नागपुरातील मोमीनपुरामध्ये कोरोनाचा विळखा घट्ट, शहरातील 45 टक्क्यापेक्षा जास्त रुग्णांची नोंद

| Updated on: May 12, 2020 | 9:59 AM

नागपुरातील मुख्य हॉटस्पॉट असलेल्या सतरंजीपुरामध्ये 107, तर मोमीनपुरामध्ये 140 रुग्ण आढळले आहेत. (Nagpur Mominpura Corona Patients Increase)

नागपुरातील मोमीनपुरामध्ये कोरोनाचा विळखा घट्ट, शहरातील 45 टक्क्यापेक्षा जास्त रुग्णांची नोंद
Follow us on

नागपूर : नागपुरातील मोमीनपुरा परिसर मध्य भारतातील कोरोना साखळीचं सर्वात मोठं केंद्र ठरण्याच्या मार्गावर आहे. एकट्या मोमीनपुरा परिसरात कोरोना रुग्णांची संख्या 140 वर गेली आहे. (Nagpur Mominpura Corona Patients Increase)

एकाच परिसरात इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून येणारं मोमीनपुरा हे मध्य भारतातलं एकमेव ठिकाण आहे. नागपूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या 298 वर पोहोचली आहे. त्यापैकी 45 टक्क्यापेक्षा जास्त रुग्ण एकट्या मोमीनपुरा परिसरात आहेत.

राज्याची उपराजधानी कोरोनाच्या विळख्यात अडकली आहे. रोज नवीन रुग्णांची संख्या वाढत आहे. नागपुरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 300 च्या दिशेने जात असताना त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. नागपुरातील मुख्य हॉटस्पॉट असलेल्या सतरंजीपुरामध्ये 107, तर मोमीनपुरामध्ये 140 रुग्ण आढळले आहेत.

मोमीनपुरा येथील कोरोना साखळी तोडण्याचं मोठं आव्हान प्रशासनासमोर आहे. मोमीनपुऱ्यात नागपूर महापालिकेकडून युद्धपातळीवर उपाययोजना सुरु आहेत. मोमीनपुरा परिसरातील 800 जणांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

आधी सतरंजीपुरा हा मुख्य हॉटस्पॉट ठरत होता. या ठिकाणी 86 वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर त्या ठिकाणावरुन जवळपास 1700 जणांना क्वारंटाईन करण्यात आलं. तर मोमीनपुरा भागात 70 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला, तेव्हा त्या भागातून 600 च्या वर नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आलं होतं.

सुरुवातीला सतरंजीपुरा आणि मोमीनपुरामध्ये पॉझिटिव्ह रुग्ण मोठ्या प्रमाणात येत होते. मात्र आता रामेश्वरी परिसरात एक युवक मृत्यूनंतर कोरोना पॉझिटिव्ह निघाला आणि नागपूरचं टेन्शन वाढलं. या भागातूनही 250 च्या जवळ नागरिकांना क्वारंटाईन केलं आहे. नागपूरला कोरोनामुक्त करण्यासाठी प्रशासनाकडून कठोर पावलं उचलली जात आहेत. (Nagpur Mominpura Corona Patients Increase)

नागपुरात रुग्णसंख्या का वाढत आहे?

-सतरंजीपुरा आणि मोमीनपुरा हा दाटीवाटीचा परिसर
-या भागातील नागरिकांनी सुरुवातीला प्रशासनाला सहकार्य केलं नाही
-दोन्ही भागात एक-एक व्यक्ती कोरोनामुळे मृत्यू पावली, त्यांच्या संपर्कात मोठ्या प्रमाणात नागरिक आले
-नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्यापेक्षा माहिती लपवायला प्राधान्य दिलं