‘बालभारती’कडून 426 टन पुस्तके रद्दीत, लाखो पुस्तकांचा कोट्यवधींचा छपाई खर्च पाण्यात

| Updated on: Aug 18, 2021 | 6:43 PM

'बालभारती'ने (Balbharti) आपल्याकडील शेकडो टन पुस्तकं रद्दीत (Books Scraped) काढण्याचा निर्णय घेतला आहे. ही पुस्तकं जुन्या अभ्यासक्रमाची असल्याचं बालभारतीकडून सांगण्यात आलं आहे. शेकडो टन पुस्तकं रद्दीत देण्यासाठी बालभारतीकडून टेंडर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे,

बालभारतीकडून 426 टन पुस्तके रद्दीत, लाखो पुस्तकांचा कोट्यवधींचा छपाई खर्च पाण्यात
बालभारती, पुणे
Follow us on

पुणे : महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ म्हणजेच ‘बालभारती’ने (Balbharti) आपल्याकडील शेकडो टन पुस्तकं रद्दीत (Books Scraped) काढण्याचा निर्णय घेतला आहे. ही पुस्तकं जुन्या अभ्यासक्रमाची असल्याचं बालभारतीकडून सांगण्यात आलं आहे. शेकडो टन पुस्तकं रद्दीत देण्यासाठी बालभारतीकडून टेंडर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, त्यासाठी वर्तमानपत्रांमध्ये जाहिरातही देण्यात आली आहे. (Maharashtra State Textbook Production Board has scraped 426 tons of its books)

पहिली ते बारावीची ४२६ टन पुस्तकं रद्दीत!

पहिली ते बारावीपर्यंतच्या अभ्यासक्रमासोबत इतर अवांतर असलेल्या तब्बल 426  टन पुस्तके बालभारती रद्दीत काढणार आहे. या पुस्तकांची संख्या काही लाखांच्या घरात आहे. ही पुस्तकं मंडळाच्या पुणे, गोरेगाव, लातूर, नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती, नाशिक आणि पनवेल याठिकाणी असलेल्या गोदामांमध्ये पडून आहेत. कागदी लगदा करण्यासाठी या पुस्तकांची विक्री केली जाणार असल्याचं बालभारतीनं स्पष्ट केलं आहे. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात पुस्तकं गोदामात पडून राहिलीच कशी, असा सवाल उपस्थित होत आहे.

रद्दीत काढलेली पुस्तकं जुन्या अभ्यासक्रमाची

इयत्ता पहिली ते बारावीचा अभ्यासक्रम दोन वर्षांपूर्वी बदलण्यात आला. त्यानंतर नव्या अभ्यासक्रमानुसार पुस्तके छापन्यात येत आहेत. शिवाय गेल्यावर्षीपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांचं ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. त्यामुळे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना गेल्यावर्षी आणि यावर्षीही पुस्तकं मिळू शकलेली नाहीत. अभ्यासक्रम बदललेला असल्यानं एवढ्या मोठ्या प्रमाणात पुस्तकं वापरात आलेली नाहीत. त्यामुळे पुस्तकांच्या छपाईसाठी आलेल्या कोट्यवधी रुपयांचा खर्च वाया गेला आहे असंच म्हणावं लागेल. एकीकडे अनेक भागात विद्यार्थ्यांना पुस्तकांविना रहावं लागतं आणि दुसरीकडे वापराविना पडून असलेल्या लाखो पुस्तकांना रद्दीत घातलं जात आहे.

‘बालभारती’नं कोट्यवधींचं नुकसान का केलं?

बालभारतीच्या एका पुस्तकाची किंमत सरासरी 35 ते 40 रुपयांच्या घरात आहे. एका विद्यार्थ्याला सर्व विषयांच्या पुस्तकांचा सेट सुमारे 350 रुपयांना मिळतो. बालभारती ज्या पुस्तकांना रद्दीत काढण्यासाठी निविदा मागवत आहे त्या पुस्तकांची संख्या काही लाखांच्या घरात आहे. त्यामुळे या पुस्तकांची छपाई किंमत जरी लक्षात घेतली तरी ती कित्येक कोटी रुपये आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करून छापलेली पुस्तकं वापराविना पडून ठेऊन बालभारतीनं आपलं नुकसान का केलं असा सवाल विचारला जात आहे.

‘बालभारती’कडून रद्दीबाबत स्पष्टीकरण

पुस्कतं रद्दीत काढण्याची प्रक्रिया ही नियमित असल्याचं स्पष्टीकरण बालभारतीकडून देण्यात आलं आहे. 2018 मध्येही अशाच प्रकारे पुस्तकं रद्दीत देण्यात आली होती. गोदामांमध्ये वापरात नसलेली पुस्तकं ठेवण्यात अडचणी येत असल्यानं ती रद्दीत काढण्यात येत आहेत असं बालभारतीकडून सांगण्यात आलं आहे. यातून कसलाही नफा मिळवण्याचा उद्देश नसल्याचंही बालभारतीनं स्पष्ट केलं आहे.

संबंधित बातम्या :

पुण्याच्या ‘डेक्कन कॉलेज’ची द्विशताब्दीकडे वाटचाल, 4 नव्या अभ्यासक्रमांची घोषणा, टपाल तिकीटही काढलं जाणार

पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये ११ वी प्रवेश प्रक्रियेला उत्स्फूर्त प्रतिसाद, ५३ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी, प्रक्रियेबाबत एकही तक्रार नाही!

पीएसआयच्या भरतीत धनगर समाजाला अवघ्या तीन जागा, विद्यार्थी संतापले; एमपीएससी आयोगावर आंदोलनाचा इशारा