घरात बसून परीक्षा देण्यास राज्यपालांची मंजुरी, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात अंतिम वर्षांच्या परीक्षा : उदय सामंत

| Updated on: Sep 03, 2020 | 8:23 PM

अंतिम वर्षांच्या परीक्षा कधी आणि कशा घ्यायच्या या विषयावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली राजभवन येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली (Minister Uday Samant on last year exam).

घरात बसून परीक्षा देण्यास राज्यपालांची मंजुरी, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात अंतिम वर्षांच्या परीक्षा : उदय सामंत
Follow us on

मुंबई : “कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांना घरात बसून परीक्षा देता यावी, असा आमचा आग्रह होता. या आग्रहाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मान्यता दिली आहे”, अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली (Minister Uday Samant on last year exam).

अंतिम वर्षांच्या परीक्षा कधी आणि कशा घ्यायच्या या विषयावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली राजभवन येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री प्राजक्त तणपुरे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु सुहास पेडणेकरदेखील उपस्थित होते. या बैठकीनंतर उदय सामंत यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.

“घरात बसून परीक्षा घेण्याच्या पद्धती तीन ते चार प्रकारच्या आहे. ऑनलाईन, ऑफलाईन, MCQ असे अनेक प्रकार आहेत. याबाबत अंतिम अहवाल आज रात्रीपर्यंत तयार होणार आहे. हा अहवाल उद्या (4 सप्टेंबर) शासनाकडे प्राप्त होईल. उद्या शासनाकडे अहवाल प्राप्त झाल्यानंतर कोणतीही मुदत न घेता तो अहवाल तातडीने विद्यापीठांकडे पाठवू”, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.

“ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा होतील. परीक्षेच्या तारखा विद्यापीठ त्यांच्या बोर्डात जाऊन निश्चित करणार आहेत. तारखा निश्चित झाल्यावर जाहीर करु. पण विद्यार्थ्यांच्या लेखी परीक्षा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात होतील, असं गृहित धरायला हरकत नाही”, असं उदय सामंत म्हणाले.

“आम्ही सोमवारी किंवा मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक घेऊन युजीसीला परीक्षेची तारीख वाढवण्याबाबत विनंती करु. 31 ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रातील सगळे निकाल जाहीर करु शकतो, अशी भूमिका कुलगुरुंनी घेतली आहे. त्याबाबतचा पाठपुरावा आम्ही यूजीसीकडे देऊ”, असं उदय सामंत यांनी सांगितलं.

“15 ते 30 सप्टेंबर या कालावधीत प्रॅक्टिकल परीक्षा सोप्या पद्धतीने घेण्याचं नियोजन कुलगुरु घेत आहेत. प्रॅक्टिकल परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना लॅबमध्ये जावं लागू नाही, अशा सूचना केल्या होत्या. त्याचप्रकारे अहवाल सादर करण्यात आला आहे. या अहवालाची माहिती उद्या दिली जाईल”, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.

“ऑक्टोबर महिन्यात निर्णय घेऊन 31 ऑक्टोबरपर्यंत निकाल द्यावा, अशा पद्धतीच्या सूचना महाराष्ट्र सरकारच्यावतीने आम्ही कुलगुरुंना केल्या आहेत. आज कुलपती म्हणून राज्यपालांनीदेखील त्याच सूचना कुलगुरुंना केल्या आहेत”, असं उदय सामंत म्हणाले (Minister Uday Samant on last year exam).

“परीक्षा कसा घ्यायचा हा निर्णय कुलगुरु आणि विद्यापीठांनी घ्यायचा होता. सरकार म्हणून आमचा त्यांना पाठिंबा होता. मात्र, फिजिकली परीक्षा घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना कोरोना संसर्गाचा धोका आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन परीक्षा घेण्यात येणार आहेत. मात्र, परीक्षा नेमक्या कशा पद्धतीने घेणार, याबाबत उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत जाहीर करण्यात येईल. अतिशय चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या वातावरणात विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या जातील”, असं उदय सामंत यांनी सांगितलं.

“सु्प्रीम कोर्टात सरकारने परीक्षा रद्दच कराव्यात, अशी पहिली भूमिका मांडली होती. आता परीक्षा घ्यायच्या म्हटल्यावर ही सगळी जबाबदारी विद्यापीठांची आहे. परीक्षा सोप्या पद्धतीने कशा घ्यायच्या, विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही, त्यांच्यावर मानसिक दडपन येऊ नये हे सर्व लक्षात घेऊन परीक्षा घ्यायच्या आहेत”, असं उदय सामंत म्हणाले.

“राज्यपालांसोबत चर्चा करताना आमच्या बोलण्यात विसंगती नाही, हे त्यांच्या लक्षात आलं आहे. आम्ही एकमेकांच्या संपर्कात आहोत. मंत्री आणि राज्यमंत्री दोघी कुलगुरुंच्या संपर्कात आहेत, याची राज्यपालांना खात्री झाली. त्यामुळे आजची चर्चा सकारात्मक आणि विद्यार्थ्यांच्या बाजूने झाली. एटीकेटीच्या परीक्षादेखील सोप्या पद्धतीने होतील”, असं उदय सामंत यांनी सांगितलं.