न विचारता बिस्किटं खाल्ल्याने विद्यार्थ्याला डोकं फुटेपर्यंत मारहाण

| Updated on: Jul 17, 2019 | 10:21 AM

एका चौथीतल्या मुलाने न विचारता दोन बिस्किटं खाल्ली म्हणून संस्थाचालकाने त्या मुलाला डोकं फुटेपर्यंत मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पाच रुपयांचा बिस्किटांचा पुडा न विचारता घेऊन त्यातील दोन बिस्किटं खाल्ली म्हणून निवासी शाळेच्या संस्थाचालक महाराजाने या मुलाला वायरने अमानुष मारहाण केली.

न विचारता बिस्किटं खाल्ल्याने विद्यार्थ्याला डोकं फुटेपर्यंत मारहाण
Follow us on

औरंगाबाद : गुरुपौर्णिमेच्या दिवशी जिथे संपूर्ण देशात गुरुंना वंदन केलं जात होतं. तिथेच दुसरीकडे एका गुरुचं अमानुषकृत्य समोर आलं आहे. एका चौथीतल्या मुलाने न विचारता दोन बिस्किटं खाल्ली म्हणून संस्थाचालकाने त्या मुलाला डोकं फुटेपर्यंत मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पाच रुपयांचा बिस्किटांचा पुडा न विचारता घेऊन त्यातील दोन बिस्किटं खाल्ली म्हणून निवासी शाळेच्या संस्थाचालक महाराजाने या मुलाला वायरने अमानुष मारहाण केली. औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातील निल्लोड येथील माऊली वारकरी शिक्षण संस्थेच्या संत ज्ञानेश्वर विद्यालयात संतापजनक प्रकार घडकीस आला.

निरंजन सतीश जाधव असं या चौथीतल्या मुलाचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी संस्थाचालक महाराज रामेश्वर महाराज पवार विरोधात गुन्हा दाखल करुन त्याला ताब्यात घेतलं आहे.

गेल्या 11 जुलैला निरंजनला मारहाण झाली. मात्र, त्याचं डोकं फुटलेलं असतानाही त्याच्यावर कुठलेही उपचार करण्यात आले नाही. तीन दिवसांपूर्वी 14 जुलैला जेव्हा निरंजनची पालक त्याला भेटायला गेले, तेव्हा ही घटना त्यांच्या लक्षात आली आणि त्यांना धक्काच बसला. निरंजनला या अवसस्थेत पाहून त्याच्या आईला अश्रू अनावर झाले. त्यानंतर त्यांनी निरंजनला घरी परत नेले आणि पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.

संस्थेतील सर्व मुलांकडे खायला काही ना काही होते. मात्र, माझ्याकडे काहीच नव्हतं. मी भूकेने व्याकूळ झालो होतो, त्यामुळे मी माझ्या मित्राचा बिस्किटाचा पुडा त्याला न विचारता फोडला आणि त्यातील दोन बिस्किटं खाल्ली. संस्थेच्या महाराजांना याची माहिती मिळाली. तेव्हा त्यांनी मला स्पीकरच्या वायरने खूप मारलं. मला स्वयंपाक घरात नेऊन माझ्या पायाला चटकाही दिला, असं निरंजनने सांगितलं.

दुसरीकडे, निरंजन हा अत्यंत बंड मुलगा असून तो नेहमी इतर मुलांच्या पेट्या फोडत असल्याचं संस्थाचालक रामेश्वर महाराज पवार यांनी सांगितलं. त्यादिवशी त्याने जवळपास आठ मुलांच्या पेट्या फोडल्या, त्यामुळे रागाच्या भरात हा प्रसंग घडल्याचं त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

मिरजच्या मेडीकल कॉलेजमध्ये विद्यार्थीनीचा संशयास्पद मृत्यू, प्रकरण दाबण्याचा प्रयत्न?

3 विद्यार्थी 15 दिवसांपासून सरपटत शाळेत, अन्य विद्यार्थ्यांमध्ये घबराट

बालभारतीचे भलते प्रयोग, ‘एकवीस’ऐवजी ‘वीस एक’

VIDEO : उल्हासनगरमधील शाळेत विद्यार्थिनींवर स्लॅब कोसळला!