Jaan Kumar Sanu | ‘तेव्हा कुठलीच जबाबदारी घेतली नाही, आता मतं कशी मांडता?’, कुमार सानूवर जान नाराज

| Updated on: Nov 24, 2020 | 2:41 PM

जान कुमार सानूच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणात जानचे वडील, प्रसिद्ध गायक कुमार सानू यांनादेखील बोल लावले गेले होते.

Jaan Kumar Sanu | ‘तेव्हा कुठलीच जबाबदारी घेतली नाही, आता मतं कशी मांडता?’, कुमार सानूवर जान नाराज
Follow us on

मुंबई : ‘बिग बॉस 14’च्या घरातून जान कुमार सानू (Jaan Kumar Sanu) बाहेर पडला आहे. बाहेर पडल्यानंतर जानने सगळ्या वादग्रस्त प्रकरणांवर चर्चा केली आहे. यावेळी त्याने गायक कुमार सानू यांच्या वक्तव्यावर देखील भाष्य केले आहे. ‘बिग बॉस’च्या घरतील प्रवास इतक्या लवकर संपेल असे वाटले नसल्याचे जान म्हणाला. ‘बिग बॉस’च्या घरातील जान कुमार सानूच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटले होते (Jaan kumar sanu reacted on father kumar sanu’s statement over him).

जान कुमार सानूच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणात जानचे वडील, प्रसिद्ध गायक कुमार सानू यांनादेखील बोल लावले गेले होते. या प्रकरणात आपले नाव ओढले गेल्यावर कुमार सानू यांनी महाराष्ट्राची माफी मागत, जानच्या शिकवणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

काय म्हणाले होते कुमार सानू?

जानच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर एका व्हिडीओद्वारे कुमार सानूने जानच्या कृत्याबद्दल सगळ्यांची माफी मागितली होती. ‘गेल्या 40 वर्षात या ‘मुंबादेवी’च्या आशीर्वादाने मी इतका मोठा झालो. या भूमीने मला नाव आणि प्रसिद्धी दिली. अशा या मुंबई आणि महाराष्ट्राबद्दल अशी कुठलीच गोष्ट माझ्या मनातसुद्धा येणार नाही. मला भारतातील सगळ्या भाषांबद्दल प्रचंड आदर आहे. माझा मुलगा जान गेली 27 वर्ष माझ्यासोबत राहत नाही. त्याच्या आईने त्याला काय शिकवण दिली, कोणाशी कसे बोलावे हे शिकवले का?, या सगळ्या गोष्टींचा अंदाज मला नाही. परंतु, आता जानचा वडील या नात्याने मी सगळ्यांची माफी मागतो’, असे म्हणत त्यांनी सगळ्यांची माफी मागितली होती (Jaan kumar sanu reacted on father kumar sanu’s statement over him).

जान कुमार सानूची प्रतिक्रिया

‘माझा जन्मही झाला नव्हता, तेव्हाच माझे वडील मला आणि आईला सोडून गेले. तर, आता ते माझ्या आईच्या संस्कारांवर कसे बोलू शकतात? त्यांना माझ्याबाबतीत काय माहित आहे? त्यांचे हे बोलणे अतिशय चुकीचे होते’, असे जान कुमार सानू म्हणाला.

जान म्हणतो, ‘मला वाटतं त्यांना भेटावं आणि स्वतःच्या प्रश्नांची उत्तरं मागावी. त्यांनी एकदा तरी माझ्याशी बोलावं ही माझी इच्छा आहे. सुरुवातीला त्यांना वाटतं होतं की मी यातून बाहेर पडावं. पण नंतर त्यांनी स्वतःच व्हिडीओ बनवत मला शुभेच्छा दिल्या होत्या.’

‘कोणाचेही वडील त्यांच्या मुलांबद्दल वाईट बोलत नाहीत. आणि माध्यमांसमोर तर नाहीच… ते माझे वडील आहेत. मात्र, त्यांच्या या कृतीमुळे खूप दुःख झाले आहे. मी मात्र, त्याच्या विरोधात बोलणार नाही. हे माझे संस्कार आहेत. आणि माझ्या संस्कारांवर कोणीही प्रश्नचिन्ह लावू शकत नाही. माझी चूक झाली होती, हे मला मान्य आहे. पण, कोणालाही दुखवायच्या हेतूने मी बोललो नव्हतो’, असे जान म्हणाला (Jaan kumar sanu reacted on father kumar sanu’s statement over him).

काय होते प्रकरण?

‘बिग बॉस’च्या (Bigg Boss 14) खेळादरम्यान झालेल्या वादात जान कुमार सानूने निक्की तंबोलीशी बोलताना मराठी भाषेची चीड येत असल्याचे म्हटले होते. ‘बिग बॉस’च्या घरात मराठमोळा गायक राहुल वैद्य स्पर्धक म्हणून सामील झाला आहे. या कार्यक्रमात जान कुमार सानू आणि निक्की तंबोली यांच्या दरम्यान घनिष्ठ मैत्री दाखवण्यात आली होती. काही कारणाने या दोघांमध्ये बिनसल्याने निक्कीने जानची साथ सोडत, राहुल वैद्यचा हात धरला आहे. राहुलशी ती मराठीत संवाद साधण्याच्या प्रयत्न करताना दिसत असते. याच दरम्यान तिने जानशी देखील मराठीत बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जानने तिला माझ्याशी मराठीत बोलायचा प्रयत्न करू नको. बोलायचे असल्यास हिंदीत बोल. मला मराठी ऐकून चीड येते, असे तो म्हणाला होता.

(Jaan kumar sanu reacted on father kumar sanu’s statement over him)