प्रकृती बिघडल्याने ट्रकचालकाने वाटेतच उतरवलं, वर्ध्याजवळ वृद्धाचा मृत्यू

| Updated on: May 19, 2020 | 10:39 AM

80 वर्षीय शांताराम यादवची प्रकृती बिघडल्याने ट्रकचालकाने घाबरुन त्याच्यासह सहकाऱ्याला वाटेतच उतरवले. मात्र वृद्धाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याचा तिथेच मृत्यू झाला. (Old Man Dies in Wardha Truck Driver alights them during Mumbai Gorakhpur Travel)

प्रकृती बिघडल्याने ट्रकचालकाने वाटेतच उतरवलं, वर्ध्याजवळ वृद्धाचा मृत्यू
Follow us on

वर्धा : मुंबईहून गोरखपूरला जाणाऱ्या ट्रकमधून प्रवास करणाऱ्या वृद्धाची प्रकृती बिघडल्याने ट्रकचालकाने त्याला अर्ध्या वाटेत उतरवलं. मात्र वेळीच उपचार न मिळाल्याने वृद्धाचा मृत्यू झाला. लॉकडाऊनच्या काळात दिसलेल्या असंवेदनशीलतेच्या भीषण चित्रामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. (Old Man Dies in Wardha Truck Driver alights them during Mumbai Gorakhpur Travel)

लॉकडाऊनमुळे रोजगाराची अडचण निर्माण झाल्याने देशभरात परराज्यात अडकलेले लाखो स्थलांतरित मजूर स्वगृही जाण्याची धडपड करताना दिसत आहेत. कोण हजारो किलोमीटर पायपीट करत आहे, तर काही जण मिळेल त्या वाहनाने गावी जाण्याची वाट धरत आहेत. अशातच मुंबईहून उत्तर प्रदेशला जाणाऱ्या वृद्धाचा ट्रकचालकाच्या असंवेदनशीलतेने बळी घेतला.

मुंबईहून गोरखपूरला जाण्यासाठी 17 जण 16 मे रोजी एका ट्रकने निघाले होते. याच प्रवासादरम्यान 80 वर्षीय शांताराम यादव यांना रस्त्यातच अस्वस्थ वाटू लागलं. त्यांना ताप, सर्दी असल्याचं लक्षात येताच ट्रकचालकाने मुंबई-नागपूर महामार्गावरील कारंजा (घाडगे) तालुक्यातील सारवाडी शिवारात ट्रक थांबवला. काल (सोमवारी) संध्याकाळी शांताराम यांच्यासह 52 वर्षीय सहकारी रामसुमेर यादवलाही वाटेतच उतरवले. मात्र वृद्धाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याचा तिथेच मृत्यू झाला.

हेही वाचा : पुण्यात अ‍ॅम्ब्युलन्ससाठी तीन तास ताटकळत, खुर्चीवर बसून वाट पाहणाऱ्या रुग्णाने बायको-मुलासमोर प्राण सोडले

या घटनेची माहिती मिळताच तळेगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठत विचारपूस केली. कारंजा (घाडगे) येथील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याना याची माहिती दिल्यानंतर परिसराचे निर्जंतुकीकरण केले गेले. मयत वृद्धासोबत असलेल्या व्यक्तीची तपासणी करत त्याला सेवाग्राममध्ये इंस्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात आले. त्याचे कोरोना चाचणीचे नमुनेही घेण्यात आले.

मृतकाचे कोणतेही नमुने न घेता मध्यरात्रीच दोन वाजता त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यामुळे कोरोना चाचणीसाठी नमुने न घेता प्रशासनाने अंत्यविधीसाठी घाई कशासाठी केली, हा प्रश्न उपस्थित होत आहे.