मराठा आरक्षणप्रश्नी पार्थ पवार मैदानात; सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करणार!

| Updated on: Oct 01, 2020 | 11:51 AM

लाखो असहाय विवेकला न्याय मिळावा म्हणून मराठा आरक्षणप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करणार असल्याचं पार्थ पवार यांनी म्हटलं आहे.

मराठा आरक्षणप्रश्नी पार्थ पवार मैदानात; सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करणार!
Follow us on

पुणे: मराठा आरक्षणासाठी बीड येथील विवेक रहाडे या विद्यार्थ्यानं आत्महत्या केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. लाखो असहाय विवेकला न्याय मिळावा म्हणून मराठा आरक्षणप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करणार असल्याचं पार्थ पवार यांनी म्हटलं आहे. मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकविण्यात अपयश आल्याची टीका राज्य सरकारवर होत असतानाच पार्थ यांनी ही भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. (Parth Pawar on Maratha Reservation Issue)

पार्थ पवार यांनी विवेक रहाडेचा फोटो ट्विटरवर पोस्ट करून हे ट्विट केलं आहे. ”विवेकनं आमच्या मनात पेटवलेली संघर्षाची ज्योत संपूर्ण व्यवस्थेला भस्मसात करू शकते. संपूर्ण मराठा तरुणांचं भवितव्य अंधकारमय झालं आहे. त्यामुळे मी सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करणार आहे. त्याशिवाय माझ्याकडे पर्याय उरला नाही,’ असं पार्थ यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

लाखो असहाय विवेकला न्याय मिळावा म्हणून माझ्या मनातील मराठा आरक्षणाची पेटलेली मशाल पुढे नेण्यास मी तयार आहे, असं सांगतानाच मराठा आरक्षणासाठी विवेकनं आत्महत्या केल्याचं ऐकून हादरून गेलो. अशा घटना घडण्याआधीच मराठा नेत्यांनी जाग व्हावं आणि आरक्षणासाठी लढायला हवं. महाराष्ट्र सरकारनंही यात तातडीनं लक्ष घातलं पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता आहे. शिवाय अर्थ खात्यापासून ते गृहखात्यापर्यंतची महत्त्वाची खाती राष्ट्रवादीकडे आहेत. असं असताना पार्थ यांनी हे ट्विट करून राज्य सरकारला एक प्रकारे घरचा आहेर दिला आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात असून पार्थ यांच्या या ट्विटमुळे राज्य सरकारही कोंडीत सापडलं असल्याची चर्चा आहे. (Parth Pawar on Maratha Reservation Issue)

बीड तालुक्यातील केतुरा गावातील विवेक रहाडे या तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्याने चिठ्ठी लिहून ठेवली होती. मराठा आरक्षण गेल्यामुळे मेडिकलला नंबर लागत नसल्याने आत्महत्या करत असल्याचं त्याने या चिठ्ठीत म्हटलं होतं. विवेकच्या या आत्महत्येमुळे संपूर्ण राज्य हादरून गेलं असून मराठा आरक्षणासाठी सरकारवरील दबाव वाढला आहे.

संबंधित बातम्या: 

आम्हाला EWS मध्ये आरक्षण नको, संभाजीराजेंची भूमिका, मुख्यमंत्र्यांकडून तात्काळ आदेश जारी

मराठा समाजाचा EWS आरक्षणाला विरोध, खासदार संभाजीराजे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

मराठा आरक्षणाचा पेच सोडवण्यात ओबीसी समाज सहकार्य करेल, संभाजीराजेंना ओबीसी नेत्यांचा शब्द

(Parth Pawar on Maratha Reservation Issue)