चीनी लष्कराची पुन्हा आगळीक, पूर्व लडाखमधील सीमेवरील सहमतीचे उल्लंघन, भारतीय सैनिकांचे सडेतोड उत्तर

| Updated on: Aug 31, 2020 | 12:55 PM

भारतीय सैन्याने पॅनगाँग त्सो लेकजवळ चिनी सैन्यांचे आक्रमण थांबवले आहे, अशी माहिती लष्कराचे पीआरओ कर्नल अमन आनंद यांनी दिली.

चीनी लष्कराची पुन्हा आगळीक, पूर्व लडाखमधील सीमेवरील सहमतीचे उल्लंघन, भारतीय सैनिकांचे सडेतोड उत्तर
Follow us on

नवी दिल्ली : चीनी लष्कराने पूर्व लडाखमधील सीमेवरील सहमतीचे उल्लंघन केले, अशी माहिती भारत सरकारने सोमवारी दिली. चिनी सैनिकांनी प्रक्षोभकपणे सीमेवरील स्थिती बदलण्याचा प्रयत्न केला, पण भारतीय सैनिकांनी सडेतोड उत्तर देत त्यांना रोखले, असे सरकारने म्हटले आहे. (Indian troops pre-empted PLA activity on the Southern Bank of Pangong Tso Lake)

भारतीय सैन्याच्या माहितीनुसार 29 ऑगस्ट रोजी रात्री ही झडप झाली. चिनी पीपल्स लिबरेशन आर्मी म्हणजेच पीएलएने सीमेवरील स्थितीत बदल करण्याचा प्रयत्न केला, परंतु सतर्क भारतीय सैनिकांनी त्यांचा डाव हाणून पाडला, असे भारतीय सैन्याने म्हटले आहे.

भारतीय लष्करातर्फे पीआयबीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे, “भारतीय सैन्याने पॅनगाँग त्सो लेकजवळ चिनी सैन्यांचे आक्रमण थांबवले आहे. भारतीय सैन्य चर्चेच्या माध्यमातून शांतता पुनर्स्थापित करण्याच्या पक्षात आहे. परंतु त्याचबरोबर आपल्या प्रदेशाच्या अखंडतेचे रक्षण करण्यासाठी देखील वचनबद्ध आहे. या संपूर्ण वादावर ब्रिगेड कमांडर स्तरावर बैठक सुरु आहे.”

समस्यांचे निराकरण करण्यासाठी चुशूल येथे ब्रिगेड कमांडर स्तराची फ्लॅग मीटिंग सुरु आहे, अशी माहिती लष्कराचे पीआरओ कर्नल अमन आनंद यांनी दिली.

हेही वाचा : गलवान खोऱ्यातील चीनच्या कुरापतीनंतर भारताचं चोख उत्तर, दक्षिण चीन समुद्रात भारतीय युद्धनौका तैनात

यापूर्वी, 15 जून रोजी लडाखच्या गलवान खोऱ्यात दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये हिंसक झुंज झाली होती. त्यात 20 भारतीय सैनिक शहीद झाले होते. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरु असून तणाव कायम आहे.

“एलएसी अर्थात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील चीनबरोबरचा तणाव 1962 नंतर सर्वात गंभीर स्थितीत आहे. 45 वर्षांनंतरही चीनशी झालेल्या संघर्षात लष्करी हानी झाली आहे. सीमेवर दोन्ही बाजूंनी अभूतपूर्व सैन्य तैनात आहे” असे गेल्या आठवड्यात भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणाले होते.