कोरोना विषाणूचा नवा स्ट्रेन भारतात कुठेही आढळलेला नाही, घाबरण्याची गरज नाही : निती आयोग

| Updated on: Dec 22, 2020 | 7:02 PM

कोरोना विषाणूच्या या नव्या स्ट्रेनमुळे जगभरातील अनेक देशांचे धाबे दणाणले आहेत. त्यातही प्रामुख्याने ब्रिटनमधून लोकांची ये-जा सुरु असलेले देश अधिक चिंतेत आहेत.

कोरोना विषाणूचा नवा स्ट्रेन भारतात कुठेही आढळलेला नाही, घाबरण्याची गरज नाही : निती आयोग
Follow us on

नवी दिल्ली : ब्रिटनसह युरोपच्या काही भागांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाचा नव्या प्रकारचा विषाणू (New Corona Strain in UK) आढळून आला आहे. कोरोनाच्या विषाणूमध्ये म्युटेशन (बदल) होऊन तयार झालेला हा नवा विषाणू आणखी घातक असण्याची शक्यता आहे. शास्त्रज्ञांनी या विषाणुला B.1.1.7 असे नाव दिले आहे. कोरोना विषाणूच्या या नव्या स्ट्रेनमुळे जगभरातील अनेक देशांचे धाबे दणाणले आहेत. त्यातही प्रामुख्याने ब्रिटनमधून लोकांची ये-जा सुरु असलेले देश अधिक चिंतेत आहेत. दरम्यान, कोरोना विषाणूची नवी प्रजाती (New Corona Strain) अद्याप भारतात कुठेही आढळलेली नाही, अशी माहिती निती आयोगाच्या आरोग्य विभागाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी दिली आहे. (New Strain of Coronavirus seen UK has not been seen in India, so far says Niti Ayog)

व्ही. के. पॉल यांनी सांगितले की, “नव्या कोरोना विषाणूमुळे बाधित झालेला एकही रुग्ण भारतात आढळलेला नाही”. कोरोना विषाणूमध्ये आतापर्यंत 17 वेळा बदल झाले आहेत. विषाणूंमध्ये म्यूटेशन होत असते. ब्रिटनच्या शास्त्रज्ञांशी बोलल्यानंतर कोरोना विषाणूची संसर्गक्षमता वाढल्याची माहिती त्यांनी दिली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली होती.

कोरोनावर जी लस तयार होत आहे ती लस म्यूटेशन झालेल्या कोरोना विषाणूला थोपवू शकेल की नाही, याबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात आहे. या शंकांचेही व्ही. के. पॉल यांनी खंडण केले. ते म्हणाले की, कोरोनावर परिणामकारक लस तयार केली जात आहे. कोरोना विषाणूच्या म्यूटेशनमुळे लसीच्या परिणामकारकतेवर कोणताही परिणाम होणार नाही. याचाच अर्थ म्यूटेशन झालेल्या विषाणूलाही ही लस थोपवू शकेल, त्यामुळे घाबरण्याची गरज नाही.

दरम्यान, नव्या कोरोना स्ट्रेनविषयी माहिती मिळाल्यानंतर केंद्र सरकारनं यूकेमधून येणारी विमानसेवा तातडीनं खंडित केली आहे. प्रयोगशाळेत विषाणूचे नमुने आले आहेत त्यांचे जिनोमिक सिस्टीमेशन करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये यूरोपमधून भारतात आलेल्या प्रवाशांची माहिती घेण्याचे काम सुरु आहे. त्यांना काही आजार झाले आहेत का, याची माहिती घेण्याचं काम सुरु आहे. काही जण कोरोना पॉझिटिव्ह असतील तर त्याबाबत अभ्यास करण्यात येणार आहे.

कोरोना व्हायरसमधील हे म्युटेशन सामान्य आहे का?

लीसेस्टर विद्यापीठातील वैद्यकीय संसर्गतज्ज्ञ डॉ. ज्युलियन टँग यांच्या माहितीनुसार, विषाणूत अशाप्रकारचा बदल (म्युटेशन) सामान्य बाब आहे. इन्फ्लूएंझाप्रमाणे विविध विषाणू एकाच व्यक्तीला संक्रमित करू शकतात. यामधून हायब्रिड व्हायरसची निर्मिती होऊ शकते. तर लीव्हरपूल विद्यापीठातील प्राध्यापक ज्युलियन हिसकॉक्स यांच्या मतानुसार कोरोनाच्या विषाणूमध्ये सतत बदल घडत असतात. त्यामुळे SARS-CoV-2 चे नवे प्रकार निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मानव आणि प्राण्यांच्या शरीरात असणाऱ्या विषाणुंबाबत ही परिस्थिती नेहमी पाहायला मिळते.

ब्रिटनमधून भारतात येणाऱ्या सर्व विमानसेवा 31 डिसेंबरपर्यंत रद्द

ब्रिटनमध्ये कोरोनाचा कहर वाढल्याने ब्रिटनहून भारतात येणाऱ्या सर्व विमानसेवा तूर्तास बंद ठेवण्यात आल्या आहेत. येत्या 31 डिसेंबरपर्यंत ही विमानसेवा बंद ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यूरोपीयन देशांनीही या आधीच ब्रिटनमधून येणाऱ्या विमानसेवेला बंदी घातली होती. भारत सरकारने ब्रिटनमधून येणारी विमानसेवा 31 डिसेंबरपर्यंत बंद केल्या आहेत. काल रात्री 12 वाजल्यापासून ही सेवा बंद होणार आहे.

नवा कोरोना व्हायरस किती घातक?

कोरोना व्हायरसची नवी प्रजाती आढळल्यामुळे जगभरात तर्क-वितर्क लावले जात आहेत. तो किती घातक असावा?, त्याच्या प्रसाराची क्षमता अशी अशावी?, याबद्दल अनेक तर्क लावले जात आहेत. याविषयी बोलताना बीबीसीचे खास आरोग्यविषयक पत्रकार जेम्स लॅलेगर यांनी अधिक माहिती दिली आहे. “नव्या कोरोना व्हायरसला समजून घेण्यासाठी कोरोना व्हायरसमध्ये झालेले बदल समजून घ्यावे लागतील. व्हायरसमध्ये झालेला बदल हा स्वाभाविक आहे. जास्त संक्रमणासाठी कोणताही व्हायरस स्व:तला बदलून घेत असतो. तसेच कोरोना व्हयरसच्या बाबतीत झाले आहे,” असे लॅलेगर यांनी सांगितलं.

महाराष्ट्रात खबरदारी, नाईट कर्फ्यू लागू

ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (21 डिसेंबर) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीच्या उपाययोजनांसाठी बैठक घेतली. राज्यात आज 22 डिसेंबर 2020 पासून महानगरपालिका क्षेत्रात रात्री 11 ते पहाटे सहा पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही संचारबंदी 5 जानेवारीपर्यंत लागू राहील. त्याचबरोबर संपूर्ण युरोप आणि मध्य-पूर्व देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांना ते विमानतळावर उतरल्यापासून 14 दिवस संस्थात्मक क्वारंटाईन करण्याचा तसेच अन्य देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या या नव्या विषाणूमुळे राज्यात अधिकची खबरदारी घेण्यात येत असून पुढील 15 दिवस अधिक सतर्क रहावे लागेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

संबंधित बातम्या

साडेपाच महिन्यांनंतर देशातील अ‍ॅक्टिव्ह कोरोनाग्रस्तांची संख्या 3 लाखांच्या खाली, रिकव्हरी रेट 95 टक्के