पाकिस्तानविरोधात एकत्र या, भारताचं जगाला जाहीर आवाहन

| Updated on: Jul 05, 2019 | 4:27 PM

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पुलवामा इथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर आत्मघातकी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यातील शहिदांची संख्या 44 वर पोहोचली आहे. तर अनेक जवान जखमी आहेत. जैश ए मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. पाकिस्तानमधून आलेल्या या दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला करत भारतीय जवानांचा जीव घेतला. उरी हल्ल्यानंतरचा हा सर्वात मोठा हल्ला आहे. भारताने या […]

पाकिस्तानविरोधात एकत्र या, भारताचं जगाला जाहीर आवाहन
Follow us on

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पुलवामा इथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर आत्मघातकी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यातील शहिदांची संख्या 44 वर पोहोचली आहे. तर अनेक जवान जखमी आहेत. जैश ए मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. पाकिस्तानमधून आलेल्या या दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला करत भारतीय जवानांचा जीव घेतला. उरी हल्ल्यानंतरचा हा सर्वात मोठा हल्ला आहे. भारताने या हल्ल्यासाठी पाकिस्तानला जबाबदार धरलंय.

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून अधिकृत प्रतिक्रिया जारी करण्यात आली आहे. आम्ही या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करतो. हे कृत्य पाकिस्तानमधील आणि पाकिस्तान समर्थित जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडून करण्यात आलंय. या संघटनेला संयुक्त राष्ट्रासह अनेक देशांनी बेकायदेशीर घोषित केलंय. ही संघटना मसूद अजहरकडून चालवली जाते, ज्याला दहशतवाद मजबूत करण्यासाठी पाकिस्तानने बळ दिलंय. मसूद अजहरकडून भारतावर आणि इतर ठिकाणी हल्ले करण्यात यावेत यासाठी पाकिस्तानने त्याला मुक्तपणे वावर करण्याचं स्वातंत्र्य दिलंय. आम्ही आंतरराष्ट्रीय सदस्यांना आवाहन करतो, की दहशतवादी लिस्ट करण्याच्या आमच्या प्रस्तावाला पाठिंबा द्यावा, ज्यात जैश ए मोहम्मदचा प्रमुख, ज्याचा कुख्यात दहशतवादी म्हणून समावेश करण्यात आलेला आहे, अशी प्रतिक्रिया परराष्ट्र मंत्रालयाने दिली.

अमेरिकेसह शेजारच्या देशांना भारताला पाठिंबा

पुलवामा हल्ल्यानंतर अमेरिकेनेही सर्वात अगोदर भारताच्या दुःखात सहभागी असल्याची प्रतिक्रिया दिली. शिवाय या घटनेचा निषेध करत आम्ही प्रत्येक क्षणाला भारताच्या सोबत असल्याची ग्वाही दिली. श्रीलंका, मालदीव, भूटान, नेपाळ यासह शेजारच्या देशांनी या हल्ल्याचा निषेध केलाय.

सुरक्षेवरील कॅबिनेट कमिटीची बैठक

पुलवामा हल्ल्यानंतर देशातील प्रत्येकाचं रक्त खवळलंय. प्रत्येक जण बदला घेण्याची मागणी करत आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही थेट इशारा दिलाय. आमच्या जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नसल्याचं त्यांनी म्हटलंय. तर पाकिस्तानला या हल्ल्याचे भविष्यात गंभीर परिणाम भोगावे लागणार असल्याचं भाजपने म्हटलंय. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह स्वतः जम्मू काश्मीरमध्ये जाऊन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. विशेष म्हणजे सुरक्षेवरील कॅबिनेट कमिटीची शुक्रवाऱी सकाळी बैठक होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील या समितीला राष्ट्रीय सुरक्षेसंबंधी अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार आहे.