चीनकडून सीमारेषेवर जोरदार हालचाली; रुग्णालय, हेलिपॅड आणि शस्त्रसाठ्याची जमवाजमव

| Updated on: Oct 12, 2020 | 9:08 AM

गेल्या अनेक महिन्यांपासून पूर्व लडाखच्या परिसरात भारत आणि चिनी सैन्य एकमेकांसमोर उभे ठाकले आहे.

चीनकडून सीमारेषेवर जोरदार हालचाली; रुग्णालय, हेलिपॅड आणि शस्त्रसाठ्याची जमवाजमव
Follow us on

नवी दिल्ली: पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनकडून जोरदार हालचाली सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. चीनकडून सीमाभागात सर्व प्रकारची रसद जमवली जातेय. सूत्रांच्या माहितीनुसार, याठिकाणी लष्करी तळ उभारण्यात आले असून सैनिक आणि शस्त्रास्त्रांचीही मोठ्याप्रमाणावर जमवाजमव सुरु आहे. यामध्ये रणगाडे आणि चिलखती वाहनांचा समावेश आहे.  (India inisist China complete deescalation eastern ladakh )

याशिवाय, लष्करी रुग्णालयाजवळ चीनकडून हेलिपॅडची उभारणी सुरु असल्याचेही समजते. जेणेकरुन युद्धकाळात सैनिक जखमी झाल्यास त्यांना वेगाने रुग्णालयापर्यंत पोहोचवणे शक्य होईल. गलवान खोऱ्यातील संघर्षावेळी भारताच्या प्रतिहल्ल्यात चिनी सैनिकही मोठ्याप्रमाणावर मृत्यूमुखी पडले होते. या पार्श्वभूमीवर चीनकडून आता जय्यत तयारी सुरु आहे.

काही दिवसांपूर्वीच चीनने या भागात जवळपास ६० हजार सैनिक तैनात केल्याची माहिती अमेरिकेने भारताला दिली होती. चीनच्या या आक्रमक कृतीविषयी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पेओ यांनी नापसंती व्यक्त केली होती.

दरम्यान, पूर्व लडाखमधील तणाव कमी करण्याच्यादृष्टीने सोमवारी भारत आणि चीन यांच्यात सातव्या टप्प्यातील बैठक होत आहे. कोर कमांडर स्तरावरील लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चा होईल. यावेळी चिनी परराष्ट्र मंत्रालयातील अधिकारीही उपस्थित राहणार असल्याचे समजते. पूर्व लडाखमधून चीनने आपले सैन्य पूर्णपणे माघारी घ्यावे, हा भारताचा पूर्वीपासूनचा आग्रह आहे. लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग आजच्या बैठकीत भारताचे नेतृत्व करतील. चुशूल-मोल्डो बॉर्डर पॉईंटवर ही बैठक होईल.

गेल्या अनेक महिन्यांपासून पूर्व लडाखच्या परिसरात भारत आणि चिनी सैन्य एकमेकांसमोर उभे ठाकले आहे. गलवान खोऱ्यातील रक्तरंजित संघर्षानंतर दोन्ही देशांतील तणावात आणखीनच भर पडली होती. या झटापटीत कर्नल संतोष बाबू यांच्यासह भारताचे २० जवान शहीद झाले होते. यानंतर देशभरात चीनविरुद्ध संतापाची लाट उसळली होती.
यानंतरच्या काळातही चिनी सैन्याकडून पँगाँग सरोवरच्या परिसरातील भारतीय हद्दीत घुसखोरीचे प्रयत्न झाले. मात्र, गलवानच्या घटनेनंतर अत्यंत सतर्क झालेल्या भारतीय सैनिकांनी चीनचे सर्व डाव हाणून पाडले होते. यादरम्यान दोन्ही देशांमध्ये सातत्याने चर्चेच्या फेऱ्या सुरु आहेत. मात्र, यापैकी एकाही बैठकीत अद्यापपर्यंत समाधानकारक तोडगा निघालेला नाही.

संबंधित बातम्या:

पाकिस्तान आणि चीन एकत्र; पीओकेमध्ये अद्ययावत क्षेपणास्त्र यंत्रणा उभारण्याची तयारी

कोणत्याही परिस्थितीत भारतच चीनपेक्षा ‘भारी’- हवाईदलप्रमुख

LAC वरच्या सैनिकांचा आत्मविश्वास हिमालयाएवढा; फक्त आदेशाची गरज : लष्करप्रमुख नरवणे

(India inisist China complete deescalation eastern ladakh )