मंदिरं उघडण्याची ‘हीच ती वेळ’, सरकार पुढील चार वर्ष दिवाळी साजरी करणार : जयंत पाटील

| Updated on: Nov 14, 2020 | 4:07 PM

पाडव्यापासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यास सरकारने परवानगी दिली आहे. त्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी योग्यवेळी मंदिरं उघडण्याचा निर्णय घेतला, असं मंत्री जयंत पाटील म्हणाले.

मंदिरं उघडण्याची हीच ती वेळ, सरकार पुढील चार वर्ष दिवाळी साजरी करणार : जयंत पाटील
Follow us on

मुंबई : येत्या सोमवारी (16 नोव्हेंबर) पाडव्यापासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यास सरकारने परवानगी दिली आहे. त्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मंत्री जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. तसंच मुख्यमंत्र्यांनी अतिशय योग्य वेळी हा निर्णय घेतल्याचं पाटील म्हणाले. (Jayant Patil Comment On reopen temple)

“कोरोना काळात राज्य सरकाराला जनतेची काळजी आहे. त्यामुळे अनलॉकिंग करताना काही गोष्टी लक्षात घेण्याची गरज होती. आता मुख्यमंत्र्यांनी हळूहळू सर्व काही सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर राज्यातील मंदिरे आता सुरु होत आहे”, असं जयंत पाटील म्हणाले.

राज्यातील मंदिरे सुरु करण्याचा निर्णय म्हणजे मुख्यमंत्र्यांना उशीरा सुचलेलं शहाणपण आहे, अशी टीका भाजपने केली. त्यावर उत्तर देताना जयंत पाटील म्हणाले, “मंदिरं उघडायला उशीर झाला आहे, असं विरोधक म्हणत असतील पण तसं म्हणता येणार नाही. मुख्यमंत्र्यांनी योग्य वेळी मंदिरं उघडण्याचा निर्णय घेतलाय, कोरोना काळात जनतेचा विचार करुन निर्णय घ्यावे लागतात”.

“राज्यातील मंदिरे सुरु झाली आहेत मात्र आता लोकांची जबाबदारी वाढली आहे. मंदिरात दर्शनाला जाताना कोरोनासंबंधीचे सगळे नियम जनतेने पाळायला हवेत”, असं आवाहन जयंत पाटील यांनी केलं. “हे सरकार पुढच्या चार वर्ष दिवाळी साजरी करणार आहे. कोरोनामुळं लोक काही नाराज‌ झालीत पण त्यानंतर चांगले निर्णय घेऊन सरकार पुढे‌ जाईल”, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

प्रार्थनास्थळे खुली केल्यानंतर सर्वांना नियम, शिस्तीचे काटेकोर पालन सगळ्यांना करावेच लागेल. मुख्य म्हणजे प्रत्यक्ष प्रार्थनागृहांतील गर्दी टाळा आणि स्वतःबरोबर इतरांचे रक्षण करा. मंदिरात चपला बाहेर काढून प्रवेश करायचा असतो, पण तोंडावरील मास्क मात्र सक्तीचा आहे हे विसरू नका, असे नियम मंदिरं उघडताना घालून देण्यात आले आहेत.

मुख्यमंत्र्यांचं महत्त्वाचं आवाहन

“दिवाळीचे मंगल पर्व सुरु झाले आहे. प्रथेप्रमाणे अभ्यंगस्नान आणि नरकासुर वधही झाला. नरकासुररूपी चिराटी फोडली असली तरी वर्षभर कोरोनारूपी नरकासुराने घातलेला धुमाकूळ विसरता येणार नाही. हा राक्षसही हळूहळू थंड पडत असला तरी बेसावध राहून चालणार नाही. राज्यातील जनतेने या काळात शिस्तीचे पालन केले. त्यामुळेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती हाताबाहेर गेली नाही. महाराष्ट्रावर साधू-संतांची, देव -देवतांची नेहमीच कृपा राहिली आहे. तरीही शिस्त, सावधगिरी म्हणून होळी, गणेशोत्सव, नवरात्र, पंढरीची वारीही झाली नाही. इतकेच नाही तर इतर धर्मीयांनीही ईद, माऊंट मेरीसारख्या जत्रांसंदर्भात शिस्त पाळलीच.”

“या काळात सर्वच प्रार्थनास्थळे बंदी असली तरी डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्ड बॉयच्या रूपाने ‘देव’ पांढऱ्या कपड्यांत भक्तांची काळजी वाहत होता. देव आपल्यातच होते, पण आता उद्याच्या पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरांसह सर्व प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आपण शिस्त पाळली तरच देवांचे आशीर्वाद आपल्याला आणि महाराष्ट्राला मिळतील”, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं आहे.

(Jayant Patil Comment On reopen temple)

संबंधित बातम्या

Temple Reopen | राज्यातील मंदिर सोमवारपासून उघडणार, पण ‘हे’ नियम सक्तीचे

ही ‘श्रींची इच्छा! पाडव्यापासून मंदिरे, प्रार्थनास्थळे उघडत आहोत; मुख्यमंत्र्यांची दिवाळी भेट!