आता ओबीसींनाही हवाय ज्यादा निधी, वडेट्टीवारांच्या नेतृत्वात ओबीसी नेते मुख्यमंत्र्यांना भेटणार

| Updated on: Sep 23, 2020 | 4:52 PM

पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधतानाही ही माहिती दिली. (OBC Community Leader meet CM Uddhav thackeray for Extra Fund)

आता ओबीसींनाही हवाय ज्यादा निधी, वडेट्टीवारांच्या नेतृत्वात ओबीसी नेते मुख्यमंत्र्यांना भेटणार
विजय वडेट्टीवार आणि उद्धव ठाकरे
Follow us on

मुंबई : मराठा समाजाच्या विकासासाठी राज्य सरकारने भरीव निधीची तरतूद केल्यानंतर आता ओबीसी समाजानेही ज्यादा निधी मिळावा म्हणून कंबर कसली आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात ओबीसींनाही निधी मिळावा म्हणून राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात ओबीसी समाजाचे नेते आज संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधतानाही ही माहिती दिली. (OBC Community Leader meet CM Uddhav thackeray for Extra Fund)

मराठा समाजाला EWSमधून आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याला सगळ्यांनी पाठिंबा दिला आहे. मराठा समाजाला विरोध नसल्याचं मी कालच स्पष्ट केलं आहे. पण राज्यात 52 टक्के ओबीसी आहेत. त्यांनाही न्याय मिळाला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. ओबीसींनाही न्याय मिळावा म्हणून अनेक ओबीसी नेते आज मला भेटले. त्या सर्वांना घेऊन मी आज संध्याकाळी 6 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार आहे. ओबीसींना लोकसंख्येच्या प्रमाणात निधी मिळाला पाहिजे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असून आम्हाला मुख्यमंत्री न्याय देतील अशी आशा आहे, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं. तसेच याच मुद्द्यावर उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

ओबीसी समाजात कोळी, माळी, धनगर असा रोज कमावून खाणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे त्यांचाही विकास झाला पाहिजे. ओबीसी विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यात अडचण येऊ नये म्हणून वसतिगृहे स्थापन केली पाहिजेत, असं सांगतानाच ओबीसी महामंडळ आणि वसंतराव नाईक विकास महामंडळाला अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्याची आग्रही भूमिका मुख्यमंत्र्यांकडे मांडण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

ओबीसी आरक्षण 27 टक्के आहे. भटक्या विमुक्त जमातींना 8 टक्के आरक्षण आहे. त्यामुळे या 19 टक्के आरक्षणात 12 टक्के आरक्षण देता येणार नाही. ओबीसींच्या कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण नको ही आमची भूमिका कायम राहणार आहे. याचा अर्थ मराठा आरक्षणाला विरोध नाही. पण ओबीसींचं नुकसान नको, असं सांगतानाच राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्या मताशी सहमत नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

सुशांत, कंगना प्रकरण निवडणुका झाल्यावर संपेल

यावेळी त्यांनी बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांच्या निवृत्तीच्या निर्णयावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. पांडे यांच्या विषयावर बोलण्याचं आम्ही बंद केलं आहे. त्यांची काय भूमिका होती हे सुरुवातीपासून दिसत होतं. ते यापूर्वीही राजकीय पक्षात जाऊन निवडणूक लढले होते. त्यांची सुरुवातीपासूनची भूमिका भाजपधार्जिणी होती, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. अभिनेत्री कंगना रणोत आणि सुशांतसिंह प्रकरण बिहार निवडणुका झाल्यानंतर बंद होतील, असं सांगतानाच कंगनाला उद्या राज्यसभेची उमेदवारीही मिळेल, असा दावाही वडेट्टीवार यांनी केला. (OBC Community Leader meet CM Uddhav thackeray for Extra Fund)

संबंधित बातम्या : 

मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्याची जबाबदारी राज्य सरकारचीच, गोलमेज परिषदेत 15 ठराव मंजूर

Maratha Reservation | मराठा आरक्षणासाठी 10 ऑक्‍टोबरला महाराष्ट्र बंद, मराठा नेते आक्रमक