काँग्रेसचं कन्फ्युजन समजू शकतो, पण पवारांना पाकिस्तानचा पुळका का? : नरेंद्र मोदी

| Updated on: Sep 19, 2019 | 3:59 PM

काँग्रेसचं कन्फ्युजन समजू शकतो,  मात्र शरद पवारांचं काय? त्यांना शेजारील पाकिस्तान चांगला वाटोत. पण सर्व जगाला माहित आहे की दहशतवादाची फॅक्टरी कुठे आहे”, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हल्लाबोल केला.

काँग्रेसचं कन्फ्युजन समजू शकतो, पण पवारांना पाकिस्तानचा पुळका का? : नरेंद्र मोदी
Follow us on

नाशिक : “काँग्रेसचं कन्फ्युजन समजू शकतो,  मात्र शरद पवारांचं (Sharad Pawar) काय? त्यांना शेजारील पाकिस्तान चांगला वाटोत. पण सर्व जगाला माहित आहे की दहशतवादाची फॅक्टरी कुठे आहे”, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी हल्लाबोल केला. नाशिकमध्ये मोदींच्या उपस्थितीत भाजपच्या महाजनादेश यात्रेचा समारोप झाला. यावेळी मोदींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं तोंडभरुन कौतुक केलं.

प्रभू श्री राम आणि सीता मातेच्या पदस्पर्शाने पावन आणि सप्तशृंगी मातेच्या नाशिकच्या भूमीला माझा नमस्कार, असं म्हणत मोदींनी मराठीमध्ये भाषणाला सुरुवात केली.

उदयनराजेंकडून पगडी घालून स्वागत

यावेळी उदयनराजेंनी मोदींना पगडी घालून त्यांचं स्वागत केलं. मोदी म्हणाले, “आज मी विशेष अनुभव घेत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनी माझ्या डोक्यावर पगडी घातली. हा माझा सन्मान आहेच पण एक जबाबदारीही आहे. महाराष्ट्राच्या जनतेने मला आशीर्वाद द्यावा जेणेकरुन मी या पगडीसाठी जीवन समर्पित करु शकू”

महाराष्ट्राच्या जनतेने आता ठरवलंय

नाशिकमधील यात्रेने महाजनादेश यात्रेचे सर्व रेकॉर्ड तोडले. देवेंद्र फडणवीस आणि टीमला महाआशीर्वाद देण्यासाठी हा जनसमुदाय लोटला आहे. हा लोकशाहीचा महाकुंभ आहे. महाराष्ट्राच्या जनतेने आता ठरवलं आहे, असं मोदी म्हणाले.

फडणवीसांनी महाराष्ट्राला दिशा दिली

देवेंद्र फडणवीस यांना नमन करतो. देवेंद्र फडणवीस यांनी 5 वर्ष महाराष्ट्राची अविरत सेवा केली. जर मागच्या काही सरकारांनी पाच वर्षे कार्यकाळ पूर्ण केला असता तर चांगलं झालं असतं. महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीसांनी नवी दिशा दिली.

गुजरात महाराष्ट्राचा लहान भाऊ

मी गुजरातचा आहे. गुजरात हा महाराष्ट्राचा लहान भाऊ आहे.  गुजरातमध्ये मला सर्वाधिक काळ सेवा करण्याची संधी मिळाली. 60 वर्षात पहिल्यांदाच एक सरकार सर्वाधिक ताकदीने दुसऱ्यांदा निवडून आलं. ही तुमची ताकद आहे, ही देशाची ताकद आणि जनतेचा आदेश आहे, असं मोदी म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी हिशेब दिला

देवेंद्र फडणवीस यांनी 5 वर्षांचं रिपोर्ट कार्ड सादर केलं. 5 वर्षात महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी वातावरण तयार झालं आहे. महाराष्ट्रातील बघिनींना मुद्रा कर्ज मिळालं. पाण्याचा संघर्ष कमी झाला. भाजप सरकारची ही परंपरा आहे की आम्ही आमच्या कामाचं रिपोर्ट कार्ड देतो, असं मोदींनी सांगितलं.