आता तरी सावध व्हा! राज्यात कोरोनाची पुन्हा उसळी; नव्या रुग्णसंख्येने सहा हजारांचा टप्पा ओलांडला

राज्यात आज 6159 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली. | Coronavirus surges Maharashtra

आता तरी सावध व्हा! राज्यात कोरोनाची पुन्हा उसळी; नव्या रुग्णसंख्येने सहा हजारांचा टप्पा ओलांडला
Rohit Dhamnaskar | Updated on: Nov 25, 2020 | 9:57 PM

मुंबई: देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाची (Coronavirus) दुसरी लाट आली असतानाच आता महाराष्ट्रातही कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ झाली आहे. गेल्या काही महिन्यांतील सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे राज्यातील कोरोना नव्या कोरोना रुग्णांचा आकडा पाच हजाराखाली गेला होता. मात्र, आता यामध्ये पुन्हा वाढ झाली आहे. बुधवारी राज्यात नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येने सहा हजारांचा टप्पा ओलांडला.  तर 65 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. ही राज्यासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. (Coronavirus surges in Maharashtra)

राज्यात आज 6159 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 4844 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1663723 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 84464 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 92.64% झाले आहे.

तत्पूर्वी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता राज्य सरकारने काही महत्त्वपूर्ण पावले उचलली होती. त्यानुसार दैनंदिन कोरोना चाचण्यांची संख्या पुन्हा वाढवण्यात आली आहे. तसेच आजपासून दिल्ली, गुजरात, गोवा आणि राजस्थान या चार राज्यांतून रेल्वे, विमान आणि रस्ते मार्गाने येणाऱ्या नागरिकांच्या तपासणीलाही सुरुवात झाली आहे.

सध्या राज्यात 5 लाख 29 हजार 344 व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर 6 हजार 980 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. तर अ‍ॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या 84 हजार 464 इतकी आहे. आज नोंदवण्यात आलेल्या 65 मृत्यूंपैकी 56मृत्यू हे मागील 48 तासांमधले आहेत. तर नऊ मृत्यू हे गेल्या आठवड्यातील आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट महागात पडेल: राजेश टोपे

महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आली तर ती सर्वांना महागात पडेल. राज्यात ती येऊ नये असं वाटतं पण मनात भीती असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काही दिवसांपूर्वीच सांगितले होते. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळं राज्यातील जनतेनं केरळ आणि दिल्लीचा बोध घ्यावा, असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी नागरिकांना केले होते.

संबंधित बातम्या:

लॉकडाऊनसाठी आता राज्यांना केंद्र सरकारची परवानगी आवश्यक; गृहमंत्रालयाची नवी नियमावली जाहीर

देशाच्या तुलनेत आपला ग्रोथ रेट कमी, महाराष्ट्र सेफ झोनमध्ये; आता दिवसाला 90 हजार टेस्टचे लक्ष्य : राजेश टोपे

बिनधास्त राहण्याची प्रवृत्ती वाढली, पुन्हा निर्बंध लावणार, राजेश टोपेंचा कडक इशारा

(Coronavirus surges in Maharashtra)

Follow Us