6 ऑक्टोबरला ‘मातोश्री’बाहेर आंदोलन तर 10 ऑक्टोबर रोजी ‘महाराष्ट्र बंद’; मराठा आंदोलकांचा इशारा

| Updated on: Oct 01, 2020 | 1:58 PM

मुख्यमंत्र्यांनी घराबाहेर पडून मराठा आरक्षणाची भूमिका स्पष्ट करावी. समाजाशी संवाद साधावा. मंगळवारपर्यंत निर्णय घ्या. त्यानंतर मात्र, ६ ऑक्टोबर रोजी आम्ही मातोश्रीसमोरच आंदोलन करू, असा इशारा आबा पाटील यांनी दिला.

6 ऑक्टोबरला मातोश्रीबाहेर आंदोलन तर 10 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंद; मराठा आंदोलकांचा इशारा
Follow us on

कोल्हापूर: मराठा आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 5 ऑक्टोबरपर्यंत घराबाहेर पडून भूमिका स्पष्ट करावी. मराठी आंदोलकांशी संवाद साधावा. अन्यथा येत्या 6 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’बाहेर आंदोलन करू, असा तीव्र इशारा मराठा आंदोलकांनी दिला आहे. मराठा आंदोलकांनी आता थेट मुख्यमंत्र्यांनाच अल्टिमेटम दिल्याने मराठा आंदोलन येत्या काळात आणखीनच चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. (maratha samaj samanvay samiti ultimatum to cm uddhav thackeray)

कोल्हापुरात आज मराठा समाज समन्वय समितीची बैठक पार पडली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन समितीचे आबा पाटील यांनी हा इशारा दिला. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने मराठा तरुणांचे मोठे नुकसान झाले आहे. आरक्षणाबाबत कोणतीही ठोस भूमिका बाहेर येत नसल्याने तरुणांमध्ये संभ्रमाचे आणि अनिश्चिततेचे वातावरण आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी घराबाहेर पडून भूमिका स्पष्ट करावी. समाजाशी संवाद साधावा. मंगळवारपर्यंत निर्णय घ्या. त्यानंतर मात्र, 6 ऑक्टोबर रोजी आम्ही मातोश्रीसमोरच आंदोलन करू, असा इशारा आबा पाटील यांनी दिला.

एमपीएससीची परीक्षा पुढे ढकला

यावेळी पाटील यांनी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली. मराठा आरक्षणाला स्थगिती असतानाही एमपीएससी परीक्षा घेण्याचा घाट कोण घालत आहे? त्यांची नावे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावी. ही परीक्षा तात्काळ पुढे ढकलण्यात यावी, अन्यथा एमपीएससीचे परीक्षा केंद्र फोडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. विवेक रहाडे या विद्यार्थाची आत्महत्या हे त्याचे एकट्याचे बलिदान नाही. या बलिदानातून आता तरी सरकारने जागे व्हावे. विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान थांबवावे, असं सांगतानाच सरकारने एसईबीसी दाखले देण्याबाबतचा संभ्रमही दूर करण्याची मागणी त्यांनी केली. (maratha samaj samanvay samiti ultimatum to cm uddhav thackeray)

10 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद

यावेळी मराठा आंदोलकांनी 10 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदची घोषणा करण्यात आली. हा बंद शांततेत करण्यात येईल. कुणीही त्या दिवशी खळखट्ट्याक करू नये, दगडफेक करू नये, असं आवाहन मराठा आरक्षण संघर्ष समितीने केलं आहे. या बंदमधून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. बंद दरम्यान काही महामार्ग अडवले जातील. रास्तारोको केला जाईल. पण बंदला हिंसक वळण लागलं तर त्याला सरकारच जबाबदार असेल, असंही ते म्हणाले.

आम्ही राज्यातील वेगवेगळ्या भागात दौरे करत आहोत. तरुणांच्या भावना जाणून घेत आहोत. काल एका तरुणाने बीडमध्ये आत्महत्या केली. केवळ आरक्षण नसल्याने यशस्वी होऊ शकत नसल्याने त्याने हे पाऊल उचलले. त्यामुळेच आम्ही मराठा तरुणांच्या भावनांना वाट मोकळी करून देण्यासाठी हा बंद पुकारला आहे, असं संघर्ष समितीचे सुरेश पाटील यांनी सांगितलं.

मंत्र्यांना बाहेर फिरू देणार नाही

केंद्र सरकारने दिलेल्या 10 टक्के आरक्षणाच्या सवलती द्या. मेगा भरतीला स्थगिती द्या, आणि मराठा समाजावर आंदोलन करताना दाखल झालेले गुन्हे मागे करा, आदी मागण्यांचा पुनरुच्चारही सुरेश पाटील यांनी यावेळी केला. नुकत्याच झालेल्या गोलमेज परिषदेत ५१ संघटना आल्या होत्या. यावेळी २०० प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत सर्वानुमते 10 तारखेच्या बंदचा निर्णय घेण्यात आला, असं सांगतानाच आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर राज्यातील एकाही मंत्र्याला बाहेर फिरू देणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

चर्चेला तयार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण बंद बाबतचं पत्रं दिलं आहे. पण बंदपूर्वी जर त्यांना आमच्याशी चर्चा करायची असेल तर आम्ही चर्चेला तयार आहोत, असंही पाटील यांनी शेवटी स्पष्ट केलं.

संबंधित बातम्या:

मराठा आरक्षणप्रश्नी पार्थ पवार मैदानात; सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करणार!

मराठा समाजाचा EWS आरक्षणाला विरोध, खासदार संभाजीराजे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

मी मेल्यावर तरी राज्य-केंद्र सरकारला मराठ्यांच्या मुलांची कीव येईल, बीडच्या विवेकची सुसाईड नोट

(maratha samaj samanvay samiti ultimatum to cm uddhav thackeray)