भर रस्त्यात पोलिसांशी हुज्जत, संबंधित तरुण विनायक राऊतांचा मुलगा, निलेश राणेंचा दावा

| Updated on: Jul 17, 2020 | 11:11 PM

माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत एक तरुण पोलिसांशी हुज्जत घालत असल्याचं दिसत आहे (Nilesh Rane claim that MP Vinayak Raut son argued with Police on street).

भर रस्त्यात पोलिसांशी हुज्जत, संबंधित तरुण विनायक राऊतांचा मुलगा, निलेश राणेंचा दावा
Follow us on

सिंधुदुर्ग : माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत एक तरुण पोलिसांशी हुज्जत घालत असल्याचं दिसत आहे. संबंधित युवक शिवसेनेचे नेते आणि खासदार विनायक राऊत यांचा मुलगा असल्याचा दावा निलेश राणे यांनी केला. याशिवाय खासदाराचा मुलगा असल्याने संबंधित तरुणाविरोधात गुन्हा दाखल झाला नाही, असा आरोप निलेश राणे यांनी केला आहे (Nilesh Rane claim that MP Vinayak Raut son argued with Police on street).

“शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्या मुलाने एका पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली. भर पावसात एक पोलीस कर्मचारी आपलं कर्तव्य बजावत आहे. खासदाराचा मुलगा दारु पिऊन शुद्धीत नसल्यासारखा त्याला धमकी देतो. दारु पिऊन गाडी वेडीवाकडी चालवली तर पोलीस पकडणारच. याप्रकरणी संबंधित तरुणाविरोधात कलम 353 आणि 185 अंतर्गत गुन्हा दाखल व्हायला हवा”, असं निलेश राणे त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर म्हणाले आहेत (Nilesh Rane claim that MP Vinayak Raut son argued with Police on street).

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

याप्रकरणी निलेश राणे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. “ही घटना सिंधुदुर्गातील कणकवली बाजारपेठेत संध्याकाळी 5 ते 6 वाजेच्या सुमारास घडली. पोलिसांशी हुज्जत घालणारा मुलगा 100 टक्के खासदार विनायक राऊत यांचा मुलगा आहे. व्हिडीओत दिसणारी गाडी विनायक राऊत यांच्या मुलाच्या नावावर आहे. याशिवाय व्हिडीओत तो मुलगा स्वत: खासदारांचा मुलगा असल्याचं सांगत आहे”, असं निलेश राणे म्हणाले.

“एका पोलीस कर्मचाऱ्याला ज्या भाषेत खासदारांचा मुलगा धमकी देतोय तो एक गुन्हा आहे. कलम 353 अंतर्गत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल व्हायला हवा. पण खासदारांचा मुलगा असल्याने अजूनपर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही. ही वस्तुस्थिती आहे. खरंतर दारु पिऊन तो असे प्रकार करत असेल तर त्याला तुरुंगातच टाकलं पाहिजे “, अशी टीका निलेश राणे यांनी केली.

“शिवसेनेच्या नेत्यांचे नातेवाईक आणि कार्यकर्त्यांना निवडून आले म्हणजे महाराष्ट्रच विकत घेतला आहे, असं वाटत आहे. महाराष्ट्र आपलं काही तरी देणं लागतो, असं हे लोक वागत आहेत”, असा घणाघात निलेश राणे यांनी केला.