#MeToo च्या आरोपीसोबत काम न करण्याच्या निर्णयावर यूटर्न, तनुश्रीचा आमीरवर निशाणा

| Updated on: Sep 11, 2019 | 8:44 AM

आमीर खानने लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेला दिग्दर्शक सुभाष कपूरसोबत काम न करण्याच्या निर्णयावरुन घूमजाव केल्यामुळे तनुश्री दत्ताने त्याला चांगलंच धारेवर धरलं आहे

#MeToo च्या आरोपीसोबत काम न करण्याच्या निर्णयावर यूटर्न, तनुश्रीचा आमीरवर निशाणा
Follow us on

मुंबई : ‘मीटू’ चळवळी (#MeToo Movement) अंतर्गत लैंगिक शोषणाचे आरोप झालेल्या कलाकारांसोबत काम न करण्याच्या निर्णयावरुन यूटर्न (Tanushree Slams Aamir Khan) घेणारा अभिनेता आमीर खान (Aamir Khan) वर अभिनेत्री तनुश्री दत्ता (Tanushree Dutta) हिने चांगलीच आगपाखड केली आहे. ‘दिग्दर्शक सुभाष कपूरवर अन्याय झाल्याच्या भावना वाटतात, मग माझ्याविषयी कळवळा नाही का?’ असा सवाल तनुश्रीने (Tanushree Slams Aamir Khan) विचारला आहे.

गुलशन कुमार यांच्या आयुष्यावर आधारित ‘मोगल’ चित्रपटाचा दिग्दर्शक सुभाष कपूरवर ‘मीटू’ चळवळी अंतर्गत लैंगिक शोषणाचे आरोप झाले होते. त्यामुळे त्याच्यासोबत काम न करण्याचा निर्णय मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानने घेतला होता.

‘माझ्या कृत्यामुळे नकळतपणे एका व्यक्तीने आपला उपजीविका मिळवण्याचा हक्क गमावला आहे, हे विचार सतत माझ्या मनात यायचे. त्याच्या मनातील पश्चातापदग्ध भावनांविषयी मला कल्पनाही नसेल, असं वाटून रात्ररात्रभर मला झोप यायची नाही. त्यामुळे त्याच्यासोबत (सुभाष कपूर) काम न करण्याचा निर्णय मी मागे घेत आहे.’ असं स्पष्टीकरण आमीर खानने दिलं होतं.

आमीरने आपल्या निर्णयावरुन घूमजाव केल्यामुळे तनुश्री दत्ता (Tanushree Slams Aamir Khan) चांगलीच भडकली. ‘एखादी महिला जेव्हा अत्याचाराला बळी पडते, आणि या धक्क्यामुळे चित्रपटात काम करु शकत नाही, तेव्हा बॉलिवूडमधील कोणाचीच झोप कशी उडत नाही?’ असा सवाल तनुश्रीने उपस्थित केला आहे.

‘जर आमीरने सुभाष कपूरला काम दिलं, तर त्याच्या अत्याचाराला बळी पडलेल्या गीतिका त्यागीला का काम देत नाही? का बॉलिवूडमधील भीतीदायक पुरुषांना सहानुभूती मिळते. मुलींनाही थोडं बरं वाटू द्या’ असं तनुश्री म्हणते.

माझ्याविषयी कळवळा नाही का?

‘कोर्टात न्याय न मिळाल्यामुळे ज्यांच्या जखमा भरु शकत नाहीत, त्यांच्याविषयी संवेदना म्हणून आरोपींसोबत काम न करण्याचा निर्णय झाला होता. मात्र बॉलिवूडमधील दिग्गजच असा दुजाभाव करत असताली, तर तो कळवळा नाही. तो सोयीस्करपणा आणि दुर्लक्ष करणं आहे. 2009 मध्ये हॉर्न ओके प्लीज चित्रपटानंतर माझीही उपजीविका काढून घेतली गेली, तेव्हा कोणीच मी काय करते, याविषयी तमा बाळगली नाही. आमीर तुला माझ्याविषयी कळवळा नाही का?’ असा प्रश्न तनुश्रीने विचारला.

‘कोर्टाच्या निर्णयाची वाट बघत बसताना तुमच्यावर अत्याचार करणारे मात्र उजळ माथ्याने काम करत आहेत, ते पाहताना होणाऱ्या वेदनेची जाण ठेव. जर प्रत्येक शोषणकर्त्याला काम मिळालं, तर अत्याचारमुक्त कार्यालयाची कल्पना स्वप्नवतच राहील’ अशी खंतही तनुश्रीने व्यक्त केली.

नाना पाटेकरांवर आरोप

तनुश्री दत्ताने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. दशकभर मनात बाळगलेली सल तिने गेल्या वर्षी एका कार्यक्रमात बोलून दाखवली. त्यानंतर फक्त अभिनेत्रीच नाही, तर विविध क्षेत्रातील अनेक पीडित महिलांना आवाज उठवला. तनुश्री एका अर्थाने भारतातील ‘मीटू’ चळवळीची अग्रणी ठरली होती.

बॉलिवूडमधील अनेक चेहरे डागाळले

नाना पाटेकर यांना पोलिसांनी क्लीन चिट दिली असली, तरी तनुश्री वारंवार नाना पाटेकर आणि पोलिसांवर संताप व्यक्त करत आहे. ‘मीटू’ चळवळी अंतर्गत दिग्गज अभिनेते आलोकनाथ, साजिद कपूर, विकास बहल, अनुराग कश्यप, वरुण ग्रोवर, लव रंजन, अनू मलिक, कैलाश खेर, चेतन भगत अशा कित्येक सेलिब्रिटींची नावं काळवंडली. त्यातील काही जण तावूनसुलाखून बाहेर पडले, अनेकांना पुन्हा कामंही मिळाली.

संबंधित बातमी:

#MeToo : नाना पाटेकरांना क्लीनचिट, तनुश्री दत्ता पोलिसांवर भडकली