‘आनंद दिघे यांचा मृत्यू झाला त्यावेळी मिलिंद नार्वेकरांनी मला फोन केला आणि…’, जितेंद्र आव्हाड यांचा गौप्यस्फोट
"आनंद दिघे यांचा मृत्यू जाहीर झाला तेव्हा कोण कोण हॉस्पिटलमध्ये होतं, मला नाव घ्यायला लावू नका. तेव्हा मी स्वतः तिथे उपस्थित होतो. एकनाथ शिंदे पहिले शिवसेनेच्या शाखेत जायचे. त्यांना विचारा तुम्ही शिवसेनेत आले कधी?", असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या मृत्यूनंतर काय-काय घडामोडी घडल्या होत्या याबाबतचा गौप्यस्फोट केला आहे. “आनंद दिघे यांच्या निधननंतर आता तुम्ही काहीही बोलू शकतात. गणपतीचा दिवस होता. मला मिलिंद नार्वेकरचा फोन आला होता. उद्धव ठाकरे यांनी तुम्हाला बोलवलं आहे. आनंदचा मृत्यू झालेला आहे. कोणाला काहीच माहीत नव्हतं. शरद पवार यांना मी सांगितलं, अशी बातमी आहे. साधारण लोक किती आहेत? त्यांनी विचारलं. लगेच गाडीत बस आणि निघ तिथून आणि त्यानंतर दंगल सुरू झाली. त्यामुळे खोटारडेपणाला लिमिट असते. या सर्व मर्यादा पार केल्या आहेत. सहानुभूती एखाद्याच्या नावाने मिळवायची ते किती मिळवायची याचं वास्तव जाणणारी लोक आहेत”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
“मी विरोधात असताना काय केलं? माझ्यात हिंमत होती. माझ्याबरोबर जो माणूस होता तो तुमचा आमदार आहे. प्रताप सरनाईक. कोणतेही आंदोलन करताना आम्ही घाबरत नाहीत. फोन करून सांगत नाही. हे आमच्या रक्तात नाही. मी मुख्यमंत्र्यांना धक्काबुक्कीमध्ये पाडू शकतो. माझ्या आंदोलनाची त्यांनी तुलना करू नये. मठाच्या बाहेर उभे राहून आंदोलन होत नसतं. ते रस्त्यावर करावी लागतात”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
जितेंद्र आव्हाड यांचा नरेश म्हस्केंवर घणाघात
“नारायण राणेंची ताकद वाढू नये ही आमची इच्छा होती. राणे यांनी ताकद वाढली तर सर्वांना त्रास होईल, असं वाटत होतं. नरेश म्हस्के हा पळून गेला आणि कुठेतरी बसून होता. मी उद्धव ठाकरेंना दोनदा फोन केला. ते म्हणाले जाऊ दे त्याला कुठे जायचे ते. मला अशी माणसं नको असतात म्हणाले. माझ्या मनात होतं जाऊ दे चांगला कार्यकर्ता होता. मी शरद पवारांना सांगितलं. तेच शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितले. ते कुठे लपले होते, त्यावेळेसच्या मित्राला माहीत होते. त्या मित्र आणि त्याला गाडीत बसवले. उद्धव ठाकरे आणि मनोहर जोशी बसले होते. तेव्हा मी त्याला पेश केलं. तेव्हा म्हस्के म्हणत होते, माझी चुकी झाली. तेव्हा उद्धव ठाकरे निर्विघ्न होते. याचाच अर्थ असा की, गद्दारी रक्तात आहे. 21 वर्षाचा असताना गद्दारी त्याच्या रक्तात आहे”, असा घणाघात जितेंद्र आव्हाड यांनी केला.
‘आख्खी शिवसेना नरेश म्हस्के चालवतात’
“सर्वात मोठं म्हणजे एकनाथ शिंदे यांची ओळख आणि राजन विचारे यांची ओळख काय होती ते मी करून दिली, असे म्हस्के म्हणत होते. अनेक वेळेस म्हस्के म्हणायचे, मुख्यमंत्री मला बोलले होते ते त्यांना विचारा. प्रश्न नरेशला समजवा बाहेर बोलतो मी शिवसेना सोडली. एकनाथ शिंदे यांना माहीत नसेल तर आख्खी शिवसेना नरेश म्हस्के चालवतात”, असा मोठा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला. “माझा काय संबंध नसताना माझे नाव घेतात. मी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करत असतो. खासदाराने मोठ्या गोष्टींवरती बोलायला पाहिजे. नशिब मुख्यमंत्र्यांनी सांगितले गटारे आणि रस्त्याकडे बघणं बंद करा”, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला.
‘आनंद दिघे मला बंटी बोलत नव्हते, टिंब बोलायचे’
“तेव्हाचे क्षण प्रामाणिक होते. तेव्हा वाघ, गीते आणि मी अशी तीन माणसं मठात जायचे. त्यावेळेस ओरिजनल आनंद दिघे यायचे. ते मला कधीही बंटी बोलत नव्हते. टिंब बोलायचे. मी हाफ पॅन्टमध्ये भेटायचो. खरी वेळ आली तर नक्किच मी सांगेन. धर्मवीर जो चित्रपट काढला तो अर्धा असत्य आहे. लोकांच्या भावनांशी खेळ खेळण्याचं काम अजून देखील सुरू आहे”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
‘दिघे यांचा मृत्यू जाहीर झाला तेव्हा…’
“आनंद दिघे यांचा मृत्यू जाहीर झाला तेव्हा कोण कोण हॉस्पिटलमध्ये होतं, मला नाव घ्यायला लावू नका. तेव्हा मी स्वतः तिथे उपस्थित होतो. एकनाथ शिंदे पहिले शिवसेनेच्या शाखेत जायचे. त्यांना विचारा तुम्ही शिवसेनेत आले कधी? मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रीय पातळीवरती बोलावे. गल्लीबोळातलं बोलू नये. मणिपूर प्रकरण, चायना, ब्रृजभूषण अशा अनेक विषयावरती चर्चा करूया. जाहीरनामावर बोला. तेच तेच आनंद दिघे, आता नवीन पिढी आली आहे. युक्रेनचं युद्ध हे आता जोकिंग झालं आहे”, असं आव्हाड म्हणाले.
‘मला मुख्यमंत्र्यांकडून अशी अपेक्षा नव्हती’
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोण जितेंद्र आव्हाड? असं वक्तव्य केल्यानंतर आव्हाडांनी प्रतिक्रिया दिलीय. “माझी मैत्री होती. ते जर ओळखत नसतील तर मला फार ओळखावं, अशी माझी काही फार इच्छा नाही. पण हे बोलणं जे जितेंद्र माझे मित्र नव्हते. मग ते अगदी हास्यास्पद आहे. क्लस्टरचा मुद्दा मी पहिले काढला. ठाणे बंदचा आवाज मी आधी केलं. पण मी कधीच क्रेडिट देताना त्यांना देतो. असं होत नाही. त्यासाठी मोठं हृदय लागतं. आजही मी सांगतो एकनाथ शिंदे माझा मित्र आहे, अशी कित्येक कारणं आहेत. त्यांची कामे त्यांच्या सांगण्यावरून करून दिले. हे कधी कधी बोलायचं नसतं. आज ते माझे मित्र नाही म्हणून मुख्यमंत्री. त्यांनी माझी मैत्री नाकारली आहे. त्यांनी अजून मला बोलायची संधी दिली आहे. मला त्यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.