FARMER PROTEST | भाजपचा अजून एक मित्रपक्ष NDAतून बाहेर पडणार? 8 डिसेंबरनंतर निर्णय!

| Updated on: Dec 07, 2020 | 7:44 AM

राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी कृषी कायद्याच्या विरोधात असल्याचं हनुमान बेनिवाल यांनी रविवारी जाहीर केलं. इतकच नाही तर RLP ही NDA चा घटक पक्ष राहिल की नाही? याचा निर्णय 8 डिसेंबरनंतर घेतला जाईल असंही बेनिवाल यांनी स्पष्ट केलं आहे.

FARMER PROTEST | भाजपचा अजून एक मित्रपक्ष NDAतून बाहेर पडणार? 8 डिसेंबरनंतर निर्णय!
Follow us on

नवी दिल्ली: केंद्राच्या नव्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज 12 वा दिवस आहे. या आंदोलनाला देशभरातून समर्थन मिळताना दिसत आहे. त्यातच कृषी कायद्याविरोधात भाजपला NDAतील मित्रपक्षांच्या विरोधालाही सामोरं जावं लागत आहे. भाजपचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाचे नेते आणि नागौरचे खासदार हनुमान बेनीवाल यांनीही शेतकरी आंदोलनाला समर्थन दिलं आहे. (RLP leader Hanuman Beniwal warns Modi government)

राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी कृषी कायद्याच्या विरोधात असल्याचं हनुमान बेनिवाल यांनी रविवारी जाहीर केलं. पंतप्रधान मोदी यांनी हे कायदे परत घ्यावेत अशी मागणीही त्यांनी केली आहे. इतकच नाही तर RLP ही NDA चा घटक पक्ष राहिल की नाही याचा निर्णय 8 डिसेंबरनंतर घेतला जाईल असंही बेनिवाल यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे भाजपचा अजून एक मित्रपक्ष NDAतून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याचं पाहायला मिळत आहे.

शिरोमणी अकाली दलाची NDAतून एक्झिट

केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला विरोध करत यापूर्वी शिरोमणी अकाली दल NDA तून बाहेर पडला. शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामाही दिला. त्यानंतर शिरोमणी अकाली दलाचे नेते आणि कार्यकर्त्या आक्रमकपणे केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात आंदोलनात सहभागी झाले आहेत.

8 डिसेंबरला ‘भारत बंद’ची हाक

कृषी कायद्याविरोधात सुरु असलेल्या आंदोलनावर तोडगा निघत नसल्यानं दिल्लीत आंदोलन करत असलेल्या जवळपास 40 शेतकरी संघटनांनी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या या भारत बंदला देशभरातून पाठिंबा मिळत आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल आणि दिल्लीला येणारे सर्व रस्ते बंद करण्यात येतील असा इशाराच शेतकरी संघटनांनी दिला आहे.

शिवसेना, काँग्रेसचा पाठिंबा, राष्ट्रवादीच्या निर्णयाची शक्यता

शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील शिवसेना आणि काँग्रेसनं पाठिंबा दिला आहे. मोठ्या संख्येनं या भारत बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन काँग्रेस आणि शिवसेनेकडून करण्यात आलं आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस भारत बंदमध्ये सहभागी होण्याबाबत आज निर्णय घेण्याची शक्यता आहे.

शरद पवारही मैदानात

केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही मैदानात उतरले आहेत. पवार काही राजकीय पक्षाच्या नेत्यांसोबत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहे. 9 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजता ही भेट होणार असल्याची माहिती मिळतेय. यावेळी पवार यांच्यासोबत अन्य राजकीय पक्षांचे काही नेते उपस्थित असणार आहेत. शरद पवार हे सीताराम येचुरी आणि डी. राजा यांच्यासह राष्ट्रपती कोविंद यांची भेट घेणार आहेत. या भेटीत शेतकरी आंदोलनाविषयी चर्चा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

संबंधित बातम्या:

BREAKING | शरद पवारांनी शड्डू ठोकला, थेट राष्ट्रपतींना भेटणार

जर शेतकरीविरोधी काळे कायदे मागे घेतले नाही तर खेलरत्न पुरस्कार परत करणार : बॉक्सर विजेंद्र सिंह

FARMER PROTEST | शेतकऱ्यांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला काँग्रेस, टीआरएस आणि ‘आप’चा पाठिंबा

RLP leader Hanuman Beniwal warns Modi government