संजय राऊतांच्या आरेला किरीट सोमय्यांचं कारेने उत्तर, थेट मुख्यमंत्री ठाकरेंना खडे सवाल

| Updated on: Nov 13, 2020 | 1:34 PM

शिवसेना नेते संजय राऊत यांनी किरिट सोमय्या यांच्या आरोपात तथ्य नसल्याचं सांगत सर्व आरोप फेटाळून लावले होते. तसंच सोमय्या यांचा अगदी शेलक्या शब्दात समाचार घेतला. त्यावर मुख्यमंत्र्यांना विचारलेल्या ५ प्रश्नांची उत्तरं द्या, तुमच्यात तेवढी हिंमत आहे का? असा सवाल सोमय्या यांनी विचारत राऊतांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

संजय राऊतांच्या आरेला किरीट सोमय्यांचं कारेने उत्तर, थेट मुख्यमंत्री ठाकरेंना खडे सवाल
Follow us on

मुंबई: भाजपचे नेते किरिट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. रश्मी ठाकरे यांनी आतापर्यंत एकूण 40 जमीन व्यवहार केले आहेत. त्यातील 30 व्यवहार हे एकट्या अन्वय नाईक यांच्याबरोबर आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, रश्मी ठाकरे यांच्या प्रतिनिधींनी याचं उत्तर द्यावं. पण याबाबत उत्तर देण्याची हिंमत उद्धव ठाकरे यांच्यामध्ये नाही, अशा शब्दात किरिट सोमय्या यांनी ठाकरेंवर टीकास्त्र डागलं आहे.  त्याचबरोबर शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या आरेला सोमय्या यांनी कारेनं उत्तर दिलं आहे. (Kirit somayya serious allegation on CM Uddhav Thackeray)

शिवसेना नेते संजय राऊत यांनी किरिट सोमय्या यांच्या आरोपात तथ्य नसल्याचं सांगत सर्व आरोप फेटाळून लावले होते. तसंच सोमय्या यांचा अगदी शेलक्या शब्दात समाचार घेतला. त्यावर मुख्यमंत्र्यांना विचारलेल्या 5 प्रश्नांची उत्तरं द्या, तुमच्यात तेवढी हिंमत आहे का? असा सवाल सोमय्या यांनी विचारत राऊतांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर नगरसेविका असताना बनावट कागदपत्र तयार करुन झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचा फायदा करुन घेतला होता. जी जमीन 2 कोटी 55 लाख रुपयात बिल्डर अल्पेश अजमेराने घेतली. तीच जमीन मुंबई महापालिकेनं 900 कोटी रुपयांना का घेतली? असा सवालही सोमय्या यांनी विचारला आहे. संजय राऊत किंवा शिवसेनेच्या अजून कुणामध्ये हिंमत असेल तर त्यांनी याबाबत बोलावं, असं आव्हानही सोमय्यांनी शिवसेनेला दिलं आहे.

जमीन व्यवहारावरुन सोमय्यांचा हल्लाबोल

रश्मी ठाकरे यांनी एकूण 40 जमीन व्यवहार केले. त्यातील 30 व्यवहार हे एकट्या नाईक परिवारासोबत केले गेल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. रविंद्र वायकांसोबत काय आर्थिक संबंध आहेत? वायकरांसोबत बिझनेस पार्टनरशिप आहे का? असे प्रश्नही सोमय्या यांनी विचारले आहेत. खासदार संजय राऊत किंवा शिवसेनेच्या कोणत्याही नेत्यांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी याचं उत्तर द्यावं, असं थेट आव्हान सोमय्या यांनी दिलं आहे.

तीन कथित घोटाळ्यांची कागदपत्रे जाहीर

दिवाळीपूर्वी ठाकरे सरकारच्या तीन घोटाळ्यांची कागदपत्रे जनतेसमोर मांडणार, असे वचन दिले होते. ते वचन आज मी पूर्ण करत असल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले. किरीट सोमय्या यांनी आरोप केलेल्या या 3 कथित घोटाळ्यांमध्ये दहिसर भूखंड घोटाळा, ठाकरे आणि नाईक कुटुंबीय जमीन व्यवहार आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी बनावट कागदपत्रांद्वारे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचा (SRA) लाभ घेतल्याच्या प्रकरणाचा समावेश आहे. आपण आता या सगळ्या घोटाळ्यांविरोधात उच्च न्यायालय आणि लोकायुक्तांकडे दाद मागणार असल्याचेही किरीट सोमय्या यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

किशोरी पेडणेकरांवर कारवाई का नाही? सोमय्यांची महापौर, ठाकरे सरकार, मुंबई मनपाविरोधात याचिका

किरीट सोमय्यांनी पुन्हा वात पेटवली; ठाकरे सरकारच्या तीन कथित घोटाळ्यांची कागदपत्रे जाहीर

ठाकरे कुटुंबाचे 40 पैकी 30 जमिनींचे व्यवहार अन्वय नाईक यांच्याशी कसे?; सोमय्यांचा सवाल

Kirit somayya serious allegation on CM Uddhav Thackeray