इतका मोठा पाऊस कधीच पाहिला नाही, केंद्रानं पथक पाठवावं; अजित पवार शेतकऱ्यांच्या बांधावर

| Updated on: Oct 17, 2020 | 5:49 PM

गेल्या तीन-चार दिवसांमध्ये राज्यातील अनेक भागांमध्ये प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

इतका मोठा पाऊस कधीच पाहिला नाही, केंद्रानं पथक पाठवावं; अजित पवार शेतकऱ्यांच्या बांधावर
Follow us on

सोलापूर : गेल्या तीन-चार दिवसांमध्ये राज्यातील अनेक भागांमध्ये प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे अनेक लोकांचा बळी गेला आहे. त्यामुळे आज पाऊस कमी होताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकसानग्रस्त भागांचा पाहणी दौरा सुरु केला आहे. (Never seen such heavy rain, central government should send a team to inspect the damaged area : Ajit Pawar)

अजित पवारांनी सकाळी बारामती शहरासह तालुक्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या भागांची पाहणी केली. तसेच काही वेळापूर्वी त्यांनी पंढरपूरमधील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी स्थानिकांशी संवाद साधला. या पुरामुळे बाधित झालेल्या रस्ते-पुलांच्या दुरुस्तीची कामे तातडीने करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देत, शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

नुकसानग्रस्त भागाची पाहणी पूर्ण करुन अजित पवारांनी माध्यमांना परिस्थितीविषयी माहिती दिली. यावेळी पवार म्हणाले की, “मी नुकसानग्रस्त भागातील अनेक लोकांशी बोललो, तिथले वयस्कर लोक म्हणाले की, इतका पाऊस आम्ही आयुष्यात कधीच पाहिला नव्हता. त्यावरुन आपण नुकसानाची कल्पना करु शकतो. या पावसामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं आहे. पिकाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. प्रामुख्याने पुणे, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर आणि सांगली या जिल्ह्यांमधील लोकांना मोठा फटका बसला आहे.”

पवार म्हणाले की, “शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं आहे. उभी पिकं नष्ट झाली आहेत. आम्ही संबंधित विभागाला पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पंचनामे सुरु झाले आहेत. काही दिवसात पंचनामे पूर्ण होतील. त्यानुसार शेतकऱ्यांना, नुकसानग्रस्तांना मदत करण्यात येईल”.

“जी धरणं अनेकदा भरत नाहीत तीदेखील या मुसळधार पावासमुळे भरली आहेत. वीर आणि उजनी धरणातून जास्त पाणी सोडण्यात आलं आहे. काही ठिकाणी लोकांनी ओढ्यांमध्ये केलेल्या अतिक्रमणामुळेदेखील शेतीचं नुकसान झालं आहे”.

अजित पवार म्हणाले की, “सध्या प्रशासनाकडून पूरबाधित लोकांची व्यवस्था करण्याचं काम सुरु आहे. राज्यातील परिस्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलले आहेत. त्यांनी मदतीचं आश्वासन दिलं आहे. राज्याला सध्या निधीची गरज आहे. आम्ही नुकसानाची पाहणी करुन केंद्राकडे मदत मागणार आहोत. केंद्र सरकारने राज्यातील परिस्थितीची माहिती घेण्यासाठी त्यांचं पथक तातडीने राज्यात पाठवावं, असं सांगणार आहोत”.

“सध्याच्या परिस्थितीत राज्याला मोठ्या निधीची आवश्यकता आहे. केंद्र सरकारने जीएसटीचे पैसे अद्याप दिलेले नाहीत. राज्याचे तब्बल 60 हजार कोटी थकित आहेत. त्यामुळे केंद्राने लवकरात लवकर राज्याला जीएसटीचे पैसे द्यावे, तसेच नुकसानग्रस्त भागाला मदत करण्यासाठी निधी द्यायला हवा”.

अतिवृष्टीमुळे राज्यात मृत्यूचं तांडव, तब्बल 44जणांनी जीव गमावला

अतिवृष्टीमुळे राज्यात मृत्यूचं तांडव पाहायला मिळाले. मुसळधार पावसामुळे विविध ठिकाणी तब्बल 44 जणांनी गमावला आहे. सर्वाधिक जीवितहानी पश्चिम महाराष्ट्रात झाली आहे. अतिवृष्टीदरम्यान पुणे विभागात 28 जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी 27 जणांचे मृतदेह सापडले आहेत. एकाचा शोध सुरु आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये 16 जणांचा मृत्यू झाला. (44 Person died due to heavy rainfall in Maharashtra)

सोलापूरमध्ये सर्वाधिक 14 जणांचा मृत्यू

पुणे विभागात अतिवृष्टीमध्ये एकूण 28 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक मृत्यू सोलापूर जिल्ह्यात झाले आहेत. सोलापूरला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला. पंढरपूरमध्ये दोन दिवसापूर्वी चंद्रभागा नदी काठावर बांधकाम सुरु असलेल्या कुंभार घाटाची भिंत कोसळली. यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला.

सांगलीतही मृत्यूची नोंद

सांगली जिल्ह्यातदेखील 9 जणांच्या मृत्यूची नोंद झाली. सांगलीच्या दुष्काळी तालुक्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन 36 फुटापर्यंत पोहोचली होती. सांगलीत पावसाने कहर केल्यानं 90 मार्ग बंद करावे लागले होते.

संबंधित बातम्या :

मुसळधार पावसानं वाहून गेला पूल, पावसाचं रौद्र रुप दाखवणारे भीषण PHOTOS

‘मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा’, स्वाभिमानी युवती आघाडीचा रास्तारोको

दिवाळीपर्यंत आम्ही शाळा सुरु करण्याचा निर्णय घेणार नाही : अजित पवार

सिंचन घोटाळ्याची ईडीकडून चौकशी; अजितदादा म्हणाले…

ईडी सिंचन घोटाळ्याची चौकशी करणार; अजित पवार पुन्हा गोत्यात?

अजित पवारांच्या मनमानीमुळे सिंचन घोटाळा, प्रस्ताव मंजुरीचे परिपत्रकच रद्द केले

(Never seen such heavy rain, central government should send a team to inspect the damaged area : Ajit Pawar)