मोतीबाईंचे अश्रू पाहून जयंत पाटील भावूक, यवतमाळमध्ये दारुबंदीसाठी सकारात्मक

| Updated on: Jan 24, 2020 | 3:00 PM

राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांना यवतमाळमध्ये दारुबंदी करावी, असं लेखी पत्र जयंत पाटील यांनी पाठवलं.

मोतीबाईंचे अश्रू पाहून जयंत पाटील भावूक, यवतमाळमध्ये दारुबंदीसाठी सकारात्मक
Follow us on

यवतमाळ : गेल्या पाच वर्षांपासून ‘स्वामिनी संघटने’च्या माध्यमाने यवतमाळ जिल्ह्यातील महिला आणि सुजाण नागरिक दारुबंदीची मागणी करत आहेत. यवतमाळमध्ये दारुबंदीसाठी जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील  अनुकूल आहेत. 50 वर्षीय मोतीबाई तोडसाम यांच्या डोळ्यातील अश्रू पाहून जयंत पाटील (Jayant Patil Yawatmal Liquor ban) भावूक झाले.

राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांना यवतमाळमध्ये दारुबंदी करावी, असं लेखी पत्र पाठवलं. जयंत पाटील यांनी ‘स्वामिनी’च्या शिष्टमंडळाला आश्वस्त केल्याची माहिती ‘स्वामिनी’चे मुख्य संयोजक महेश पवार यांनी दिली.

मोतीबाई तोडसाम यांनी जयंत पाटलांना प्रश्न केला होता. ‘साहेब, आम्ही किती मोर्चे काढले. तुम्ही आमची हाक काऊन आइकुन नाही राहिले? घरी दोन पोरं अन नवरा तिघंही दारू पिऊन मारते, मी किती दिवस मार खाऊ? तुमच्या पाया पडतो. दारुबंदी करा!’ मोतीबाईच्या डोळ्यात अश्रू दाटलेले पाहून जयंत पाटीलही भावुक झाले.

यवतमाळ जिल्ह्यात दारुबंदीसाठी 2015 पासून आंदोलनं सुरु आहेत. भाजप सरकारच्या काळात न्याय न मिळाल्यामुळे राष्ट्रवादी पक्षाची ‘हल्लाबोल यात्रा’ यवतमाळ जिल्ह्यातून जात असताना ‘स्वामिनी’च्या 200 महिलांनी यात्रा अडवून दारुबंदीचा मुद्दा मांडला होता. त्यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, मंत्री जयंत पाटील आणि धनंजय मुंडे यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन, आमचं सरकार आल्यास यवतमाळ जिल्ह्यात दारुबंदी करु, असं आश्वासन दिलं होतं.

17 जुलै 2018 रोजी नागपुरातील पावसाळी अधिवेशनादरम्यान जयंत पाटील यांनी सभागृहात ‘स्वामिनी’च्या मागणीची दखल घ्यावी, ही विनंती तत्कालीन सरकारला केली होती. जर भाजप सरकारने यवतमाळ जिल्हा दारुबंदी केली नाही, तर आमचं सरकार आल्यावर पहिल्या कॅबिनेटमध्ये यवतमाळ जिल्हा दारुबंदी करु, असं आश्वासन त्यांनी सभागृहात दिलं होतं.

चंद्रपुरात पुन्हा ‘उभी बाटली’, दारुबंदी हटवण्याच्या ठाकरे सरकारच्या हालचाली

आश्वासनाची पूर्तता करावी यासाठी स्वामिनीच्या शिष्टमंडळाने मुंबईत जयंत पाटील यांची गुरुवारी भेट घेतली. त्यावेळी जयंत पाटील यांनी यवतमाळ दारुबंदीसाठी आम्ही अनुकूल आहोत. यावर निर्णय घेण्यात यावा असं राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांना स्वामिनीचं निवेदन लिहून पाठवलं.

‘स्वामिनी’च्या दारुबंदी आंदोलनांना यवतमाळ जिल्ह्यातील असंख्य पीडित परिवारांचा पाठिंबा मिळाला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो ग्रामपंचायतींनी दारुबंदीचा प्रस्ताव पारित केला आहे. दारुविक्रीपासून मिळणारा महसूल राज्य सरकारसाठी महत्त्वाचा असला, तरी राज्याच्या जनतेच्या समृद्धीसाठीही सरकार वचनबद्ध असतं. व्यसनामुळे (Jayant Patil Yawatmal Liquor ban) असंख्य परिवारांची वाताहात होत आहे. आपण मंत्री या नात्याने कृपया हे लक्षात घ्यावी, ही विनंती स्वामिनीच्या शिष्टमंडळाकडून करण्यात आली.

या शिष्टमंडळात स्वामिनीचे मुख्य संयोजक महेश पवार, विभागीय संघटक मनीषा काटे, सरोज देशमुख, धीरज भोयर, संजीवनी कासार, रेखा उदे, मोतीबाई तोडसाम सहभागी होते.