून रोजी रात्री भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये (India China Face Off) मोठी झडप झाली. या संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले. या घटनेची आता सविस्तर माहिती समोर आली आहे.

India China Face Off | बिहार रेजिमेंटचे प्रमुख चिनी सैनिकांच्या तंबूत, सूर्यास्तावेळी धक्काबुक्की, आणि... 15 जूनच्या मध्यरात्री नेमकं काय काय झालं?
Follow us on

श्रीनगर : गलवान खोऱ्यात 15 जून रोजी रात्री भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये (India China Face Off) मोठी झडप झाली. या संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले. या घटनेची आता सविस्तर माहिती समोर आली आहे. ‘इंडिया टुडे’ने सुत्रांच्या हवाल्याने संपूर्ण घटनाक्रम सविस्तर सांगितला आहे (India China Face Off).

गलवान खोऱ्यात भारत आणि चिनी सैनिकांच्या तणावाच्या 10 दिवसांअगोदर दोन्ही देशांच्या सैन्य अधिकाऱ्यांची बैठक पार पडली होती. या बैठकीत दोन्ही देशांच्या सैन्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेला (LAC) सोडून आपापल्या हद्दीत जाण्याचा निर्णय घेतला. कारण दोन्ही देशाचे सैन्य प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या अत्यंत जवळ पोहोचले होते.

हेही वाचा : India-China Territory Dispute | भारत-चीन नेमका सीमा-वाद काय?

गलवान नदी किनाऱ्यावर भारताच्या हद्दीत चिनी सैन्यांचा एक तंबू होता. बैठकीत चीनच्या सैन्य अधिकाऱ्यांनी तो तंबू हटवण्याचा शब्द दिला. या बैठकीदरम्यान 16 बिहार बटालियनचे कमाडिंग ऑफिसर कर्नल बी संतोष बाबू यांनीदेखील चिनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. या बैठकीनंतर चिनी सैन्याने तो तंबू नष्टदेखील केला. मात्र, 14 जूनच्या मध्यरात्री चिनी सैनिकांकडून त्याचजागेवर पुन्हा तंबू उभारण्यात आला.

चिनी सैनिकांचा तंबू पुन्हा बघून कर्नल बी संतोष बाबू यांना आश्चर्य वाटलं. चीनच्या सैन्य अधिकाऱ्यांशी बातचीत केल्यानंतर त्यांनी हा तंबू नष्ट केला होता. मात्र, त्यांनी पुन्हा हा तंबू नव्याने कशाला बनवला? चिनी सैन्याने बैठकीचा काही वेगळा अर्थ तर काढला नाही ना? असा विचार कर्नल बाबू यांच्या मनात आला.

हेही वाचा : चीनसोबतच्या धुमश्चक्रीत भारताचे 20 जवान शहीद

यादरम्यान, चिनी सैन्याच्या या वागणुकीवरुन 16 बिहार रेजिमेंटमध्ये नाराजी होती. चिनी सैनिकांच्या या वर्तवणुकीचा बटालयिनमधील काही तरुण जवानांना राग आला होता. चिनी सैनिकांचा हा तंबू उद्धवस्त करुन टाकावा, असं अनेकाचं मत होतं.

मात्र, कर्नल संतोष बाबू यांचा विचार वेगळा होता. या विषयाला संयम आणि शांततेने हाताळावं, अशी त्यांची इच्छा होती. चिनी सैन्याच्या त्या तंबू स्वत: जायचं, असं त्यांनी ठरवलं. तिथे जाऊन चिनी सैनिकांशी बातचीत करुन विषय सोडवावा, असं त्यांचं मत होतं.

गलवान खोऱ्यातील ज्या भागात दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झडप झाली त्याभागात याआधी दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये सौहार्दाचे वातावरण होते. ते एकमेकांशी चांगलं वागायचे. त्यामुळे त्या भागात कंपनी कमांडरला न पाठवता बातचीत करुन आपण हा विषय सोडवावा, असं कर्नल संतोष बाबू यांचं मत होतं.

15 जून रोजी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास कर्नल संतोष बाबू आणि त्यांच्यासह 35 जवानांची टीम पायी चिनी सैन्याच्या तंबूकडे निघाली. टीममध्ये कोणताही तणाव नव्हता. सर्वसाधारण विचारपूससाठी जातोय, असं सैनिकांचं मत होतं.

भारतीय सैनिकांची टीम जेव्हा चिनी सैन्याच्या तंबूजवळ पोहोचली तेव्हा त्यांची वागणूक, हावभाव बदलले होते, हे भारतीय सैनिकांच्या लक्षात आलं. याशिवाय या भागात नेहमी तैनात असलेले चिनी सैनिक तिथे नव्हते. चीनने तिथे नव्या सैनिकांना पाठवलं होतं. जेव्हा कर्नल संतोष बाबू यांनी या भागात पुन्हा तंबू का बनवला? असा प्रश्न विचारला तेव्हा एका चिनी सैन्याने पुढे येत कर्नल संतोष बाबू यांना जोराचा धक्का दिला. यावेळी त्या सैनिकाने चिनी भाषेत अपशब्दांचादेखील प्रयोग केला.

हेही वाचा : India-China Face Off | भारताकडे सुखोई, अपाचे बोईंग, तर चीनकडे चेंगडू जे-20 आणि wz-10, कुणाकडे किती शस्त्रसाठा?

आपल्या यूनिटच्या प्रमुखांना धक्का दिलेला पाहून भारतीय सैनिकांचं रक्त उसळलं. त्यानंतर दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झडप झाली. यावेळी कोणत्याही प्रकारचे शस्त्र वापरलं गेलं नाही. जवळपास 30 मिनिटे दोन्ही देशांच्या जवानांमध्ये हा संघर्ष सुरु होता. या संघर्षात दोन्ही देशांचे जवान जखमी झाले तर काही जवान शहीद झाले. भारतीय सैनिकांनी चिनी सैनिकांचा तंबू उद्धवस्त करत चीनच्या सर्व खूणा नष्ट केल्या.

या घटनेनंतर कर्नल संतोष बाबू यांना चीनचा वेगळा डाव असल्याचं लक्षात आलं. त्यांनी तातडीने जखमी जवानांना परत पाठवलं आणि इतर सैनिकांना पाठवण्याचा आदेश दिला. कर्नल संतोष बाबू आणि त्यांच्या टीमने ज्या चिनी सैनिकांना पकडलं होतं त्यांना घेऊन ते वास्तविक नियंत्रण रेषेच्या पार चीनच्या सीमेत जाऊन चिनी सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सूपूर्द करणार होते. याशिवाय आणखी चिनी सैनिक भारताच्या दिशेला तर येत नाही ना? याची खातरजमा ते करणार होते.

या घटनेच्या दोन ते तीन तासानंतर आणखी एक मोठी घटना घडली. चिनी सैन्याने गलवान नदीच्या दोन्ही किनाऱ्यावर सैनिकं तैनात केले होते. ते तिथे भारतीय सैनिकांचीच वाट बघत होते. भारतीय सैनिक त्या भागात पोहोचताच त्यांनी दगडांचा मारा सुरु केला.

रात्री जवळपास नऊ नाजेच्या सुमारास कर्नल संतोष बाबू यांच्या डोक्याला दगड लागला. त्यामुळे ते नदीत पडले. ही लढाई जवळपास 45 मिनिटे चालली. रात्री अकरा वाजेपर्यंत सर्व शांत झालं. दोन्ही देशाचे सैनिक आपल्या जखमी जवानांना उपचारासाठी घेऊन गेले. कर्नल संतोष बाबू आणि इतर जवानांना उपचारासाठी कॅम्पमध्ये घेऊन जाण्यात आलं.

भारतीय सैनिक जेव्हा नदीतून जखमी जवानांना काढत होते, तेव्हा त्यांना एका ड्रोनचा आवाज आला. हा एक नव्या संकटाचा इशारा होता. यादरम्यान घटनास्थळी असलेल्या भारतीय सैनिकांनी मदतीसाठी अतिरिक्त फौज मागवली होती. त्यामुळे मोठ्या संख्येत भारतीय जवान घटनास्थळी पोहोचले. यामध्ये 16 बिहार रेजिमेंट आणि 3 पंजाब रेजिमेंटचा समावेश होता.

भारताचे अतिरिक्ते सैनिक येताच ते सर्व चीनच्या सीमेत गेले. चिनी सैन्यांनी वास्तविक नियंत्रण रेषा परिसरात येऊ नये, यासाठी त्यांनी हे पाऊल उचललं होतं. चिनी सीमेत भारत-चिनी सैनिकांमधील मध्यरात्री तिसरी मोठी झडप झाली. ही झडप रात्री 11 वाजेनंतर झाली. यादरम्यान भारताचे काही जवान नदीत पडले. काही वेळाने वातावरण शांत होऊ लागलं. भारताच्या जखमी जवानांना तातडीने उपाचारासाठी घेऊन जाण्यात आलं.

16 जूनच्या सकाळपर्यंत भारतीय जवान एलएसी पार करुन आपल्या हद्दीत पोहोचले होते. त्यानंतर दोन्ही बाजूच्या मेजर जनरल यांच्यात बातचीत झाली. यामध्ये एकमेकांचे सैन्य परत करण्याची बोली झाली.