Swachh Mahotsav | इंदूर सलग चौथ्यांदा भारतातील सर्वात स्वच्छ शहर, महाराष्ट्रातून ‘हे’ शहर अव्वल

| Updated on: Aug 20, 2020 | 1:08 PM

महाराष्ट्रातील नवी मुंबई शहर तिसर्‍या, चंद्रपूर 9 व्या, धुळे 17 व्या तर नाशिक 23 व्या क्रमांकावर आहेत.

Swachh Mahotsav | इंदूर सलग चौथ्यांदा भारतातील सर्वात स्वच्छ शहर, महाराष्ट्रातून हे शहर अव्वल
Follow us on

नवी दिल्ली : केंद्र सरकारने ‘स्वच्छ सर्वेक्षण 2020’ या स्वच्छ शहरांच्या वार्षिक सर्व्हेचा निकाल गुरुवारी जाहीर केला. मध्य प्रदेशातील इंदूर शहराने पुन्हा एकदा भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून पहिले स्थान कायम राखले. (Indore from Madhya Pradesh becomes India’s Cleanest City under Swachh Mahotsav Swachh Survekshan 2020)

इंदूर शहराने सलग चौथ्यांदा सर्वात स्वच्छ शहर ठरण्याचा मान पटकावला आहे. दुसर्‍या क्रमांकावर गुजरातमधील सुरत, तर तिसर्‍या क्रमांकावर महाराष्ट्रातील नवी मुंबई शहर आहे. राज्यातून चंद्रपूर 9 व्या, धुळे 17 व्या तर नाशिक 23 व्या क्रमांकावर आहेत.

स्वच्छ शहरांची क्रमवारी

1. इंदूर (मध्य प्रदेश)
2. सुरत (गुजरात)
3. नवी मुंबई (महाराष्ट्र)
4. अंबिकापूर (छत्तिसगढ)
5. म्हैसूर (कर्नाटक)
6. विजयवाडा (आंध्रप्रदेश)
7. अहमदाबाद (गुजरात)
8. नवी दिल्ली (दिल्ली)
9. चंद्रपूर (महाराष्ट्र)
10. खारगोने (मध्य प्रदेश)

केंद्रीय गृहनिर्माण मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी सर्व्हेचा निकाल जाहीर केला. “काही वर्षांपूर्वी मी जपानी शिष्टमंडळाच्या सदस्यासह इंदूरला गेलो होतो. जेव्हा आम्ही शहरात पोहोचलो तेव्हा मी पाहिले की तो इंदूरच्या वेगवेगळ्या भागात जात होता. मी त्याला विचारले “तुम्ही काय करत आहात?’ तो म्हणाला ‘मी अस्वच्छता शोधण्याचा प्रयत्न करत होतो, पण शक्य झाले नाही’. या शहराच्या यशाबद्दल दुसरा मोठा दाखला असेल असे मला वाटत नाही” असे हरदीपसिंग पुरी यांनी इंदूरने हा पुरस्कार जिंकल्यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांना सांगितले.

जानेवारी 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरु केलेल्या सर्वेक्षणाचे हे पाचवे वर्ष आहे. ‘स्वच्छ महोत्सव’ अंतर्गत अव्वल कामगिरी करणारी एकूण 120 शहरे व राज्ये सन्मानित करण्यात आली.

स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये 4 हजार 242 शहरे, 62 कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि 92 गंगाकाठच्या शहरांचा समावेश होता. हे सर्वेक्षण 28 दिवसांत करण्यात आले

सर्वेक्षणातील पहिल्या वर्षी (2016) म्हैसूरने भारतातील सर्वात स्वच्छ शहराचा पुरस्कार जिंकला होता, तर इंदूरने सलग तीन वर्षे (2017,2018, 2019) अव्वल स्थान कायम राखले.

महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त 2 ऑक्टोबर 2014 रोजी सुरु करण्यात आलेल्या स्वच्छ भारत अभियानाच्या कामगिरीवर नजर ठेवण्यासाठी स्वच्छ सर्वेक्षण सुरु करण्यात आले होते. 2019 पर्यंत भारत हागणदारीमुक्त करण्याचे उद्दीष्ट होते. (Indore from Madhya Pradesh becomes India’s Cleanest City under Swachh Mahotsav Swachh Survekshan 2020)