आंतरजातीय विवाह केल्याने दलित युवकाची पोलिसांसमोरच हत्या

| Updated on: Jul 09, 2019 | 9:31 PM

गुजरातमध्ये अहमदाबाद येथे आंतरजातीय विवाह केल्याने पोलिसांच्या समोरच हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

आंतरजातीय विवाह केल्याने दलित युवकाची पोलिसांसमोरच हत्या
Follow us on

अहमदाबाद: गुजरातमध्ये अहमदाबाद येथे आंतरजातीय विवाह केल्याने पोलिसांच्या समोरच हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून सवर्ण जातीतील लोकांनी हरेश सोलंकी (25 वर्षे) या दलित युवकाची तलवारीने कापून हत्या केली.

संबंधित युवक आपल्या नवविवाहित पत्नीला घेण्यासाठी सासरवाडीला जात होता. यासाठी संबंधित युवकाने सुरक्षेसाठी गुजरात सरकारच्या ‘अभयम’ हेल्पलाईन पथकाची मदत घेतली. संबंधित पोलीस पथक सोबत असतानाही सवर्ण जातीतील लोकांनी तलवारीने युवकावर हल्ला केला. अहमदाबाद ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करुन एका व्यक्तीला अटक केले आहे.

दलित युवकावर हल्ला करणाऱ्यांपैकी अन्य 7 आरोपी फरार आहेत. संबंधित 7 आरोपी एकाच गावचे रहिवासी असून त्यांचा तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ‘अभयम’ हेल्पलाइनचे समुपदेशक बाविका भागोरा यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार हरेश सोलंकी सवर्ण जातीतील पत्नी उर्मिलाला आणण्यासाठी अहमदाबाद जिल्ह्यातील वारमोर गावात (तालुका – मंडल) जात होता. दरम्यान, धारदार हत्यारं घेऊन जवळपास 10 लोकांनी हल्ला केला. यावेळी हल्लेखोरांनी गुजरात सरकारच्या ‘अभयम’ हेल्पलाइन पथकाच्या वाहनावरही हल्ला करण्यात आला. यात वाहनाचे मोठे नुकसान झाले आणि पोलीसही जखमी झाले.

घटनास्थळावर पोहचलेले दलित कार्यकर्ते किरीट राठोड यांनी सांगितले, “हरेश आणि उर्मिला कादी येथील एका महाविद्यालयात शिकत होते. त्यांनी 6 महिन्यांपूर्वीच लग्न केलं. हरेश सोलंकी कच्छ जिल्ह्यातील गांधीधामचा रहिवासी होता.”

लग्नाला घरच्यांचा विरोध

हरेश दलित असल्याने उर्मिलाच्या लग्नाला तिच्या घरच्यांचा विरोध होता. लग्नानंतर उर्मिलाच्या कुटुंबीयांनी गोड बोलून तिला माहेरी नेले आणि तिला पुन्हा पतीकडे पाठवू असे आश्वासन दिले. मात्र, त्यानंतर उर्मिलाच्या घरच्यांनी तिला परत पाठवण्यास नकार दिला. त्यानंतर हरेशने 181 ‘अभयम’ महिला हेल्पलाईनशी संपर्क केला. हेल्पलाईनचे पथकाने हरेशसोबत जाऊन मुलीच्या घरच्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी पथकाचे काहीही ऐकून घेता बोलायलाच नकार दिला. मात्र, काहीवेळेतच तेथे अनेक लोक जमा झाले आणि त्यांनी हल्ला केला.