संयुक्त महाराष्ट्रच्या वक्तव्यावरुन संताप, कन्नडिगांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पुतळा जाळला

| Updated on: Nov 18, 2020 | 3:06 PM

प्रो कन्नडा ग्रुपने अजित पवार यांच्याविरोधात आंदोलन करत त्यांचा पुतळा जाळला आहे (Kannada peoples burnt a statue of Minister Ajit Pawar).

संयुक्त महाराष्ट्रच्या वक्तव्यावरुन संताप, कन्नडिगांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पुतळा जाळला
Follow us on

बेळगाव : कन्नडिगांची मुजोरी पुन्हा एकदा समोर आली आहे. यावेळी कन्नडिगांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुतळा जाळला आहे. अजित पवार यांनी काल (17 नोव्हेंबर) ट्विटवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली वाहत असताना संयुक्त महाराष्ट्राची स्थापन करु, असं म्हटलं होतं. याच वक्तव्याचा राग मनात धरुन प्रो कन्नडा ग्रुपने अजित पवार यांच्याविरोधात आंदोलन करत त्यांचा पुतळा जाळला आहे (Kannada peoples burnt a statue of Minister Ajit Pawar).

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी श्रद्धांजली वाहिली होती. यावेळी त्यांनी “बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना हे बाळासाहेबांचे स्वप्न होतं. स्वर्गीय बाळासाहेबांचे हे स्वप्न पूर्ण करण्याचा आपण निर्धार करुया”, असं वक्तव्य केलं होतं. मात्र, या वक्तव्याला प्रो कन्नडा ग्रुपने विरोध केला आहे. अजित पवार यांनी आपलं वक्तव्य मागे घ्यावे, अशी मागणी कन्नडा ग्रुपने केली आहे (Kannada peoples burnt a statue of Minister Ajit Pawar).

दरम्यान, या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आकाश काकडे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. “अजित पवार यांनी कोणतंही गैर वक्तव्य केलेलं नाही. पण कर्नाटकात असेलेलं भाजप सरकार हे जाणूनबुजून महाराष्ट्रात कसे वाद होतील, समाजात तेढ कसा निर्माण होईल, यासाठी प्रयत्न करत आहे. अजित दादांचे कर्नाटकात कितीही पुतळे जाळले तरी फरक पडत नाही. आम्ही संयुक्त महाराष्ट्र होण्याची मागणी सातत्याने पुढे करु. कर्नाटकात भाजपचं सरकार आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांना काही वाटत असेल तर त्यांनी याबाबत जाब विचारला पाहिजे”, अशी प्रतिक्रिया काकडे यांनी दिली.

बेळगाव महाराष्ट्रात सामील करण्यासाठी सध्या न्यायालयीन लढाई सुरु आहे. बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी गेली 62 वर्षे सीमावासियांना लढा सुरु आहे. या लढाच्या पार्श्वभूमीवर 1 नोव्हेंबरला मराठी भाषिकांकडून काळा दिवस पाळला जातो. मात्र, कन्नडिगांची दादगिरी सध्या वाढताना दिसत आहे. काळ्या दिनादिवशी देखील याचा प्रत्यय आला होता. काळ्या दिनादिवशी मराठी बांधवांनी शांतपणे कार्यक्रम केले. मात्र, काही कन्नड संघटनांनी दंगा करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर कन्नडिगांनी महाराष्ट्राच्या एसटी बस फोडण्याचा प्रयत्न केला होता.

संबंधित बातमी :

कानडी पोलिसांचा आदेश झुगारत मराठी बांधव काळा दिन साजरा करण्यासाठी एकत्र, कर्नाटक सरकारच्या दडपशाहीचा निषेध