हातात कांद्याचा फोटो, जामिनावर सुटलेले चिदंबरमही काँग्रेसच्या आंदोलनाला

| Updated on: Dec 05, 2019 | 11:56 AM

काँग्रेस नेते अधीर चौधरी, गौरव गोगोई आणि इतर खासदारांनी कांद्याच्या वाढत्या किंमतीचा निषेध गुरुवारी संसदेच्या आवारात नोंदवला.

हातात कांद्याचा फोटो, जामिनावर सुटलेले चिदंबरमही काँग्रेसच्या आंदोलनाला
Follow us on

नवी दिल्ली : 106 दिवसांनंतर तिहार तुरुंगातून जामिनावर सुटलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम कांद्याच्या वाढत्या दरांविरोधातील काँग्रेसच्या आंदोलनात सहभागी झाले. माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, काँग्रेस नेते अधीर चौधरी, गौरव गोगोई आणि इतर खासदारांनी कांद्याच्या वाढत्या किंमतीचा निषेध गुरुवारी संसदेच्या आवारात (P Chidambaram in Onion Protest) नोंदवला.

सरकारने कांद्याचे भाव कमी करावेत आणि गरिबांचा छळ करणं थांबवावं, अशी मागणी करणारे बॅनर लावून घोषणाबाजी केली आणि कांद्याच्या टोपली घेऊन काँग्रेसच्या खासदारांनी निषेध केला. ‘कैसा है यह मोदी राज, महंगा राशन, महंगा प्याज’, ‘महंगाई की प्याज पर मार, चूप क्यूं है मोदी सरकार’ अशी टीका बॅनरच्या माध्यमातून करण्यात आली.

आंदोलनाला पी चिदंबरमही हजर राहिले होते. आयएनएक्स मीडिया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात तुरुंगवास झाल्यानंतर चिदंबरम यांना सशर्त जामीन मंजूर करण्यात आला.

चिदंबरम यांनी पुराव्यांशी छेडछाड करु नये, साक्षीदाराशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करु नये, या प्रकरणात माध्यमांना मुलाखती देऊ नयेत किंवा कोणतंही जाहीर वक्तव्य करु नये आणि सुप्रीम कोर्टाच्या परवानगीशिवाय देशाबाहेर जाऊ नये, या चार अटींवर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

दरम्यान, सरकारने कांद्याचे वाढते दर रोखण्यासाठी आणि कांद्याच्या साठवणुकीचं तंत्रज्ञान सुधारण्यासाठी सरकारने अनेक पावलं उचलली आहेत, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी बुधवारी सांगितलं. अनेक ठिकाणी कांद्याची किंमत प्रतिकिलो 100 रुपयांच्या पार गेली आहे.

काळजी करु नका, मी कांदा-लसूण फार नाही खात, सुप्रिया सुळेंच्या प्रश्नानंतर निर्मला सीतारमन यांचं उत्तर

‘कांद्याचे दर नियंत्रणात यावेत यासाठी तुर्कस्तान आणि इजिप्त या देशांतून सरकारने कांदा मागवला. पण हा कांदा येथील व्यापारी 70 रुपये प्रतिकिलो दराने खरेदी करुन बाजारात 100 ते 120 रुपये किलो दराने विकत आहेत. ही जनतेची लूट आहे’ असं ट्वीट राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.

‘देशभरात कांदा महाग झाल्याचा मुद्दा लोकसभेत उपस्थित केला. कांदा उत्पादकांबाबत केंद्र सरकारने दाखवलेल्या अनास्थेमुळे कांद्याचे उत्पादन ढासळले असून यामुळे ग्राहकांना महाग कांदा खरेदी करावा लागत असल्याचा मुद्दा मांडला. आपल्या देशातील शेतकरी उत्तम प्रतीचा कांदा पिकवतात. पण तरीही इजिप्त आणि तुर्कस्तानचा कांदा विकत घेण्याची वेळ आपल्यावर आली ही खेदाची बाब आहे. सरकारने यावर स्पष्टीकरण द्यावे अशी मागणीही भाषणादरम्यान केली’ असंही सुळेंनी सांगितलं. (P Chidambaram in Onion Protest)