‘शेतकऱ्यांना आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार, त्यांना अडवू नका’, संयुक्त राष्ट्राकडूनही मोदी सरकारला कानपिचक्या

| Updated on: Dec 05, 2020 | 11:25 PM

भारतात मागील अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचे पडसाद आता आंतरराष्ट्रीय पातळीवरही उमटत आहेत.

शेतकऱ्यांना आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार, त्यांना अडवू नका, संयुक्त राष्ट्राकडूनही मोदी सरकारला कानपिचक्या
Follow us on

न्यू यॉर्क : भारतात मागील अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचे पडसाद आता आंतरराष्ट्रीय पातळीवरही उमटत आहेत. कॅनडाने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर आता संयुक्त राष्ट्रही (United Nation) शेतकऱ्यांच्या पाठिशी उभं राहिलंय. शेतकऱ्यांना शांततापूर्ण मार्गाने आपलं आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यांना अडवू नये, असं मत संयुक्त राष्ट्राचे महासचिव एंतोनियो गुतारेस यांनी व्यक्त केलं. सरकारी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना आंदोलन करु द्यावं, असा सल्ला देत त्यांनी मोदी सरकारला अप्रत्यक्षपणे कानपिचक्या दिल्या आहेत (People have a right to demonstrate peacefully say UN General Secretary on Farmers protest in India).

एंतोनियो गुतारेस यांचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक म्हणाले, “भारताबद्दल बोलायचं झालं तर नागरिकांना शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार आहे, असंच मी म्हणेल. भारतातील अधिकाऱ्यांनी त्यांना शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करु द्यायला हवं.” स्टीफन दुजारिक शेतकरी आंदोलनावर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देत होते.

विशेष म्हणजे याआधी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो (Justine Trudeau) यांनी भारतातील कृषी कायद्याविरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला (Farmers Protest) पाठिंबा देत काळजी व्यक्त केली होती. यानंतर मोदी सरकारने जस्टिन ट्रूडो यांच्या या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत कॅनडाचा हस्तक्षेप खपवून घेणार नसल्याचं म्हटलं.

जस्टिन ट्रूडो यांनी आमचा शेतकऱ्यांच्या शांततापूर्ण आंदोलनाला पाठिंबा असल्याचं म्हटलं होतं. कॅनडाचे (Canada) पंतप्रधान आणि इतर नेत्यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्याने मोदी सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडाच्या उच्चायुक्तांकडे आपली नाराजी व्यक्त केली होती. तसेच भारताच्या अंतर्गत विषयांमधील कॅनडाचा हस्तक्षेप अजिबात मान्य नाही, असं सांगितलं होतं.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो नेमकं काय म्हणाले होते?

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी नुकताच भारतातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता.

ते म्हणाले होते, “आम्ही शेतकऱ्यांच्या कुटुंबांसोबत आहोत. या शेतकऱ्यांविषयी आम्हाला काळजी वाटत आहे. आपल्या अधिकारांसाठी शांततापूर्ण आंदोलनात कॅनडा नेहमीच तुमच्यासोबत आहे. आमचा चर्चेवर/संवादावर विश्वास आहे. आम्ही शेतकऱ्यांची बाजून भारतीय अधिकाऱ्यांसमोर ठेऊ. आपण सर्वांनी एकत्र येण्याची ही वेळ आहे.”

भारतीयवंशाचे कॅनडाचे खासदार रुबी सहोटा आणि टिम उप्पल यांनी देखील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत मोदी सरकारवर टीका केली आहे.

भारतातील शेतकरी आंदोलनावरुन मोदी सरकारची आंतरराष्ट्रीय पातळीवर कोंडी होत असल्याचं चित्र आहे. कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो यांच्यासह कॅनडातील भारतीयवंशाच्या काही खासदारांनीही शेतकऱ्यांना आपला पाठिंबा दिलाय. तसेच मोदी सरकार ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचं आंदोलन हाताळत आहे त्यावर नाराजी व्यक्त केलीय.

कॅनडातील भारताच्या दुतावासाबाहेर आंदोलन

याशिवाय तेथील भारतीयवंशाच्या नागरिकांनी कॅनडातील भारताच्या दुतावासाबाहेर आंदोलन करत शेतकरी आंदोलनाला पाठिंबाही दर्शवला आहे. त्यामुळे मोदी सरकारने कॅनडाच्या या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच भारतातील कॅनडाच्या राजदुताला पाचारण केलं आहे. त्यांच्याकडे भारत आपली तीव्र नाराजी व्यक्त करेल.

संबंधित बातम्या :

कॅनडाच्या पंतप्रधानांचा भारतातील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा, मोदी सरकार भडकलं

Farmers Delhi protest | काँग्रेसकडून आंदोलनाचे समर्थन, तर साहित्य संमेलनाध्यक्षांचा शेतकऱ्यांना पाठिंबा

पोलिसांनी शेतकऱ्याला मारणं सोडा स्पर्शही न केल्याचा भाजप आयटी सेलचा दावा, ट्विटरकडून अमित मालवीय यांचं ट्विट ‘फ्लॅग’

People have a right to demonstrate peacefully say UN General Secretary on Farmers protest in India