मराठा आरक्षणाबाबत ही गंभीर चूक होत आहे, खासदार संभाजीराजेंचं महाराष्ट्र सरकारला पत्र

| Updated on: Dec 18, 2019 | 7:14 PM

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी महाराष्ट्र सरकारला पत्र लिहून सरकारकडून गंभीर चूक होत असल्याचं म्हटलं आहे (Sambhajiraje Chhatrapati on Maratha Reservation case).

मराठा आरक्षणाबाबत ही गंभीर चूक होत आहे, खासदार संभाजीराजेंचं महाराष्ट्र सरकारला पत्र
छत्रपती संभाजीराजे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us on

नवी दिल्ली : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी महाराष्ट्र सरकारला पत्र लिहून सरकारकडून गंभीर चूक होत असल्याचं म्हटलं आहे (Sambhajiraje Chhatrapati on Maratha Reservation case). सरकारला लिहिलेल्या पत्रात खासदार संभाजीराजेंनी मराठा आरक्षणाचा खटला लढणारे वकील बदलवण्याचा मुद्दा उपस्थित केला. तसेच मराठा आरक्षणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात असताना वकील बदलण्याचा निर्णय गंभीर चूक असल्याचं म्हटलं आहे (Sambhajiraje Chhatrapati on Maratha Reservation case).

संभाजीराजे म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाबाबत भूमिका मांडणाऱ्या पूर्वीच्या वकिलांना बदलण्यात आले आहे? जर हे खरं असेल, तर सर्वोच्च न्यायालयात यशस्वी लढा देत असलेल्या मुकुल रोहतगी आणि नाडकर्णी या ज्येष्ठ वकिलांना बदलण्याचं कारण काय? आज आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी न्यायालयात वरीलपैकी कोणतेही वकील हजर नव्हते. सर्वोच्च न्यायालयात प्रचंड मोठ्या त्यागातून मिळत असलेल्या आरक्षणाची अटीतटीची आणि अंतिम लढाई सुरु आहे. अशा स्थितीत वकील बदलून सरकारकडून गंभीर चूक होत आहे असं वाटत नाही का? मुख्यमंत्र्यांना याबाबत माहिती दिली आहे का?”

सरकारी वकील राहुल चिटणीस यांनी रोहतगी आणि नाडकर्णी यांना बाजू न मांडण्याची विनंती केली. यासाठी एवढे महागडे वकील का लावायचे? त्यांना एवढी फी देण्याची आवश्यकता काय? असं मत चिटणीस यांनी व्यक्त केल्याचंही संभाजीराजेंनी आपल्या पत्रात म्हटलं. तसंच संबंधित वकिल महागडे आहे हे कारण पुरेसं नसल्याचंही नमूद केलं.

संभाजीराजे म्हणाले, “मराठा आरक्षण उच्च न्यायालयात टिकण्यात दोन्ही वकिलांची महत्त्वाची भूमिका होती. या अनुभवी वकिलांना बाजूला करणे योग्य नाही. सरकारकडे मराठा आरक्षणाचा खटला लढण्यासाठी पैसे नाही असं होणार नाही. उलट सरकारने हा खटला लढण्यासाठी देशातील सर्वोत्तम वकिलांना भूमिका मांडण्यास सांगितलं पाहिजे. या परिस्थितीत प्रत्येक पाऊल जपून टाकलं पाहिजे. कसल्याही प्रकारची चूक परवडणारी नाही. मुख्यमंत्र्यांनी त्वरीत यावर उपाय करण्याची आवश्यकता आहे.”