कर्जबाजारी शेतकऱ्याला दुबईत 28.5 कोटींची लॉटरी

| Updated on: Aug 05, 2019 | 11:13 AM

तेलंगणातील एका कर्जबाजारी शेतकऱ्याला 28.5 कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे. कर्ज डोक्यावर असल्यामुळे हा शेतकरी दुबईत गेला होता.

कर्जबाजारी शेतकऱ्याला दुबईत 28.5 कोटींची लॉटरी
Follow us on

हैदराबाद : तेलंगणातील एका कर्जबाजारी शेतकऱ्याला 28.5 कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे. कर्ज डोक्यावर असल्यामुळे हा शेतकरी दुबईत गेला होता. तिथे जाऊन काम करुन ते आपला उदरनिर्वाह करत होते. मात्र एका लॉटरीच्या तिकीटाने (Lottery Ticket)  त्याचं आयुष्य बदललं आहे. विलास रिक्काला असं या शेतकऱ्याचं नाव आहे.

दुबईत प्रत्येक महिन्याला बिग तिकीट ड्रॉ ही लॉटरी (Lottery Ticket) काढली जाते. त्यावेळी विलास यांनी 20 हजार रुपयांचे लॉटरी तिकीट खरेदी केलं होतं.  लॉटरी तिकीट खरेदी करताना त्यांनी आपल्या मित्रांकडून अर्धे पैसे घेतले होते. दुबईत काम करुन पुरेसे पैसे मिळत नसल्यामुळे ते पुन्हा भारतात परतत होते. याच दरम्यान त्यांना 28.5 कोटींची लॉटरी लागल्याची घोषणा करण्यात आली होती.

विलास रिक्काला हे तेलंगणामधील निजामाबाद गावात राहतात. 2014 मध्ये ते दुबईला गेले होते. दुष्काळामुळे विलास दुबईला कामासाठी गेले होते. तिथे त्यांनी हमाली आणि ड्रायव्हरचं काम केलं. गेल्या महिन्यात ते भारतात परतले. लॉटरीचे तिकीट खरेदी करण्यापूर्वी विलास यांना अपेक्षा होती की इतरांना जसे लॉटरी लागते तसे मलाही लागू शकते. जुलै 2019 मध्ये त्यांनी हे तिकीट खरेदी केले होते.

“मित्राकडून मला शनिवारी दुबईवरुन फोन आला. तेव्हा त्यांनी मला लॉटरी लागल्याची खूशखबर दिली. हे एकून मला विश्वास बसत नव्हता. मी जेव्हा माझ्या आईला ही खूशखबर दिली तेव्हा माझ्या आईलाही यावर विश्वास बसत नव्हता”, असं विलास रिक्काला यांनी सांगितले.

अबू धाबी आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रत्येक महिन्याला एक लॉटरी निघते. आपल्या मोठ्या किंमतीच्या लॉटरीमुळे ही भारतीय नागरिकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. जुलैमधील लॉटरी विलास यांच्या नावावर निघाली आणि त्यांना 1.5 कोटी दिराम मिळाले. जे भारतीय रुपयात 28.45 कोटी होतात.